नारायण राणे यांच्या दूरदृष्टीचा पुन्हा प्रत्यय : फडणवीस, नारायण राणे यांनी आर्थिक फायद्यापेक्षा कोकणवासीयांच्या प्रेमाचा परतावा केला!, अद्ययावत यंत्रसामग्री असलेले जागतिक दर्जाचे हॉस्पिटल उभारण्याचे व्हिजन केवळ राणेंकडेच!, लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमुळे कोकणची अर्थव्यवस्था सुधारणार
पडवे – नारायण राणे यांच्यासारखी दूरदृष्टी व व्हिजन असलेला नेता राज्यात नाही. त्यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलची भव्यता फार मोठी आहे. ते राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल आहे. या ठिकाणी सर्व रोगांवर उपचार करणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. त्यामुळे कोकणातील कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी अन्यत्र जावे लागणार नाही. राणे यांनी हे हॉस्पिटल मुंबई अथवा पुढारलेल्या शहरात उभारले असते, तर त्यांना कोटय़वधी रुपयांचा फायदा झाला असता. परंतु कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी करत त्यांनी त्या पैशाच्या परताव्याचा विचार केलेला नाही. कोकणी जनतेने त्यांच्यावर जे प्रेम केले त्या प्रेमाचा परतावा राणे यांनी महत्त्वाचा मानला. ज्यांनी आपल्याला मोठे केले त्या कोकणी जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच त्यांनी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाची अर्थव्यवस्था सुधारेल आणि मोठय़ा प्रमाणात रोजगारही निर्माण होईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काढले.
दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी असलेल्या कोटय़वधी रुपयांच्या योजना आणि नारायण राणे यांनी हे अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेले हॉस्पिटल, त्यामुळे रुग्णांवर चांगले उपचार होऊन ते ठणठणीत बरे होतील. गरीब, गरजू रुग्णांना चांगल्या उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री आणि खा. नारायण राणे यांनी अथक प्रयत्नाने कसाल-पडवे येथे उभारलेल्या जागतिक दर्जाच्या सुपरस्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटलचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, गोव्याचे मंत्री जयेश साळगावकर, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आमदार नितेश राणे, गोव्याचे खा. परूळेकर, माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप, माजी मंत्री सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष सतीश सावंत, डॉ. मिलींद कुलकर्णी आदी उपस्थित होते. एसएसपीएम सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या उभारणीत महत्त्वपूर्ण सहभाग असलेले मुंबईतील प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट नितीन दोशी, लाईफटाईम हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिंटेंडेंट डॉ. आर. एस. कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी सौ. अपूर्वा पडते आणि बांधकाम ठेकेदार रघू नाईक यांचा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात प्रास्ताविक करताना नारायण राणे यांनी लाईफटाईम हॉस्पिटलच्या निर्मितीतील योगदानाचे श्रेय सौ. निलम राणे, माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे आणि गेली तीन वर्षे मेहनत घेणा-या वैद्यकीय तज्ज्ञांना दिले. यावेळी मान्यवरांचे स्वागत नारायण राणे, माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिमाखदार सोहळय़ाचे तेवढेच दिमाखदार सूत्र संचालन ऋषी देसाई यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नारायण राणे हे अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न बघणारे केवळ नेते नाहीत, तर ते स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे, ते पूर्ण करणारे असे नेते आहेत. कोकणातील जनतेचे अभिनंदन केले पाहिजे, ते अशासाठी की, नारायण राणे यांच्यासारखा एक नेता आपण निर्माण केला, ज्यांच्यासाठी अशा प्रकारचे सुंदर, सुसज्ज आणि उत्तम हॉस्पिटल त्यांनी उभे केले.
असे धाडस करणारे देशात एकमेव नेते
या जिल्हय़ातील रुग्णांना गोवा, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई येथे उपचारासाठी जावे लागत होते. त्या रुग्णांवर येथेच चांगले जागतिक दर्जाचे वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी ६५० बेडचे कोटय़वधी रुपये गुंतवणूक असलेले हे हॉस्पिटल उभारण्याचा राणे यांनी घेतलेला निर्णय धाडसी आहे.
