मुस्लिम, ख्रिश्चन हे रामाचे पुत्र आहेत असे आक्षेपार्ह विधान करणा-या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी संसदेत माफी मागितली.
नवी दिल्ली -मुस्लिम, ख्रिश्चन हे रामाचे पुत्र आहेत असे आक्षेपार्ह विधान करणा-या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आपल्या विधानाबद्दल मंगळवारी संसदेत माफी मागितली. मात्र साध्वी यांच्या माफीने विरोधकांचे समाधान झाले नसून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
माझ्या विधानाबद्दल मी माफी मागितली आहे आणि यामुद्द्यावर मला आणखी काहीही बोलायचे नाही. मी आणखी काय करु शकते? असे साध्वी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोमवारी साध्वी यांनी दिल्लीतील लोकांना आता ठरवायचे आहे की त्यांना रामजाद्याचे सरकार हवे आहे की दुस-या कोणाचे. देशातील मुस्लिम, ख्रिश्चन हे सर्व रामाचे पुत्र आहेत असे वादग्रस्त विधान केले होते.
साध्वी यांच्या विधानावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी मंगळवारी गदारोळ घातला. साध्वी यांच्या माफीचा स्वीकार करण्यास विरोधकांनी नकार देत गोंधळ घातल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. तर साध्वी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला पाहिजे अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली.
विरोधकांच्या टीकेनंतर साध्वी यांनी आज संसदेत माफी मागितली. या प्रकरणी भाजपा नेत्यांकडून मात्र साध्वी यांना समर्थन दिले जात आहे. एखादा व्यक्ती माफी मागत असेल तर ते प्रकरण तिथेच संपवावे असे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. तर भाषणादरम्यान साध्वी यांनी चुकीने हे विधान केले अशी सारवासारव भाजपा नेत्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, साध्वी यांनी केलेले विधान हे चुकीचे आणि अपमानजनक असल्याचे अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
हि बया इटलीतून आली आहे काय ?????