अहमदनगर – शेतक-यांच्या मुलांनी नोकरीमागे धावण्यापेक्षा कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊन नव्या पद्धतीने काळ्या आईची सेवा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड तालुक्यातील हळगाव येथे केले.
अहिल्याबाई होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने शेतक-यांना कायमच अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकार मदत देण्यासाठी सदैव तत्पर आहे. आघाडीच्या सरकारने पंधरा वर्षात केली नाही, एवढी मदत युतीच्या सरकारने गेल्या तीन वर्षात शेतक-यांना केली आहे.
मात्र, शेतकरी केवळ मदतीवर अवलंबून राहू नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच त्यांना नवे तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. ग्रामीण भागात कृषी महाविद्यालये सुरू करण्यामागे हाच उद्देश आहे. जामखेडनंतर श्रीगोंदा तालुक्यातही कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयांतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान शिकविले जाणार आहे. शेतक-यांच्या मुलांनी हे शिक्षण घेतले पाहिजे. शिकलेल्या मुलांनी नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतीत नवे प्रयोग करून पारंपरिक शेतीची पद्धत मोडून काढून प्रगतीची वाट धरली पाहिजे.’
‘जलयुक्त शिवार योजनेचे चांगले परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. एकटय़ा नगर जिल्ह्यात यासाठी एक हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. त्यातून एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून नगर जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. केंद्र सरकारचे भारत बटालियम जामखेड तालुक्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया सुरू असून ते कामही लवकरच मार्गी लागणार आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
शेतमालाला योग्य भाव मिळाला तर नोकरीच्या पाठीमागे लागणारी मुलेही शेतीकडे लक्ष देतील आणि शहराकडे धावणारी गर्दी कमी होईल .
मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांच्या मुलांनीच कृषी अभ्यासक्रम करावा असा उल्लेख का केला आहे.
इतर व्यवसायिक कृषी अभ्यासक्रम पूर्ण करून शेतकरी बनू शकत नाहीत का?