सध्या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. त्यात कित्येक तरुण मंडळी सतत नवनवीन नोकरीच्या शोधात असतात. पण, नवीन नोकरी मिळवणं म्हटलं तर तसं कठीण काम असतं. कारण ती नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणारे आपण एकटेच नसतो. तर आपल्यासारखेच कित्येक तरुण मुलाखतीसाठी आलेले असतात. त्या सगळ्यांमधून आपलीच निवड कशी होईल ? याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने काही महत्त्वाच्या मुद्दय़ांचा आपण विचार करणार आहोत.
करिअरचा आलेख उंचावण्यासाठी तुमच्याकडे उत्तम शिक्षण आवश्यक असतं. त्याचप्रमाणे तुमची वर्तणूकही चांगली असणं आवश्यक असतं. विशेषत: नवी नोकरी शोधताना काही?गोष्टींचं पालन करणं आवश्यक असतं. त्यासाठी काही गोष्टी अंगी बाळगायलाच हव्यात.
ऑनलाइन नेटवर्किंग
सध्याचा जमाना हा ऑनलाइनचा जमाना आहे. तुम्हाला वाटेल ऑनलाइनचा नोकरीशी काय संबंध? पण फेसबुक, लिंकड्इन यासारख्या संकेतस्थळांशी तुम्ही जोडले गेलेले असालच. तर या सोशल नेटवर्किंग साइट्सवर तुमच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांच्या संपर्कात राहा. त्यामुळे तुमच्या क्षेत्रात कुठे संधी आहे? याची आपोआपच माहिती मिळत जाते. पण, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत संपर्कात असताना तुमच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी तुमच्या प्रोफाइलमधून बाद करा. उदाहरणार्थ, कौटुंबिक किंवा वैयक्तिक फोटो. कारण हे लक्षात ठेवा की, सोशल नेटवर्किंग म्हणजे एक प्रकारची कॉकटेल पार्टीच असते. त्यावर तुम्ही स्वत:चंच कौतुक करत बसाल तर तुमच्या संपर्कातील व्यक्तींना त्याचा कंटाळाच येईल. म्हणूनच नुसते फोटो अपलोड करण्यापेक्षा संवाद किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न करा.
ध्येय निश्चित करा
तुमच्यातल्या कलागुणांना ओळखा. सर्वात प्रथम कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना ती नोकरी तुम्हालाच कशी मिळेल, याचा विचार करा. कारण सध्याचं जग स्पर्धेचं जग आहे. एखाद्या ठिकाणी तुमच्याप्रमाणेच कित्येक मंडळी नोकरीला आली असतील. मग त्यांच्यापेक्षा आपण कसे वरचढ ठरू ? याचा विचार करा. याचा विचार केल्यास मुलाखतीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला नवीन मुद्दे सुचतील.
तारतम्य बाळगा
तुम्ही एका नोकरीत राहून दुसरी नोकरी बदलायचा विचार करत असाल तर त्याची वाच्यता कार्यालयात करू नका. कदाचित सद्यस्थितीत असलेल्या नोकरीतच तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. एक लक्षात ठेवा की, तुम्ही दुस-या नोकरीसाठी अर्ज केला आहे, ही गोष्ट कदाचित तुमच्या काही सहका-यांना रुचणारी नसेल. त्याचा परिणाम तुमच्या चालू नोकरीवरही होऊ शकतो. परिणामी, कदाचित तुमच्यावर नोकरी गमावण्याचीही वेळ येईल.
घोडचूक टाळा
बहुतेक जण त्यांचा रेझ्युम लिहिताना घोडचूक करतात. कित्येक जण खूप पाल्हाळिक लिहितात. महाविद्यालयीन गुणवत्तेविषयी भरपूर लिहिलेलं असतं. तर कित्येकदा साध्या साध्या शब्दांमध्ये व्याकरणाच्या चुका केलेल्या असतात. या गोष्टी लहान वाटत असल्या तरी या सगळ्या गोष्टींचा वाइट प्रभाव पडू शकतो. यासारख्या लहान लहान चुकांमुळे नोकरी तर सोडाच, पण तुम्ही मुलाखतीपर्यंतही पोहोचू शकणार नाहीत.
फोनवर बोलण्याची तयारी ठेवा
तुमची मुलाखत फोनवर होणार असेल तर तुमच्या समोर तुमचा रेझ्युम आणि तुम्हाला कोणते मुद्दे सांगायचे आहेत, ते तुमच्यासमोर असणं गरजेचं आहे. तसंच नोट्स घेण्यासाठी एक पेन आणि काही कागदही समोर ठेवावेत. फोनवर बोलताना तुमचा आवाज खणखणीत आणि तुमचे उच्चार स्पष्ट असतील, याची खबरदारी घ्या. फोनवर बोलताना उभं राहून किंवा चेह-यावर हास्य ठेवून बोला. या गोष्टी समोरच्याला दिसत नाहीत. पण, आपल्या आवाजावर याचा कुठेतरी परिणाम होत असतो. कसं बोलायचं याचा सराव करा. मुलाखतीला कसं बोलावं याचा सराव करताना कित्येक जण आरशासमोर उभं राहून सराव करतात. पण, त्यापेक्षा हा सराव आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा घरच्यांसमोर करावा. ते अधिक फायदेशीर ठरतं.
