बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासाला ज्या व्यक्तिमत्त्वांची नोंद कायमची करावी लागेल, त्यात बाळासाहेब ठाकरे यांना वजा करणे शक्यच नाही. त्यांनी शून्यातून संघटना निर्माण केली. जगातल्या कुठल्याही संघटनेचा एक नेता सलग ४५ वर्षे त्या संघटनेचा प्रमुख मिळणार नाही. ते फक्त बाळासाहेब ठाकरेच होते.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासाला ज्या व्यक्तिमत्त्वांची नोंद कायमची करावी लागेल, त्यात बाळासाहेब ठाकरे यांना वजा करणे शक्यच नाही. त्यांनी शून्यातून संघटना निर्माण केली. जगातल्या कुठल्याही संघटनेचा एक नेता सलग ४५ वर्षे त्या संघटनेचा प्रमुख मिळणार नाही. ते फक्त बाळासाहेब ठाकरेच होते. एक नेता, एक संघटना, एक मैदान, त्याच नेत्याचे भाषण, इतिहासाच्या दृष्टीनेही हे सगळे विलक्षण आहे. ही किमया महाराष्ट्रामध्ये त्यांनी करून दाखवली. मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाची चाहूल त्यांना ज्या क्षणाला लागली, त्या क्षणीच त्यांच्या मनात एका नेत्याचा उदय झाला होता. त्या नेतृत्वाची सुरुवात एका महान व्यंगचित्रकारातून झालेली आहे. टाइम्स ऑफ इंडियात व्यंगचित्र रेखाटणारे आर. के. लक्ष्मण खूपच मोठे. कारण त्यांच्या भाषेचे माध्यम मोठे. ‘कॉमन मॅन’ सगळय़ा देशात लगेच समजतो.
बाळासाहेबांचा सामान्य माणूस समजायला मराठी भाषेत खूप मर्यादा आहेत; पण बाळासाहेबांनी चितारलेली रेघ किंवा त्यांचा कुंचला हा आर. के. लक्ष्मण यांच्या तोडीस तोड होता, हेसुद्धा इतिहासाला मान्य करावे लागेल. या संपादकीय पानावर बाळासाहेबांची काही व्यंगचित्रे मुद्दाम प्रसिद्ध केली आहेत. आजच्या ग्लोबल जगात वृत्तपत्रीय क्षेत्रात व्यंगचित्रांना तेवढे महत्त्व राहिलेले नाही, जेवढे आर. केंच्या काळात होते, बाळासाहेबांच्या काळात होते. व्यंगचित्राच्या कुंचल्यातून ज्याचे चित्र?उतरले त्याचा चेहरा तर हुबेहुब असलाच पाहिजे; पण त्यातले व्यंगही नेमके असले पाहिजे. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींचे नाक, पंडित नेहरूंचा चेहरा, महात्मा गांधींचा चेहरा किंवा शरद पवारांच्या पोटाचा घेर हे सगळे हुबेहुब आहे. यशवंतराव चव्हाण जेव्हा संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जायला निघाले तेव्हा नुकताच निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्याला दोन वर्षे झाली होती. ते दोन वर्षाचे महाराष्ट्राचे पोर कन्नमवारांच्या कडेवर देऊन बाळासाहेबांनी यशवंतरावांच्या तोंडी एक छोटे वाक्य टाकले. ‘येतो मी. नीट सांभाळा बरं याला’ या चित्रातले नेमके पण मनाला भिडणारे शब्द आहेत. सेनापती बापट उपोषणाला बसले आणि बेळगाव-कारवार सीमेचा प्रश्न १९६६ साली एकदम तापला. सेनापतींचे प्राण पणाला लागले होते. सेनापतींना इंदिराजी सांगताहेत, ‘इतका वेळ थांबलात, थोडा वेळ थांबा.’ सेनापती इंदिराजींना सांगताहेत ‘तुमच्या घडय़ाळात बाई काटेच नाहीत.’
