भारतीय जनता पक्षावर उद्या विधानसभेत बहुमत सिध्द करण्याची वेळ आली तर, आपल्या पक्षाचे आमदार अनुपस्थित रहातील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
मुंबई – भारतीय जनता पक्षावर उद्या विधानसभेत बहुमत सिध्द करण्याची वेळ आली तर, आपल्या पक्षाचे आमदार अनुपस्थित रहातील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील भूमिका स्पष्ट केली.
विधानसभेत बहुमत सिध्द करताना, राष्ट्रवादी काँग्रेसने तटस्थतेची भूमिका घेतली तर, सहज भाजपचे स्वबळावर सरकार स्थापन होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचे सरकार स्थापनेतील महत्व कमी होऊन, एकप्रकारे कोंडी होत आहे.
भाजपला न मागताच पाठिंबा का दिला ? यावर प्रश्नावर पवार म्हणाले की, आम्ही कोणाचे समर्थनही करत नाही कि, विरोधही करत नाही. विधानसभेत बहुमत सिध्द करण्याची स्थिती ओढवलीच तर, आम्ही तटस्थतेची भूमिका घेऊन राज्यात स्थिर सरकार आणण्यामध्ये मदत करु शकतो. महाराष्ट्रात सद्य स्थिती कायम राहिली तर, पुन्हा सहा महिन्यात निव़डणूका घ्याव्या लागतील. आम्हाला राज्यात स्थिर सरकार आले तर, आनंद होईल. शिवसेना आणि भाजप सरकार स्थापनेसाठी अजूनही एकत्र येण्याची चिन्हे दिसत नाहीत.
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होऊ नये यासाठी राष्ट्रवादी भाजपला न मागताच पाठिंबा देत आहे हा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जाहीर विरोध करणा-या शिवसेनेने आता सपशेल माघार घेतली आहे. आपल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही हे शिवसेनेला कळल्यामुळे अखेर शिवसेनेने सत्तेसाठी तडजोड करण्याची तयारी दाखवली आहे. भाजप महाराष्ट्राची धुरा ज्या नेत्याच्या हाती सोपवेल त्यांना पूर्ण सहकार्य करु असे शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून स्पष्ट केले आहे.
अब आया ” उंट ” पहाडके नीचे !!!