नवीन शिधापत्रिका काढणे, नाव कमी करणे, नवीन नावाची नोंद करणे इत्यादीसाठी करण्यात आलेले अर्ज काही शिधा कार्यालयात गेल्या तीन ते सहा महिन्यांपासून पडून आहेत.
मुंबई- नवीन शिधापत्रिका काढणे, नाव कमी करणे, नवीन नावाची नोंद करणे इत्यादीसाठी करण्यात आलेले अर्ज काही शिधा कार्यालयात गेल्या तीन ते सहा महिन्यांपासून पडून आहेत. निवडणुकीचे काम आहे, असे कारण सांगितले जात होते. पण हे काम संपले तरी शिधापत्रिके साठी आलेले शेकडो अर्ज अद्याप पडूनच आहेत. शिधापत्रिकेचे काम कधी होणार, असे विचारल्यावर अधिकारी-कर्मचा-यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात, अशा तक्रारी काही शिधापत्रिकाधारकांनी केल्या आहेत.
शिधापत्रिका मिळण्यासाठी नियमानुसार रहिवाशांनी अर्ज केले. अर्ज केल्यानंतर साधारणत: १५ दिवसांच्या आत शिधापत्रिकेचे काम झाले पाहिजे, असा नियम आहे. पण या नियमाची अमलबजावणी केली जात नाही. आम्ही कळवू, महिनाभरानंतर या, तुमचा अर्ज सापडत नाही, पुन्हा अर्ज द्या इत्यादी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
निवडणुकीची कामे असल्याचे कारण अर्जदारांनी समजून घेतले, पण त्यानंतरही शिधापत्रिके चे काम करण्यास टाळाटाळ केली जाते आहे. याच वेळी दलालांकडून काम केल्यास मात्र लवकर होते. चेंबूर, धारावी, वांद्रे, खार, कुर्ला, वडाळा आदी ठिकाणी काही रहिवाशांना सहा महिने किंवा त्याहूनही जास्त काळ शिधापत्रिका मिळत नाहीत.
शिधापत्रिकेतून नाव कमी करायचे असेल किंवा नव्या नावाची नोंद करण्याच्या साध्या प्रक्रियेसाठीही तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो, असे काही रहिवाशांनी सांगितले. विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही सुस्तावलेल्या अधिकारी-कर्मचा-यांकडून शिधापत्रिका देण्याबाबत दिरंगाई सुरूच असल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.
दरम्यान, ज्यांना शिधापत्रिको काढणे आवश्यक आहे, असे दलालांच्या कचाटय़ात सापडतात. सध्या दलालांकडून याचा फायदा घेतला जात असून, लवकर काम होण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना ७०० ते १००० रुपये मोजावे लागतात. ज्यांना एवढे पैसे देणे शक्य नाही, अशांना शिधापत्रिकेसाठी प्रतीक्षाच करावी लागते, अशा तक्रारी रहिवाशांच्या आहेत.
साहेब माझे कार्ड अहमदनगर जिल्ह्यातून नाशिक जिल्हात ट्रान्सफर केले , एक वर्षांपासून धान्य मिळत नाही ,
यावर काहीतरी पर्याय सांगा ,