निसर्गाने नटलेल्या परंतु तुलनेने ग्रामीण राहिलेल्या कोकणात अशाप्रकारचे हॉस्पिटल उभारण्याचे धाडस देशात कोणी नेता करु शकतो तर ते म्हणजे नारायण राणेच! एवढे सुसज्ज हॉस्पिटल त्यांनी मुंबईत उभारले असते तर त्यांना कोटय़वधी रुपयांचा फायदा झाला असता. वैदय़कीय क्षेत्रात सेवा व बिझनेस हे दोन भाग असतात. बिझनेसच्या व्यवस्थापणात सेवेचा भाग संपतो. तेथे बिझनेस व प्रॉपर्टी सेंटर निर्माण होते. परंतू, नारायण राणे यांनी या ठिकाणी बिझनेस अगर व्यवसाय न पाहता या भागातील जनतेला चांगली वैदय़कीय सेवा कशी मिळेल याचाच विचार प्रामुख्याने केला. हे हॉस्पिटल उभारण्यासाठी राणे यांनी जेवढय़ा पैशाची गुंतवणूक केली आहे. त्या रकमेचा परतावा येणार नाही. परंतु राणे यांनी गुंतवलेल्या पैशाचा परतावा न पाहता येथील जनतेने त्यांच्यावर जे प्रेम केले त्या प्रेमाचा परतावा महत्त्वाचा वाटला म्हणूनच त्यांनी हे राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल येथे उभे केले.
या आवारात येताच रुग्ण ठणठणीत होईल
लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये बसविलेली वैदय़कीय यंत्रसामग्री पाहिल्यानंतर जगातील उत्तम व अत्याधुनिक अशी यंत्रसामग्री त्यांनी येथे उपलब्ध केलेली आहे. जगातील सर्व अद्यावत मशिनरीज येथे आहेत. हे हॉस्पिटल उभारत असताना त्यांनी रुग्णसेवा जेवढी सुलभ करता येईल तेवढी त्याची काळजी घेतली. या ठिकाणचे जे बेड आहेत तेसुद्धा अत्याधुनिक आहेत. एका विभागातून दुस-या विभागात रुग्णांना हलविताना त्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी येथे घेण्यात आली आहे. या रुग्णालयात कॅज्युअल्टी रुमची सुविधा निर्माण केली आहे, तीसुद्धा अत्याधुनिक आहे. रुग्णांना तत्काळ वैदय़कीय उपचार मिळावेत यासाठी लगतच ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले १२ ऑपरेशन थिएटर उभारलेले आहेत. शस्त्रक्रिया केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही, अशाप्रकारची यंत्रसामुग्री येथे बसविण्यात आलेली आहे. इथली एमआरआय, सिटीस्कॅन मशिनही अत्याधुनिक आहे. काही हॉस्पिटलमध्ये जी एमआरआय मशिन असतात त्या मशिनमधून एमआरआय करताना टिकटिक असा आवाज येतो, त्या आवाजानेच आजारी रुग्ण हार्टअटॅक येऊन दगावण्याची भीती असते. परंतु याठिकाणी जी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली एमआरआय मशिन बसविण्यात आली आहे त्यामध्ये तशाप्रकारचा आवाज येत नाही. नारायण राणे यांनी हे हॉस्पिटल उभारताना प्रत्येक छोटय़ातल्या छोटय़ा गोष्टीचाही विचार येथे करुन हे हॉस्पिटल उभारलेले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
अल्पदरात महत्वपूर्ण उपचार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णावर उपचार करण्यासाठी जगाच्या पाठीवर उत्तम वैदय़कीय उपचार आहेत ते त्यांनी येथे उपलब्ध करून दिलेले आहेत. अलिकडच्या काळात किडनीचे रुग्ण वाढत आहेत. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वारंवार डायलिसीस करावे लागते. त्यासाठी मोठा आर्थिक भरुदडही सोसावा लागतो. लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये डायलिसीसची आधुनिक व्यवस्था असूनही केवळ ३५० रुपयांत डायलिसीस होणार आहे. डायलिसीस करताना काही रुग्णालयात एड्सच्या रुग्णांना प्रवेश दिला जात नाही. परंतु याठिकाणी अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
लवकरच मेडीकल कॉलेजला मान्यता
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, लवकरच मेडीकल कॉलेज याठिकाणी सुरु होईल. त्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधीही मिळणार आहे. असे मेडीकल कॉलेज हे राज्यातील एकमेव कॉलेज असणार आहे. नारायण राणे यांनी हे हॉस्पिटल उभारताना सामान्य रुग्णांना ते परवडेल त्याचाच प्रामुख्याने विचार केलेला आहे.
