शहर व उपनगरातील काही संक्रमण शिबिरे दलालांनी पोखरल्याने रहिवाशांना तेथे राहणे मुश्कील झाले आहे. दलालांनी गेल्या १० वर्षापासून शिबिरात शिरकाव केला असतानाही म्हाडाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
मुंबई – शहर व उपनगरातील काही संक्रमण शिबिरे दलालांनी पोखरल्याने रहिवाशांना तेथे राहणे मुश्कील झाले आहे. दलालांनी गेल्या १० वर्षापासून शिबिरात शिरकाव केला असतानाही म्हाडाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. घुसखोरी वाढली असून बनावट कागदपत्रे तयार करून शिबिरातील गाळे परस्पर विकण्यात येत आहेत. दलाल गाळे भाडयाने देऊन त्यांचे भाडे वसूल करत असल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे.
म्हाडा अशा अवैध दलालांना मोफत सोयी-सुविधा का पुरवते हा प्रश्नही अनुत्तरित आहे. त्यामुळेच ५० टक्के शिबिरांचा ताबा दलालांनी घेतला आहे. एका घराचे दरमहा भाडे पाच ते सहा हजार रुपयांच्या घरात आहे.
गलेलठ्ठ अनामत रकमेवर ‘दलाल गब्बर’ होत असताना हक्काच्या घरातून संक्रमण शिबिरात आलेले खरे घरमालक मात्र बेघर झाले आहेत.धारावीच्या संक्रमण शिबिरात घुसखोरांचे रॅके ट अस्तित्वात असल्याची तक्रार दीड वर्षापूर्वी म्हाडाने पोलिसांकडे केली होती. त्यानंतर या शिबिरातील घुसखोरांना अटकही झाली होती.
या मोठया कारवाईनंतर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर इतर शिबिरांतील घुसखोरांनाही बाहेर काढले जाईल, अशी रहिवाशांची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. त्यामुळे इथे दलालांच्या इशा-यावरच सारेकाही चालते यावरच रहिवाशांचा विश्वास बसला. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगरातील संक्रमण शिबिरात ८० गाळे आहेत. यात ३० ते ३२ कुटुंबे राहतात. १३ गाळ्यांमध्ये म्हाडाचे कर्मचारी राहतात. तर उर्वरित शिबिरांचा ताबा दलालांनी घेतला आहे.
कुलाबा कफपरेडमधील संक्रमण शिबिरांतही दलालांचा खुलेआम वावर आहे. उर्वरित शिबिरांतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. रहिवासी म्हाडाकडे लेखी तक्रारी करतात, मात्र या तक्रारींना म्हाडाच्या अधिका-यांकडून केराची टोपली दाखवली जाते. दलाल व म्हाडाच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने रहिवाशांना न्याय मिळत नसल्याचा आरोप रहिवासी करतात.
संक्रमण शिबिरात गेली ३० ते ४० वर्षे झालेले हाल आणि पिळवणुकीची भरपाई म्हणून म्हाडाने जास्त फुटांचे घर द्यावे, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही संक्रमण शिबिरांच्या ठिकाणीच हक्काची घरे देण्याची घोषणा केली होती. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही हक्काच्या घराबाबत घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्याच्या प्रतीक्षेत संक्रमण शिबिरांतील रहिवासी दिवस कंठत आहेत.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरांत निम्म्याहून अधिक घुसखोर आहेत. त्यांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. पुनर्विकास करताना अशा घुसखोरांवर कारवाई करण्यात येईल. मोठया प्रमाणात घुसखोरी असल्याने त्यांना बाहेर काढताना धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. सध्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रक्रिये दरम्यान अशा घुसखोरांना बाहेर काढले जाईल.
मोहन ठोंबरे, म्हाडाच्या दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी
म्हाडाने रहिवाशांना ३० ते ४० वर्षे संक्रमण शिबिरांत ठेवून त्यांच्या हक्काच्या घरांपासून दूर ठेवले आहे. मोडकळीस आलेल्या संक्रमण शिबिराचा पुनर्विकास खासगी विकासकांकरवी करून घेण्यास म्हाडाने परवानगी द्यावी. यातून अधिकृत रहिवाशांना मोठी घरे मिळू शकतील. शिबिरांतील घुसखोरांना त्वरित बाहेर काढावे. म्हाडाच्या दोषी अधिका-यांवर कारवाई करावी.
अभिजीत पेठे, अध्यक्ष, संक्रमण शिबिर वेल्फेअर असोसिएशन
mi pan kahi varsha hya transist camp chi rahiwashi hote.. lahan ghar pan self contain tehi kami bhadyat , agent ani mhada adhikaryanche sate lote aste ,…light bill ani ration card banvun ghenyat madat karnare aapli marathi dalal astat…. baghun ascharyach vatayche ??? thodya paishyasathi hi lok kiti sopya padhatit ek room agdi swastat navaavar karun detat te pan konalalhi… he sarva thambale pahije…