जात्यावर दळताना ती कधीच गप्प दळायची नाही. सुंदर ओव्या गात ती दळायची. त्यात आध्यात्मिक, सामाजिक संदेश असायचा. ज्या काळात दळण सुरू असेल त्या काळाचं प्रतिबिंब तिच्या जात्यावरच्या ओव्यात असायचं. शाळेचा दरवाजा कधी न पाहिलेल्या, एक अक्षर माहीत नसणा-या रखमामायच्या जात्यावरच्या ओव्या हृदयस्पर्शी असायच्या. आषाढीची वारी निघाली की तिच्या मुखातून शब्द बाहेर पडायचे..
‘‘भाऊ तुझी रखमामाय गेली..’’ फोनवरील धाकटया भावाचे शब्द कानावर पडले आणि मन सुन्न झालं. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. प्रत्त्युतर देण्यासाठी शब्द सुचले नाहीत. मोबाइल बंद केला. ९२-९३ वर्ष जगली ती. अजून किती दिवस तिने दु:खाचे डोंगर पेलायचे होते. मनाची समजूत काढून डोळे टिपले.
कोण होती ती माझी? जिच्यासाठी माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हाव्यात. माझ्यावरच काय? साऱ्या गावावर तिचं ऋण होतं. सगळ्यांसाठी ती खपली होती. राबली होती. मी मात्र तिच्याशी नातं जपलं होतं. मला तिच्यात माझी आजी दिसायची. दोघी दिसायला सारख्या होत्या आणि दोघींचा एकमेकींवर खूप जीव होता. आमच्या घरातला कोणताही सण तिच्याशिवाय साजरा होत नव्हता की, पै पाहुणे आल्यास तिच्याशिवाय आजीचं पान हालत नव्हतं. माझी आजी लवकर गेली, परंतु तिची उणीव काही प्रमाणात रखमामाईने भरून काढली. आईला जास्त काम असलं की, ती खुशाल मला रखमामाईकडे सोपवायची. खपली निघावी आणि जखम भळभळून वाहवी तशा आठवणी झिरपू लागल्या.
गावाच्या शेवटच्या टोकाला आमचं घर होतं आणि रस्ता ओलांडला की पलीकडे रखमामाईचं. तिची पाच बाळंतपण झालेली, पण वाचलं एकच लेकरू नामदेव. नामदेवाच्या जन्मानंतर काही दिवसांतच पतीचं निधन झालेलं. नामदेवही पुढे कामानिमित्त शहरात निघून गेलेला. रखमामाय एकटीच राहायची. पाच खणाच्या धाबडयाचं घरं आणि पुढे पत्र्यांची पडवी. घरापुढे मोठं अंगण आणि त्याला नुसते दगड रचून केलेलं कपाउंड. अंगणात शेवगा, हादगा, लिंबू, चिंच, पपई, गुलाब आणि कन्हेरीची झाडं. दगड-मातीचं घरं परंतु सारवून नीट-नेटकं ठेवलेलं. गावातील कुणाच्याही घरात लग्न, साखरपुडा, बारसं असो नाही तर दहावं किंवा तेरावं असो. रखमामाई तिथे राबायला असायची. दळणा-कांडणापासून साफसफाईची कामं ती करायची.
माझ्यावर तिचा खूप जीव होता. मी खूप शिकावं. संस्कारी राहावं. नाम कमवावं, असं तिला वाटायचं. म्हणून मला ती धाकात ठेवायची. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वाचाच ती आदराने आहो-जाहो असा उल्लेख करायची. गावात तीनच माणसं अशी होती, त्यांचा उल्लेख ती एकेरीने करायची. ज्यात माझे वडील, मी आणि तिचा मुलगा नामदेव. तिचा मला किती धाव होता, याचं एक उदाहरण मला मुद्दाम इथे द्यावंसं वाटतं.