लाईफटाईम हॉस्पीटलमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारणार
लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये मेडीकल टुरिझम ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. मेडीकल टुरिझमला अलिकडे फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण अमेरिकासारख्या प्रगत देशामध्ये हार्ट सर्जरीसाठी ५० लाख रुपयांचा खर्च येतो. परंतु भारतात त्याच सर्जरीसाठी केवळ १० लाख रुपये खर्च येतो आणि तोही याठिकाणी पर्यटन करुनही म्हणून त्यादेशातील रुग्ण मेडीकल टुरिझमच्या नावाखाली भारतात वैदय़कीय उपचारासाठी येतात. म्हणूनच या रुग्णालयात महाराष्ट्र तसेच देशातीलच नव्हे तर परदेशातीलही रुग्ण उपचारासाठी येतील. त्यातून या जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारेल आणि रोजगारही निर्माण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये लवकरच शासकीय योजनांचा रुग्णांना मिळेल लाभ
फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गरजू गरीब रुग्णांना मोफत वैदय़कीय उपचार मिळावेत अशी योजना आखली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाईफटाईम हॉस्पिटलमध्येही रुग्णांवर मोफत उपचार करण्याच्यादृष्टिने लवकरच मंजुरी देण्यात येईल. त्यामुळे या योजनेतून रुग्णांना याठिकाणी मोफत उपचार होऊ शकतील. मुख्यमंत्री फंडातून गरजू रुग्णांना उपचारासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. गेल्या तीन वर्षात आपण मुख्यमंत्री आरोग्य योजनेतून ३७ हजार रुग्णांना मोफत उपचारासाठी निधी दिला. या योजनेतूनही लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी मंजुरी देण्यात येईल. त्याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भव:। आरोग्य योजनेतून देशातील ५० कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्याचे जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना जाहीर केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेली योजना दहा कोटी लोकांसाठी होती. परंतु पंतप्रधान मोदी यांनी ५० कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार करण्याची योजना दिली आहे. अशाप्रकारच्या सरकारी योजना आहेत. परंतु या योजनेतून गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी अद्यावत अशी हॉस्पिटल नाहीत. आता गरीब, गरजू रुग्णांवर मोफत उपचार करणा-या सरकारी योजना आहेत आणि त्या जोडीला राणे यांनी उभारलेले अद्यावत हॉस्पिटल त्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या योजनेची संकल्पना निश्चितच पूर्ण होईल. नारायण राणे यांनी लाईफटाईम हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैदय़कीय सुविधा निर्माण करून ही सेवा लोकांना समर्पित केली आहे हे फार मोठे कार्य आहे.
हॉस्पिटल उभारणीत नारायण राणेंचा टच दिसतो
खा. नारायण राणे यांनी एसएसपीएम सुपरस्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल व वैदय़कीय महाविद्यालयाचा देखणा प्रकल्प येथे उभा केला आहे. हा दिवस सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्याच नव्हे तर कोकणच्यादृष्टीने सोन्याचा दिवस आहे. जे करायचे ते उत्तम व नेटके करायचे. त्याचा सखोल अभ्यास करायचा आणि ते कार्य कसे यशस्वी होईल हे पाहायचे, हे नारायण राणे यांचे प्रमुख गुणवैशिष्टय़ आहे. लाईफटाईम हॉस्पिटल प्रकल्पाची पाहणी करताना त्यामधील प्रत्येक गोष्टीत नारायण राणे यांचा टच दिसतो. निसर्गरम्य परिसरात हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या प्रांगणात व बाहेर डोकावल्या नंतर डोंगर कपारी तसेच अन्यत्रही सर्वत्र निसर्गाने बहरलेल्या हिरवाई शिवाय काही दिसत नाही. याठिकाणी रुग्ण आल्यानंतर हा सर्व निसर्ग परिसर पाहिल्यानंतरच रुग्ण निम्मे बरे होतील. नारायण राणे यांनी याठिकाणी आरोग्यविषयक सुविधा देणारे गावच निर्माण केले आहे. असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले.
