चाकरमान्यांची मुले गावात आली की, आंब्याखालीच असायची.
कणकवली- चाकरमान्यांची मुले गावात आली की, आंब्याखालीच असायची. आंब्याची मोठाली झाडे आपुलकीने जवळ घ्यायची. आंबा, काजू खालची ही लगबग पार हवीहवीशी वाटते. आता सारे बदलले आहे. रायवळ आंबे जसे दृष्टीआड झाले तसेच डेरेदार आम्रवृक्षसुद्धा!
मालवणी मुलखातले अस्सल शब्द कानात आजही गुंजन घालतात. आज आंब्याची मोठी झाडेच दिसत नाहीत. कोकण बदलते आहे. तेथील माणसे बदलली आहेत.
या सा-या बालपणीच्या आठवणींत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज रमले. थेट भूतकाळात पोहोचले. औचित्य होते ते ‘आंबे मोहोर’ या लेखाचे! आणि हा लेख लिहिणा-या ठाकूर गुरुजी यांच्या सत्काराचे!
दोन दिवसांपूर्वी कोकण मेवा या पुरवणीमध्ये आंबे मोहोराचे दिवस हा गतकाळाला उजाळा देणारा आचरा येथील सुरेश ठाकूर गुरुजींचा लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख नारायण राणे यांच्या वाचनात आला. त्यांनी तो आवडीने वाचला. अस्सल मालवणी मुलखाचे या मातीतल्या शब्दांनी चितारलेला हा लेख वाचताना नारायण राणे आपल्या बालपणात रमले.
विशेष म्हणजे बुधवारी या लेखाचे लेखक सुरेश ठाकूर यांना ओम गणेश निवासस्थानी विशेष निमंत्रित करून त्यांच्याशी संवादही साधला. गतकाळाला उजाळा देतानाच प्रगल्भपणे केलेल्या साहित्य लेखनाबद्दल त्यांचा हृदय़ सत्कारही केला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले. या कौतुकाने ठाकूर गुरुजी भारावून गेले.
४०-५० वर्षापूर्वी गावी आल्यानंतर आंब्याखाली असणारा आपला वावर, चाकरमान्यांची विशेषत: मुंबईकरांची रायवळ आंब्याखाली चालणारे खेळ आणि अस्सल मालवणी बोलीत रंगणारे संवाद, काजूचे रंगणारे खेळ यात नारायण राणे रममाण झाले.
रायवळ आंबा जन्मापासून साथ देतो. बारशाला आंब्याचा टाळ बांधल्याशिवाय मंगलकार्य सुरू होत नाही. पुढे आयुष्याच्या प्रत्येक मंगलप्रसंगात आम्रवृक्ष पुढे असतो. तो अगदी सरणावर चढेपर्यंत.. हापूसच्या या जमान्यात आम्हाला नारायणरावांसारखे, कलेचा कदर करणारे, सुखदु:खात समरस होणारे रायवळ आंबे असल्याप्रमाणे दादा भेटले. हे आमचे भाग्य. असे भावोद्गार सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले.
सध्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या नारायण राणे यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिका-यांबरोबर जनसामान्यांच्याही भेटीसाठी गर्दी असणारच यात नावीन्य नाही. मात्र या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी ठाकूर गुरुजींशी संवाद साधला. अनेक मालवणी शब्दांबाबत चर्चा केली.
संवादात अनेक संदर्भ होते, कणकवलीतील १९९० सालची लगबग.. काकडे यांच्या हॉटेलमधील वडय़ाची असलेली क्रेज यापासून ते पडवीतल्या गावगप्पांपर्यंत अनेक घटनांना उजाळा देताना कोकणचा बदलला चेहरा त्यांनी झरझर पुढे आणला. आता रायवळ आंबाच दिसत नाही आणि आमच्या बालपणीची आमराईसुद्धा! आजच्या पिढीला हे सर्व होते असेच सांगावे लागणार आहे.
आपल्या मुलाखतीतील माणसांमधील वाढत गेलेला चंगळवाद, माणुसकीची कमी होत जाणारी भावना आणि वापरून फेकून देण्याची वाढत जाणारी वृत्ती हे सर्व चित्र चिंताजनक आहे. हे सर्व बदल साहित्याही प्रकट व्हायला हवेत. हापूसचे गुणगाण करताना रायवळ दुर्मीळ होत चालला आहे. पूर्वी हमरस्त्याच्या साथीला, पायवाटांच्या सोबतींना आंब्याचे डेरेदार वृक्ष असायचे. आज आंब्याचे झाडच दिसत नाही.
कोकणची विकासाची गती आपल्याला रोखून चालणार नाही. आणि मालवणी मुलखातला संकुचीत स्वभावही उपयोगाचा नाही. मुलखाने बदलायला हवे. हे खरेच आहे. परंतु या बदलातही आपली आपुलकी कायम असायला हवी.
माणुसकी टिकायला हवी या आठवणी जाग्या करताना नारायणरावांनी साहित्यिकांचा केलेला गौरव, आणि या मातीतल्या लेखकांना दिलेला सन्मान सर्वानाच अविस्मरणीय होता. राजकारणापलीकडचा हा चेहरा, राज्याचे नेतृत्व केलेला व्यासंगी चेहरा सर्वजण अनुभवत होते. ठाकूर गुरुजी तर म्हणाले, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या क्षणाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आमचा रायवळ आंबा म्हणजे नारायण राव!
सुरेश ठाकूर गुरुजी …अभिनंदन …खूप छान लेख …नारायण राणे साहेब प्रहार ला आमच्या शुभेच्छा…
चल काहीतरी करूया आपल्या कोकण साठी….एक हाक दिलीत तर माज्यासारखे असंक्य कोकणी धावून yetil …