गावात सखाराम-चमेलीचा ढोलकीचा तमाशा आला होता. त्यांच्या तमाशात एक नवीन तरुणी सहभागी झाली होती. पंधरा-सोळा वर्षाची निटस-देखणी सरू. गावाला लागून असणा-या किसनराव आगलाव्यांच्या अंबेराईत त्यांनी तंबू थाटला होता. रात्रीच्या तमाशाला आलेल्या तरुणांकडून सरूच्या रूपाची आणि नाचाची जोरात चर्चा गावातील तरुणांमध्ये सुरू होती. काही तरी निमित्त काढून तिला पाहण्यासाठी तरुणांच्या झुंडी अंबेराईत फे-या मारत होत्या. एका झुंडीत सहभागी होऊन मीही अंबेराईत गेलो. त्याच वेळी नदीवर धुणे धुण्यासाठी रखमाय तिथून जात होती. तंबूभोवती मला घुटमळताना तिने पाहिलं आणि तिचा पार चढला. चवताळून माझ्या अंगावर येत तिने मला तिथून पिटाळून लावलं. मीही खजील होऊन तिथून काढता पाय घेतला.
संध्याकाळी मला घरी बोलावून म्हणाली, ‘‘तू चांगल्याचं लेकरू हायइस. तिथं जाणं चांगलं नाही. खबरदार मला पुन्हा तिथं दिसलास तर?’’ केवढा अधिकार होता तिचा माझ्यावर. म्हणूनच ती माझी ‘माय’ होती.
कष्टाचे डोंगर उपसताना तिच्या चेह-यावर कधी थकवा जाणवला नाही. सदा हसतमुख असायची. तिचा आवाजही गोड होता. जात्यावर दळताना ती कधीच गप्प दळायची नाही. सुंदर ओव्या गात ती दळायची. त्यात आध्यात्मिक, सामाजिक संदेश असायचा. ज्या काळात दळण सुरू असेल त्या काळाचं प्रतिबिंब तिच्या जात्यावरच्या ओव्यात असायचं. शाळेचा दरवाजा कधी न पाहिलेल्या, एक अक्षर माहीत नसणा-या रखमामायच्या जात्यावरच्या ओव्या हृदयस्पर्शी असायच्या. आषाढीची वारी निघाली की तिच्या मुखातून शब्द बाहेर पडायचे..
आषाडीच्या वारीसाठी
बंधू पंढरीला गेला
हिरव्यागार शेतामंदी
इठू डोलाय लागला
आषाढीच्या वारीला भाऊ गेला तरी तिच्या शेताची काळजी पांडुरंग घेतो, हा सासरवाशिणीचा विश्वास तिच्या ओव्यातून व्यक्त व्हायचा. लग्नाची हळद दळायची तेव्हा दोघी विहीणबाईंचा संवाद तिच्या जात्यावरच्या ओव्यातून व्यक्त व्हायचा. एक ओवी नवरदेवाची आई म्हणून असायची, ती तर एक ओवी मुलीची आई म्हणून आसायची. लग्न करून सासरी जाणा-या मुलीच्या आईची वेदना मांडताना रखमामाय म्हणायची-
लेक माजी नाजूक
जसं जाईचं वो फूल
नीट जपाबाई तिला
माफ करा चूकभूल
मग मुलाच्या आईच्या भूमिकेत शिरून ती म्हणायची,
आव आव इनबाई
घोर करिता कशाला
सून नव्हं ती तमाझी
आली लक्ष्मी घराला
लग्न होऊन सासरी गेलेल्या सासरवाशिणीला माहेराची ओढ कशी लागायची हे मांडताना ती म्हणायची..
आला दिवाळीचा सण
बंधू मुराळी वो आला
ढवळया-पवळयाची डमणी (नक्षीदार कशिदा काढलेल्या बैलांचा डांगा)
उभी राहिली दाराला
मामा आणि भाच्यामधील प्रेम दाखवताना ती म्हणायची,
मामा-भाच्याची वो झोंबी
झोंबी लाविली जणांनी
भाच्या तुझी कवळी शिण
लवती घेतली मामांनी
म्हणजे लोकांनी मामा-भाच्याची कुस्ती लावली. परंतु भाच्याचं कोवळं वय (शीण) लक्षात घेऊन मामाने स्वत: माघार घेतली. दळायला लागली म्हणजे केवळ पीठच नव्हे तर ओव्याच्या माध्यमातून अवीट काव्य बाहेर पडायचं.