खा.नारायण राणे यांनी पडवे येथे उभारलेल्या एसएसपीएम सुपरस्पेशालिटी लाईफटाईफ हॉस्पिटलच्या उद्घाटन, लोकार्पण सोहळय़ाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले, नारायण राणे विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांनी अर्थसंकल्पावर केलेले भाषण सखोल अभ्यास करून व त्या क्षेत्रातील मान्यवरांकडून माहिती घेऊन करायचे. सर्वसाधारणपणे विरोधी पक्ष नेता हा अर्थसंकल्पावर भाषण करताना सरकारच्या धोरणावर टीका करतो व भाषण आटपतो. परंतु राणे यांनी अर्थसंकल्पावर अत्यंत सखोल अभ्यास करून भाषण करत. ते अर्थसंकल्पावर एवढे सखोल अभ्यासपूर्ण कसे बोलू शकतात याची माहिती घेतली त्यावेळी अर्थसंकल्पावर भाषण करण्यापूर्वी ते अर्थशास्त्रातील जाणकार, तज्ज्ञ, चार्टर्ड अकांउंटंट तसेच अर्थसंकल्पावर वृत्तपत्रातून अभ्यासू लिखाण करणा-या काही तज्ज्ञ मंडळींकडून भाषणापूर्वी चर्चा केली. त्यांच्याकडून सखोल माहिती घेतली आणि त्यानंतरच त्यांनी सभागृहात सुमारे सव्वा तास अभ्यासपूर्ण भाषण केले. त्या भाषणातून ते संपूर्ण महाराष्ट्रातील विकासाचे चित्र व बांधणी उत्तम प्रकारे करायचे. ही त्यांची अभ्यासूवृत्ती सर्वच बाबतीत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना यापूर्वी, मुंबई, पुणे, बेळगाव, गोवा याठिकाणी उपचारासाठी जावे लागायचे. ती सवय आता नारायण राणे यांच्या या अत्याधुनिक हॉस्पिटलमुळे संपुष्टात येईल आणि वैदय़कीय उपचारासाठी जायचे कुठे तर ते नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये जायचे, असा लोक विचार करतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या हॉस्पिटल प्रकल्पाचे कौतुक केले.
लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये १५० पेक्षा जास्त डॉक्टर तसेच ४००-५०० टेक्नीशियन व नर्सेस यांची नेमणूक आज झालेली आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून याठिकाणी येणारे रुग्ण ते ठणठणीत बरे करुन पाठविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
फळ योजनेला हवी बांबूची जोड
शरद पवार पुढे म्हणाले, कोकणात दिवसेंदिवस बदल होत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना कोकणात रोजगार हमी योजनेतून फळबाग योजना राबविली. त्याचे फळ आज दिसत आहे. कोकणात फलोद्यानातून आर्थिक समृद्धी निर्माण होऊ लागली आहे. या परिसराचा चेहरा बदलतोय. येथील लोकांचा आता आत्मविश्वास वाढत चालला आहे. म्हणूनच याठिकाणी आता आंबा, काजू लागवडीला बांबुची जोड देऊन त्यातून आर्थिक संपन्नता आपण निर्माण करू शकतो. यासाठी मुळ रोजगार हमी योजनेचा विचार पुन्हा व्हायला हवा, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
जिल्हावासीयांनीही पाठबळ द्यायला हवे
नारायण राणे यांनी या जिल्ह्यातील रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी अत्याधुनिक असे हॉस्पिटल उभारून रुग्णांची चांगली काळजी घेतली आहे. याठिकाणच्या जनतेनेही वैदय़कीय सेवेसाठी येणारा खर्च त्यांना परवडावा यादृष्टिने त्यांना सहाय्य करावे. सार्वजनिक जीवनात कार्य करणा-या आमच्यासारख्या राजकीय नेत्यांना निवडणुकीत मतदारांशी चांगले संबंध ठेवावे लागतात. त्यावेळी रुग्णांची सोय करा, असे सांगणारे लोक भेटतात. राणे अशी मोफत सोय करत राहतील तर ते हॉस्पिटल चालविताना अडचणी येतील. याठिकाणी माफक दरात चांगली वैदय़कीय सुविधा मिळेल. रुग्णांची लूटमार होणार नाही. परंतु वैदय़कीय सेवेसाठी येणारा माफक खर्च संबंधितांनी करायला हवा. याठिकाणी बाजार होणार नाही आणि व्यवसायही के ला जाणार नाही. समाजाला सेवा देण्यात येणार आहे. ही वैदय़कीय सेवा देण्यासाठी रुग्णालयाला पाठबळ दय़ा, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.
कोकणी माणूस प्रेम करणारा, तेवढाच चिकीत्सकही..
शरद पवार म्हणाले, कोकणी माणूस मनाने प्रेम करणारा तसेच चिकित्सक ही आहे. एखादी गोष्ट पटली तर तो पाठींबा देतो आणि पटली नाही तर स्पष्टपणे सांगतो. कुठलीही गोष्ट सांगताना ती स्पष्टपणे सांगणे हे या भागातील लोकांचे वैशिष्टय़ आहे. ते आपल्या मनातील कोणतीही गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात कमतरता ठेवत नाहीत. कष्टाचे नेहमीच सन्मान करणारा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. मी पहिला राज्यमंत्री झालो तेव्हापासून मी या जिल्ह्याला ओळखतो, असे सांगत त्यांनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रशासनाच्या संपाविरोधी घेतलेल्या भुमिकेवर जिल्ह्यातील स्पष्टवक्तेपणाचा आलेला अनुभव विशद केला. येथील माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर ते स्पष्टपणे सांगताना कोणताही मुलाहीजा ठेवत नाहीत याकडे लक्ष वेधले.
