पुढील महिन्यात अहमदाबादमध्ये होणा-या चौथ्या कबड्डी विश्वचषक संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली.
मुंबई- पुढील महिन्यात अहमदाबादमध्ये होणा-या चौथ्या कबड्डी विश्वचषक संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली. प्रसिद्ध चढाईपटू अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील १४ सदस्यीय संघात महाराष्ट्राच्या एकाही कबड्डीपटूचा समावेश नाही. या संघातील निम्मे म्हणजे सात कबड्डीपटू हरयाणाचे आहेत.
प्रो-कबड्डी लीगची कामगिरी विचारात घेत निवडण्यात आलेल्या भारताच्या संघात हरयाणाने वर्चस्व राखले आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातचे प्रत्येकी दोन तसेच तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि पंजाबचा प्रत्येकी एक कबड्डीपटू आहे. विद्यमान संघातील सर्व कबड्डीपटू फॉर्मात असले तरी काशिलिंग आडके, रिशांक देवाडिगा, नीलेश साळुंके, सचिन शिंगाडे, विशाल माने, नीलेश शिंदे यांचा विचार झाला नाही.
७ ऑक्टोबरपासून रंगणा-या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारताच्या संघाची घोषणा महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे (आयकेएफ) अध्यक्ष जनार्दन गेहलोत, भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनच्या (एकेएफआय) मृदुल भदौरिया यांची उपस्थिती होती. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून बलवान सिंग यांची निवड करण्यात आली आहे. ई. भास्करन त्यांचे सहकारी असतील.
भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून अष्टपैलू मनजीत चिल्लरची निवड झाली आहे. अनुप आणि मनजीतसह अजय ठाकूर, दीपक हुडा, जसवीर सिंग, परदीप नरवाल, राहुल चौधरी, (चढाईपटू), मोहित चिल्लर, धरमराज चेरालाथन, सुरेंदर नाडा, सुरजीत (बचावपटू), संदीप नरवाल, नितीन तोमर, किरण परमार (अष्टपैलू) यांचा संघात समावेश आहे.
विद्यमान संघात अनुपसह पाच चढाईपटू (रेडर) आहेत. चार बचावपटू (डिफेंडर) असून मनजीत, संदीप, नितीन आणि किरण असे पाच अष्टपैलू आहेत. कबड्डी वर्ल्डकप संघात १२ संघ खेळतील. त्यात यजमान भारतासह इराण, दक्षिण कोरिया, बांगलादेश, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पोलंड, थायलंड, जपान, अर्जेटिना, केनया संघांचा समावेश आहे.
अनुप कुमारला सल्ला आणि टिप्स
कपिल देव यांनी यावेळी कर्णधार अनुप कुमारला काही टिप्स आणि सल्ले दिले. कर्णधार म्हणून खूप बोलावे लागते. मात्र प्रसारमाध्यमांजवळ अति बोलणे टाळावे. तसेच खेळावर अधिक लक्ष केंद्रित करावे. हार-जीत हा खेळाचा भाग आहे. मात्र प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असे कपिल देव म्हणाले.
भारताचा संघ
अनुप कुमार (कर्णधार, हरयाणा), मनजीत चिल्लर (उपकर्णधार, पंजाब), अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), दीपक हुडा (हरयाणा), जसवीर सिंग (हरयाणा), परदीप नरवाल (हरयाणा), राहुल चौधरी (उत्तर प्रदेश), मोहित चिल्लर (पंजाब), धरमराज चेरालाथन (तामिळनाडू), सुरेंदर नाडा (हरयाणा), सुरजीत (हरयाणा), संदीप नरवाल (हरयाणा), नितीन तोमर (उत्तर प्रदेश), किरण परमार (गुजरात).
कपिल देव टीव्ही पत्रकारावर चिडतात तेव्हा..
एका टीव्ही वाहिनीच्या पत्रकाराने पाकिस्तानच्या समावेशाबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर प्रमुख उपस्थिती असलेल्या कपिल देव यांच्या रागाचा पारा चढला. ‘‘उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सहभागाबाबत प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे का,’’ असा प्रतिप्रश्न कपिल यांनी केला.
कबड्डी सुरवात करणारे मराठी माणूस आणि खेळाडू निवडणारे तुम्ही xxxxx कोण?