गाव सोडून मुंबईला आल्यानंतरही जेव्हा जेव्हा गावाला जाणं होईल, तेव्हा तिला आवर्जून भेटायला जायचे. मी गेलो की माझ्या तोंडावरून तिचे खरखरीत हात फिरायचे आणि मग दोन्ही कानशिलावर ठेऊन ती कडकडा बोटं मोडायची. अलीकडेच तिचा मुलगा नामदेव गावाला आला होता. त्याचा मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर त्यानेच वडिलांना गावाला पाठवले. मुलगी आणि पत्नीसह तो रखमामाईसोबत राहू लागला. असाच एकदा घरी गेलो तेव्हा रखमामाईला विचारलं, ‘‘माय तुझ्या नातीला शिकविलीस का, नाही जात्यावरची गाणी?’’ (ओव्यांना ती गाणी म्हणायची) तेव्हा खळखळून हसत ती म्हणाली, ‘‘तिला काचेयेतेतबाबा जात्यावरचे गाणे. तिलाच काय आता कोंच्याच पोरीला जात्याची गाणी येणार न्हाईत. येतेलबी कसे?’’
‘‘का न्हाई येणार? माय या पोरी तर तुझ्यापेक्षा शाळा शिकलेल्या आहेत. त्यांना का येणार नाही?’’
‘‘अरं साळा शिकून पुस्तक वाचाय येईल. हिसाब कराय येईल. पण गाणं लला येणार न्हाई.’’
‘‘पण त्यांना का न्हाई येणार?’’ माझा प्रश्न.
तिचा चेहरा एकदम गंभीर झाला. ती म्हणाली, ‘‘बाबा गाणं व्हटावर येयला काळीज तुटावं लागतं. आताच्या पोरीला काय दुक हाय का. कशाला येईल त्येयला गाणं. आरं लगीन झाल्यावर आम्ही नांदाला आलो तर पंचमीपोस्तोर माहेरचं नाव काढाय मिळायचं नाही. माहेरचा निसता माणूस दिसला काळीज गाडग्यावाणी व्हायचं. पण त्याला बोलायचीबी चोरी असायची. एखादा जवळचा नातेवाईक भेटला तर देव भेटल्यावाणी वाटायचा. दिवाळी-पंचमीला माहेरायला जायला मिळायचं. आरं बैल गाडीत बसलेली पोरगी पाहिली की कळायचं, ती माहेरायला जातेय का सासरला जातेय ते. ती जर बैलाकडं तोंड करून बसलेली असलं तर समाजाचं माहेरायला चालली. तीच जर गाडीच्या मागे तोंड करून बसलेली असली तर समाजावं की, सासराला चालली. इतकी बंधन होती म्हणून ते दुक मग जात्यावर बसलेल्यावर बाहीर पडायचं. आताच्या पोरीला काई तरासच नाही. आम्हाला नांदायला गेलं तर सहा म्हने गावची खबर कळायची नाही. आता पोरगी माहेराहून नांदायला निघाली तर सासरी पवचुस्तर सहा यळला मोबाइल करती. आता इथं पवचले.. आता तिथं पवचले. आता दळण नाही, कांडण नाही. पाणी भरणं नाही. सगळं सोपं झालं. कशाला येईल गाणं व्हटावर.’’ जात्यावरच्या ओव्यांमागची प्रेरणा तिनं सांगितली.
गेल्या दोन-चार वर्षात खूप ती खंगली होती. गावाला गेलो की तिला भेटायला जायचो. तिचा खरखरीत हात तोंडावर फिरला की नवी ऊर्जा मिळायची. ही ऊर्जा आता कायमची अनंतात विलिन झाली आहे.
Apratim lekh!!! Manapasun avadlaa.