हॉस्पिटलच्या प्रतिक्रियांमधून प्रेरणा आणि समाधान मिळेल : खा.नारायण राणे
एसएसपीएम सुपरस्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल व मेडीकल कॉलेज या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाचे निर्माते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हॉस्पिटलच्या उद्घाटन, लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक करताना हा हॉस्पिटल प्रकल्प उभारण्यामागील संकल्पना स्पष्ट केली. खा.नारायण राणे म्हणाले, या जिल्ह्यातील रुग्णांना यापूर्वी उपचारासाठी मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर, मिरज याठिकाणी जावे लागत असे. रुग्णांना तातडीचे उपाय न मिळाल्याने काही जणांचे प्राणही गेले अशी वस्तुस्थिती होती. आपले वडील तातू राणे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी चांगल्या वैदय़कीय उपचारांअभावी निधन झाले. अनेकवेळा त्यांना मुंबईला उपचारासाठी न्यावे लागले होते. त्याचवेळी आपण जिल्ह्यातील रुग्णांना अन्यत्र वैदय़कीय उपचारासाठी जावे लागू नये यासाठी दर्जेदार हॉस्पिटल उभारावे, असे स्वप्नही पाहिले होते. गेली तीन वर्षे प्रामाणिक प्रयत्न करून हे हॉस्पिटल उभारण्यात आले.
नारायण राणे पुढे म्हणाले, या जिल्ह्यातील जनतेने मला दिलेले प्रेम व जिव्हाळा याबद्दल कृतज्ञता व बांधिलकी व्यक्त करुन हे हॉस्पिटल मी उभारले आहे. या सुंदर वास्तूत रुग्णांना दर्जेदार व जागतिक दर्जाची सेवा मिळून रुग्ण ठणठणीत बरे होऊन जातील त्याचवेळी आम्हाला समाधान वाटेल.
सदरचे हॉस्पिटल जागतिक दर्जाचे व कीर्तीचे व्हावे यादृष्टिने या हॉस्पिटलची उभारणी केली आहे. तसे दर्जेदार, अत्याधुनिक उपचारही केले जातील. मेडीकल टुरिझमची संकल्पना येथे राबविण्यात येईल. या हॉस्पिटलबाबत येणा-या प्रतिक्रियाच माझी प्रेरणा असेल आणि बरे होणा-या रुग्णांकडून समाधान मिळेल. हे हॉस्पिटल उभारण्यासाठी पत्नी सौ.निलम राणे, तसेच चिरंजीव माजी खा.निलेश राणे आणि आ.नितेश राणे तसेच अन्य सहका-यांनी जे सहकार्य केले त्यामुळेच मी हे हॉस्पीटल उभारू शकलो अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त के ली.
रुग्णांना आशेचे किरण ठरणारे हॉस्पिटल : चंद्रकांत पाटील
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी पडवे येथे उभारलेले अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल हे विविध आजारांनी खचलेल्या रुग्णांना आशेचे किरण ठरेल, असा विश्वास राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून खा. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफ टाईम हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री पाटील हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या शुभेच्छा देताना, खा. राणे यांना मी अनेक वर्षे ओळखतो. त्यांना जवळून पाहण्याचा योग अलीकडे आला. त्यांना आपण करत असलेले काम भव्य व दिव्य करायला आवडते. त्यासाठी त्यांचा आग्रह असतो. आज शुभारंभ केलेले हॉस्पिटल पाहून मी आवाक झालो. इमारत व त्यातील सुविधा पाहून एकदा तरी आजारी पडावे, असे माझ्या मनात येऊन गेले.
कोकण विभागात असे हॉस्पिटल नाही
यावेळी पुढे बोलताना मंत्री पाटील यांनी मुंबई वगळता नवी मुंबईपासून एकाच ठिकाणी एवढय़ा जास्त प्रमाणात आरोग्य सुविधा असलेले तसेच जगातील सर्वोत्तम मशिनरींनी युक्त असलेले हॉस्पिटल पूर्ण कोकण विभागात नाही, असे गौरवोग्दार काढले. हे हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना आशेचे किरण ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एकंदरीत लाइफटाइम हास्पिटल मधील अत्याधुनिक सुविधा आणि एकूण आवाका पहाता खास करून कोकणवासीयांना हे वरदानच प्राप्त झालं आहे. श्री. नारायणराव राणे आणि कुटुंबीय यांचे अभिनंदन आणि आभार मानावे तेवढे थोडेच होईल. सर्वसाधारण माणसास इथे सतत दिलासा मिळत राहील असा विश्वास वाटतो. हास्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!!!