आज गावागावात व्यसनमुक्तीचा वसा जपण्यासाठी मोहिमा काय, अभियान काय, की आणखी काय ..काही कागदोपत्री अभियान राबवतात तर काही अभियानापुरत्या मोहिमा घेतात.. मात्र आमच्या मुलखात अशी काही गावे आहेत त्यांची ग्रामदेवतांवर एवढी श्रद्धा आहे की, या देवाच्या नावाने गावाने एक व्रत घेतले आणि गावचा प्रत्येक जण व्यसनमुक्त झाला. हे वास्तव आहे घारपी गावातले !. अगदी अशीच परिसरातली तीन गावे आहेत. या गावात मद्यपान करणे निषिद्ध मानतात. या गावातच अशी बंदी आहे, असे नाही. तर गावातील कोणत्याही भागात राहणारी मंडळी हेच व्रत कसोशीने जपतात. लष्करातील सेवा म्हणजे शिस्तप्रिय सेवा. कडक आदेश आणि त्याची कडक अंमलबजावणीही. यात अनेक वेळा सैनिकांना मद्यपानाची सवय असतेच. परंतु, घारपीतील सैनिक याला अपवाद आहेत. लष्करातही सेवा बजावणारे या गावचे बांधव मद्याला स्पर्शही करत नाहीत. हे गावात केव्हापासून सुरू आहे हे सांगता येत नाही. ही कडवी परंपरा कशी सुरू झाली याबाबत सांगता येत नाही; मात्र गेल्या चार पिढय़ा हा वारसा कसोशीने जपत आहेत. पूर्वी देवाचे नाव घेऊन मद्य अथवा कोणताही नशिला पदार्थ सेवन न करण्याचा संकल्प केला जायचा ..पण
दारूबंदीसाठी राज्य सरकारने खास धोरण आखले आहे. दारू अड्डे नको असलेल्या गावांमध्ये ‘उभी बाटली आडवी’ करण्याचे अधिकार ग्रामसभेला दिले आहेत. तरीही अनेक गावात दारू अड्डय़ांचा सुकाळ रोखता आलेला नाही. काही भागात तर या दारूच्या महापुराबद्दल सातत्याने आंदोलने पेटत आहेत. या मदिरेमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
अनेक वेळा हीच दारू मने कलुषित करते आणि प्राणही घेते. दारूच्या महापुरात अनेक गावे काजळून गेली असताना, आमच्या मुलखात काही गावे आहेत ज्या गावांमध्ये दारूच्या थेंबाला स्पर्श करणेही निषिद्ध मानले जाते. दारू पिऊन गावाच्या सीमेवरून आत येणेही धोकादायक समजले जाते. गावात कुणाला यायचे असल्यास त्याने दारूला बाजूला ठेऊन यावे. मद्याच्या नशेत आल्यास दगाफटका होणारच अशी गाववासीयांची श्रद्धा आहे. याचा अनुभव अनेकांना वेळोवेळी आला आहे. या गावामध्ये दारू पिऊन जसे येणे धोकादायक मानले जाते, तसे गावातील कुणीही जगाच्या कुठच्याही कानाकोप-यात पोहोचला तरी दारू पित नाही.
गाववासीयांनी मद्याला स्पर्श करू नये असा अलिखित नियम आहे. ग्रामदेवतेच्या साक्षीने गाव वसवतानाच गाववासीयांना घेतलेल्या या प्रतिज्ञेनंतर गावाने अनोखा आदर्श जपला आहे आणि दारूमुक्तीचा वसा अनेकांना दिला आहे. घारपी, फणसवडे, उडेली या गावांमध्ये हा आदर्श कसोशीने जपला गेला आहे. अशा वेळी श्रद्धा ही महत्त्वाची ठरते. या देवतांच्या श्रद्धेनेच गावचे गावपण जपले आहे हे विसरून कसे चालेल?
मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा हे गोवा राज्याच्या सीमेपासून जवळचे गजबजलेले ठिकाण. या ठिकाणापासून २४ कि.मी. आत घारपी गाव वसले आहे. हे गाव म्हणजे सरपटणा-या प्राण्यांचे अभयारण्यच म्हणायला हवे. गावात निसर्गाची समृद्धता जेवढी आहे तेवढेच गाववासीयांचे कष्टही. डोंगरशेतीचा वारसा आजही येथे जपला जातो. गावात कुणीही दारू पित नाही; कारण असा कुणी पिण्याचा प्रयत्न केला तर गावची ग्रामदेवता क्रोधीत होते आणि त्याचा फटका गावाला बसतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
३६७ लोकवस्तीच्या असलेल्या या गावाची ग्रुपग्रामपंचायत फुकेरीलाच आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा भाग घारपी, उडेली आणि फुकेरी म्हणून प्रसिद्ध आहे. यातील घारपी भाग हा एका अनोख्या गूढशक्तीने भारलेला असेच म्हणायला हवा. गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडेच घनगर्द देवराई आहे. या देवराईत अनेक वनौषधींचा खजिना जसा पाहायला मिळतो, तशीच सरपटणा-या प्राण्यांचीही येथे वसाहतच दृष्टीस पडते. एरव्ही साप दिसल्यावर सामान्य माणसे घाबरून पळ काढतात. सरपटणा-या प्राण्यांची आजही अनेकांना दहशतच आहे. मात्र घारपीतली मंडळी या सरपटणा-या प्राण्यांना घाबरत नाहीत. सहसा या प्राण्यांवर कुणी हातही उगारत नाही.
घारपीतले गावडेकिनळ हा भाग शेतक-यांच्या कष्टाचे दर्शन घडविणारा भाग आहे. जंगलामध्ये नाचणी पीक आजही घेतले जाते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये शेतीसाठी जागा तयार करायची. मार्च, एप्रिलपर्यंत जमीन तयार करायची आणि मेच्या पहिल्या आठवडय़ात नाचणी पेरून पूर्ण करायची, अशी शेतीची पद्धत आहे. विशेष म्हणजे घारपीतील लोक शेती करताना, जंगलात राहतात. पण त्यांना कोणतीही भीती वाटत नाही. या भागात अस्वल, बिबटे, गवा रेडे, माकड यांचा मुक्तसंचार आहे. परंतु, यापासून आपल्याला कधीही धोका वाटत नाही. कारण ग्रामदेवतेला एकदा का साकडे घातले की कसलीच भीती वाटत नाही.
ती गावाच्या संरक्षणासाठी सज्ज असते, असे ग्रामस्थ सांगतात. वाफोली, विलवडे, कोनशी, तांबोळी या गावांतून पुढे असनिये गावात पोहोचावे. तेथून उजव्या बाजूने घारपीत थेट रस्ता जातो. घारपीचे प्रवेशद्वार म्हणजे ‘लोळण’ भाग, हे नावही चमत्कारिक. सह्याद्रीच्या कडेकपारीत असलेल्या या गावात लोळण म्हणजे एक मैदान आहे. येथे गावाची वेस सुरू होते. कुणी आपल्या प्रवृत्तीत अतिरेक केला तर या भागातच तो गुरफटून राहतो. मद्यपीही पुन्हा-पुन्हा येथेच फिरत राहतो. यामुळे या भागाला लोळण हे नाव पडले आणि ते प्रसिद्धही झाले. या भागातून प्रवेश करताना, दारूमुक्त होऊन जायला हवे, हे गेल्या कित्येक वर्षाचे धोरण आहे. यदाकदाचित कुणी अनाहूतपणे अथवा मुद्दामहून मद्य घेऊन गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास सीमेवर लोळण भागात चित्रविचित्र प्रकारांना सामोरे जावे लागते.