मुलाखतीपूर्वी माहिती जमवा
तुम्ही ज्या कंपनीत अर्ज केला आहे, त्या कंपनीची प्रथम संपूर्ण माहिती मिळवा आणि त्यानुसार साधारण काय प्रश्न विचारले जाऊ शकतील, याची माहिती मिळवा. तुमची मुलाखत कोण घेणार आहे, जमल्यास त्या व्यक्तीचं नाव विचारा आणि त्याची ऑनलाइन माहिती काढा. मुलाखत संपल्यानंतर त्यांना थँक्सचा मेसेज करायला विसरू नका.
स्पष्ट बोला
तुमच्यात कोणती कमतरता आहे, याची प्रथम स्वत: माहिती करून घ्या. मुलाखतीच्या वेळी ‘तुमच्यातली कमतरता (वीकनेस) काय’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. त्यावर ‘काहीच नाही’ असं उत्तर देण्याची चूक करू नका. तुमच्यात जे काही कमी आहे, ते स्पष्ट सांगा. त्याचबरोबर त्या कमतरतेवर तुम्ही मात कशी कराल, याविषयीही सांगा. अशा काही सामान्य प्रश्नांची पूर्वतयारी करून ठेवा.
संयम ठेवा
एक लक्षात ठेवा, तुम्ही अर्ज केलेली कोणतीही नोकरी शेवटची नसते. त्यामुळे सतत तिथल्या मॅनेजरला फोन अथवा ई-मेल करून नोकरी मिळण्याबाबत विचारू नका. त्यामुळे चुकीची प्रतिमा निर्माण होते. केवळ आभार प्रदर्शनाचे दोन शब्द आणि निरोप मिळेपर्यंत संयम या दोन्ही गोष्टींचा फायदा होऊ शकतो.
पहिली नोकरी सोडताना
तुम्हाला नवीन नोकरी मिळाली म्हणजे तुमचे हात आकाशाला पोहोचले, असा समज करून घेऊ नका. काही कंपन्यांमध्ये महिना किंवा पंधरा दिवस आधी तुम्ही नोकरी सोडत आहात, हे कळवणं आवश्यक असतं. त्यांची तशी पॉलिसी असते. पहिल्या कंपनीच्या पॉलिसीचं भान ठेवून त्याप्रमाणे अगोदर तिथे त्यांना नोकरी सोडण्याविषयी कल्पना द्या. तुमच्या सहका-यांना विश्वासात घेऊन नोकरी सोडत असल्याचं कळवा. तुमची प्रलंबित कामं मार्गी लावा. तुमच्या जागी येणा-या व्यक्तीला उत्तम मार्गदर्शन करा. शेवटच्या दिवसापर्यंत काम करा.
पगाराबाबत स्पष्ट बोला
तुम्ही अर्ज केलेल्या पदाला किती पगार आहे, याची संकेतस्थळावरून माहिती करून घ्या. म्हणजे तुम्हाला पगाराची अपेक्षा विचारतील तेव्हा तुम्हाला तुमच्या अपेक्षा स्पष्ट सांगता येतील.
चांगली सुरुवात करा
तुमच्या नवीन नोकरीच्या पहिल्या आठवडय़ात तुम्हाला तुमच्या सहका-यांकडून विविध प्रश्न विचारले जातील. कोण काय विचारतंय? याकडे नीट लक्ष द्या. तसंच पहिल्याच महिन्यात तुमच्या बॉसच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कामाला लागा. मोठया गोष्टींचा विचार करा. ज्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील.
ब्लॉग लिहिताना..
तुमचा स्वत:चा ब्लॉग असेल तर त्यावर तुमच्या कामाविषयी लिहिण्याचं टाळा. तसंच ऑफिसचा वेळ ब्लॉग लिहिण्यासाठी वापरू नका. तुमच्या ब्लॉगसाठी एक पासवर्ड निश्चित करा. म्हणजे तुम्हाला हवी असलेलीच माणसंच तुमचा ब्लॉग पाहू शकतील.
कौतुक आणि ओरडाही
तुमच्या टीमबरोबर एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल आणि ते काम उत्तम होत असेल तर कौतुक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे काही चुकलं तर ओरडायलाही विसरू नका.
पदोन्नती मागताना
काम केल्यावर पदोन्नती मिळावी, अशी सगळ्यांनाच अपेक्षा असते. पदोन्नतीसाठी विचारणा करण्यापूर्वी अधिकाधिक काम करायला मागा. असं काम जे कोणीच करायला धजावत नसेल. यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी उत्तमरित्या पेलू शकता, याची तुमच्या बॉसला कल्पना येईल.
मला नोकरीची खुप खुप गरज आहे तरी असल्यास माझ्या मेलवर कळवावे