विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा अद्यापी कायम आहे.
मुंबई – विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा अद्यापी कायम आहे. शिवसेनेशी युतीबाबतचा निर्णय बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी घेणार आहेत. भाजप १३५ जागांवर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
दिल्लीत गडकरींच्या निवासस्थानी मंगळवारी बैठक झाली. त्यात शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता अधिक आक्रमकतेने बाजू मांडण्याच्या सूचना प्रदेश नेत्यांना गडकरी यांनी दिल्याचे माहीतगाराने सांगितले. शिवाय कार्यकर्त्यांची मन:स्थिती शिवसेनेबरोबर न जाण्याचीच आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचेही भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. या पार्श्वभूमीवर गडकरी आणि शहा बुधवारी मुंबईत येत असून तेच अंतिम निर्णय घेतील.
राज्यात २५ वर्षे असलेल्या युतीबद्दल भाजप मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. सध्या पक्षातील हालचाली पाहता भाजप युती तोडण्याच्या मन:स्थितीत आहे. म्हणूनच पक्षाने विभागीय पदाधिका-यांना मुंबईत पाचारण केले आहे. त्यांच्याकडील सर्व विभागांच्या सर्वेक्षण अहवालांची पुन्हा माहिती घेतली जाणार आहे. कार्यकर्त्यांची मन:स्थिती आणि तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
त्यानंतर मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय भाजपकडून घेतला जाईल, अशी शक्यता आहे. गडकरी आणि शहा हे मुंबईत असले तरी ते शिवसेना नेत्यांशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. स्वत: शिवसेनेकडे चर्चेला जाणार नसल्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. शिवसेनेसमोर कोणत्याही स्थितीत झुकायचे नाही, अशी भूमिका घेतल्याचे समजते.
भाजप कार्यकर्तेही शिवसेनेचे लोढणे गळ्यात नको, अशी भावना व्यक्त करत आहेत. युती झाली तरी कार्यकर्त्यांची मने जुळणे कठीण आहे. त्यामुळे काम करण्यात अनेक अडचणी येतील. सत्ता आली तरी शिवसेनेच्या भूमिकेमुळे अधिक काळ टिकणार नाही, अशी भूमिकाही काहींनी मांडली आहे. त्यामुळे ‘युती तोडा’चा नारा पक्षात जोर धरत आहे.
उद्धव ठाकरे यांचा स्वत:च्या नेतृत्वावरच विश्वास नाही. समान जागा दिल्यावर भाजपच्याच जागा जास्त निवडून येतील आणि आपल्याला मुख्यमंत्री होता येणार नाही, अशी भीती उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचेही एका जेष्ठ भाजप नेत्याने सांगितले. त्यामुळे ज्या नेत्याच्याच मनात असुरक्षिततेची भावना आहे त्याच्या दबावाला बळी पडण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. याची सर्व कल्पना भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना असून त्याचा विचार युतीबाबत निर्णय घेताना केला जाणार आहे.
शिवसेनेच्या ‘बैठका’ सुरू
जागावाटपाची चर्चा थांबल्याने शिवसेनेची धावपळ उडाली आहे. ‘ऐनवेळी काय करावे’ या भीतीने त्यांनी परस्पर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. ‘मातोश्री’वर मंगळवारी मराठवाडय़ातील तर ‘शिवालया’त पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिका-यांना बोलावले होते. त्यातही खास करून जे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत तेथील पदाधिका-यांना बोलवून परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवा, असा आदेश त्यांना देण्यात आला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर तरी भाजप नेत्यांनी पाय जमिनीवर ठेवावेत, असा सल्लाही भाजपला देण्यात आला आहे.
टाका फुकून युती आणि दाखवा भाजप ला त्यांची लायकी एकदा
जय महाराष्ट्र