गावातल्या दारूमुक्तीच्या प्रकारावर अनेक घटना सांगताना प्रत्येकाला येत असणारी अनुभूती यामुळे पिढय़ान् पिढय़ा गाव कसे गाव व्यसनमुक्त राहिले हे स्पष्ट होते. गावात ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी गावातील मंडळींची समजूत काढण्यासाठी म्हणून पोलिसांनी धाव घेतली होती. तर त्यांची गाडीसमोर गावच्या वेशीवरच जंगली श्वापदे दिसायला लागली. पोलीस इन्स्पेक्टरने खाली उतरून कुणावरही अन्याय होणार नाही, अशीच कृती माझ्याकडून होईल असे गाऱ्हाणे घालताच गाडीसमोरील साप बाजूला झाला. पोलिसांनी गावात येऊन घडलेला प्रकार सांगितला. तोपर्यंत ग्रामस्थांनी आपापसातले भांडण मिटविलेही होते. ग्रामस्थांचे कोणतेही काम असो, कोणतेही संकट येवो ते ग्रामदेवतेचा धावा करतात आणि संकट आपोआप बाजूला होते अशी त्यांची श्रद्धा आहे.
गावात मद्यपान करणे निषिद्ध मानतात. या गावातच अशी बंदी आहे, असे नाही. तर गावातील मंडळी कामानिमित्त अन्य भागात मोठय़ा संख्येने आहेत. शहरात ६० टक्केलोक राहतात. मात्र मद्यमुक्तीचे व्रत ते कसोशीने जपतात.
लष्करातील सेवा म्हणजे शिस्तप्रिय सेवा. कडक आदेश आणि त्याची कडक अंमलबजावणीही. यात अनेक वेळा सैनिकांना मद्यपानाची सवय असतेच. परंतु, घारपीतील सैनिक याला अपवाद आहेत. लष्करातही सेवा बजावणारे या गावचे बांधव मद्याला स्पर्शही करत नाहीत. काश्मीरच्या बर्फाळ भागात घारपीचा एक सैनिक लष्करी सेवेत आहे. प्रचंड थंडी असूनही त्याला मद्यपान करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे निवृत्त सैनिकोंनी सांगितले. लष्करातील त्यांचे अनुभव रंजक आहेत.
मद्यपान करण्याची आवश्यकताच कधी वाटली नाही. पण असेही प्रसंग आले की, दारू पिणे रोखता येणे कठीण होते. त्यावेळी ग्रामदेवतेचा धावा केला आणि संकट आपोआप टळले, हे त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. एकीकडे दारू पिणा-यांना कसलासा बहाणा शोधावा लागतो तर येथे दारू टाळण्यासाठी धडपड असायची. मंदिरात प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम रंगतो. अनेक वैशिष्टय़ जपलेल्या या गावातील भ्रमंती म्हणजे एक गूढ शक्तीचा शोध असतो. तुम्हीही हा अनुभव घेऊ शकता. पण एक दक्षता घ्यायला हवी, कारण दारू पिणे पाप आहे..आणि जनतेच्या श्रद्धेला तडा जाऊ न देणे हे आपले कर्तव्य नाही का?
परप्रांतीयांनाही सक्त आदेश
घारपी पंचक्रोशी सह्याद्रीच्या कुशीत वसली आहे. या भागात रबर लागवड, अननस लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. केरळ राज्यातील अनेक बांधव या परिसरात जमीन करारावर घेऊन शेती करू लागले आहेत. त्यांनाही गावक-यांनी आपल्या भागाचे पावित्र्य जपण्याचे फर्मान सोडले आहे.
या गावात कसे जावे?
मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा हे गोवा राज्याच्या सीमेपासून जवळचे गजबजलेले ठिकाण. या ठिकाणापासून २४ कि.मी. आत घारपी गाव वसले आहे.
माझ्या वडिलांचे गाव मुक्काम पोस्त वादिवारावाडे, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आहे. त्या गावाची ग्राम देवता भराडी देवी आहे. गावातील लोकांच्या श्रद्धे नुसार देवीला दारू चालत नाही. त्यामुळे सदर गावात दारू अजिबात चालत नाही. काय म्हणाल ह्याला श्रद्धा कि अंधश्रद्धा?