व्यंगचित्रकाराला केवळ चेहरा जमून किंवा रेषा जुळून काम जुळत नाही. त्या चित्रात नेमके व्यंग असायला पाहिजे. बाळासाहेबांच्या प्रत्येक चित्रात हे व्यंग ठसठशीतपणे भरलेले आहे. देशात ज्या काळात महागाईवरून आंदोलने सुरू होती, त्यावेळी महागाईच्या महापुरात इंदिराजी आणि यशवंतराव चालताना बाळासाहेबांनी दाखवले. धो धो कोसळणाऱ्या पावसात इंदिराजींनी छत्री उघडली, ती उघडलेली छत्री पाहून महाराष्ट्राला त्यावेळी मोठा ठसका लागला. बाळासाहेब नुसते व्यंगचित्र काढायचे नाहीत तर व्यंगचित्राचे विश्लेषण करायचे. सामान्य वाचक वृत्तपत्रांच्या बातम्यातल्या ओळी वाचतात. बाळासाहेब सांगायचे, ‘मी ओळींच्या मधलं वाचतो. त्यातून त्यांचं चित्र?तयार होतं.’ व्यंगचित्रकाराने भल्या भल्या हुकुमशाहांना आणि राजकारण्यांना घाम फोडला. डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रामुळे हिटलर हैराण झाला होता. त्याने फर्मान सोडले की, डेव्हीड लो ला जिवंत किंवा मेलाला हजर करा. हा किस्सा सांगून बाळासाहेबांनी लिहून ठेवले आहे की, १०० अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते. बाळासाहेबांचे ते म्हणणे शब्दश: खरे आहे.
व्यंगचित्र शिकण्यासाठी बाळासाहेब कोणत्या शाळेत गेले नाहीत. स्कूल ऑफ आर्ट्ससुद्धा त्यांच्यापासून दूर होते. त्यांनी व्यंगात्मक भाष्य करताना असे सांगितले आहे की, ‘जर स्कूल ऑफ आर्ट्सला मी गेलो असतो तर व्यंगचित्रकार झालोच नसतो. कारण या कलेच्या शाळेत जेवढे जातात, त्यातले किती व्यंगचित्रकार होतात किंवा चित्रकार होतात?’ बाळासाहेबांचे निरीक्षण एकदम नेमके आहे आणि ते समजून घेतले पाहिजे. चित्रकार किंवा व्यंगचित्रकार हा उपजतच असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळा शिकवेल; पण उपजत कला ही कोणत्याही शाळेत न जाताच शिकवली जात असते. बाळासाहेबांना हे सगळे उपजतच येत गेले. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हेही चित्रकारच होते. त्यांनीच बाळासाहेबांमधला हा उपजत गुण ओळखला. त्यामुळे व्यंगचित्रातले बाळसाहेबांचे पहिले गुरू हे त्यांचे वडील आहेत, हे बाळासाहेबांनी कधीच सांगून टाकले आहे. त्यानंतर दीनानाथ दलाल आणि डेव्हीड लो यांना बाळासाहेबांनी गुरूस्थानी मानले.
प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यासोबत बाळासाहेबांनी काम केले आहे. ५०-५५ वर्षापूर्वी त्या वेळचा ‘फ्री प्रेस जनरल’ आणि नंतर ‘मराठा’ या दैनिकांमधील बाळासाहेबांची व्यंगचित्रे महाराष्ट्राला स्तिमित करून गेलेली आहेत. बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ साप्ताहिक सुरू केले. त्यातली ‘रविवारची जत्रा’ ही घराघरात सामुदायिकपणे पाहिली जायची. ‘मार्मिक’चा जन्मदिन १३ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट ही तारीख आचार्य अत्रे यांचा जन्मदिन. आचार्य अत्रे यांच्याबरोबर पुढे त्यांचे खूप वाद झाले तरी ही दोन्ही माणसे महाराष्ट्रासाठी अणि मराठी माणसासाठी योद्धय़ासारखी लढली आहेत, याची नोंदही इतिहासाला घ्यावी लागेल. बाळासाहेब मनाने निर्मळ होते. वाद केले, वार केले तरी त्यांच्या मनात कोणाबद्दलही कधीही द्वेष नव्हता. आचार्य अत्रे यांच्याशी त्यांचा उभा वाद झाला होता;
पण आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर त्यांचे मोठेपण बाळासाहेबांनीच सांगितले. एवढेच नव्हे तर युतीचे राज्य आल्यानंतर वरळीच्या नाक्यावर आचार्य अत्रे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात बाळासाहेबांनीच पुढाकार घेतला. त्या पुतळय़ाचे उद्घाटनही बाळासाहेबांच्याच हस्ते झाले. एक नेता, एक वक्ता, एक पत्रकार, एक व्यंगचित्रकार अशी बाळासाहेबांची अनेक रूपे महाराष्ट्राला भावली; पण त्याचवेळी सत्तेपासून दूर राहून कुठल्याही पदावर न राहता बाळासाहेबांनी एक वेगळा सोपान महाराष्ट्राला दाखवला. बाळासाहेबांचे मोठेपण ज्या अनेक कारणांमुळे आहे त्यात हेही एक कारण आहे. आजच्या त्यांच्या जन्मदिनी बाळासाहेबांना अभिवादन.
खूप छान लेख . धन्यवाद