जहांगीर कला दालनात सुरू असलेल्या शिल्प-चित्र प्रदर्शनात पुण्याचे कलाकार बापूसाहेब झांजे यांनी निसर्गाशी साधलेला संवाद.. वरळीतील नेहरू कलादालनात २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान देशविदेशातील सुमारे तीनशे कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन अर्थात ‘इंडिया आर्ट फेस्टीव्हल’ आणि २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान नेहरू सेंटर कलादालनात भरणारे पराग बोरसे यांच्या चित्रांचे प्रदर्शन हे सर्व कलाआस्वादकांना समृद्ध करणारी एक मेजवानी ठरणार आहे.
एका मांडवात तीनशे कलाकृती!
नव्या आणि समकालीन कलाकारांचा सहभाग असलेले ‘इंडिया आर्ट फेस्टीव्हल’चे चौथे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटर कलादालनात २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान भरणार आहे. चित्रकला, शिल्पकला, चित्रआलेख यांचा संगम असलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनात तैलरंग, अॅक्रिलीक, मिक्स मीडिया, जलरंग, चारकोल अशा रंगाबरोबरच ब्रॉन्झ, संगमरवर अशा विविध माध्यमांचा वापर करून साकार झालेल्या कलाकृती पाहाता येतील. देशभरातील प्रतिथयश कलाकारांनी या प्रदर्शनात भाग घेणार असून तीनशेहून अधिक कलावंतांच्या कलाकृती एका मांडवात पाहण्याची संधी मुंबईकरांना आहे.
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि काही विदेशी अशा तीस कलादानांचा सहभाग या प्रदर्शनात असेल. वेगवेगळ्या चाळीस शहरातल्या तीनशेवर कलाकार आपली कला या प्रदर्शनात मांडणार आहेत. चित्रं, शिल्पकृती, छायाचित्रं, रेखाकृती, डिजिटल प्रिंट, व्हीडिओ आर्ट असे अनेक कलाप्रकार एकशे पन्नास विभागात पाहता येतील. एम.एफ. हुसेन, एफ.एन. सुझा, एस.एच. रझा, क्रिशन खन्ना, जोगेन चौधरी, लक्ष्मा गौड, टी. वैकुंठम, रविंद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, बिनोद बिहारी मुखर्जी, चित्तप्रसाद अशा अनेक नावाजलेल्या कलाकारांच्या कलाकृती इथे पाहता येतील.
रणजीत होस्कोटे यांनी संचालित केलेल्या ‘आयएएफ कन्व्हर्सेशन’ या परिसंवादात अनेक मान्यवरांचा सहभाग असेल आणि कलाविषयक विषयांचा मागोवा घेतला जाईल. २०११ साली स्थापन झालेल्या या संस्थेने भारताच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर आपला ठसा उमटवला असून, या शिवाय आसाम, जम्मू-काश्मिर, तामिळनाडू इ. पंधरा राज्यात ही संस्था नावारूपास आली आहे. बहुतांश कलाकार स्थापनेपासून सातत्याने सहभागी होत आहेत. केनिया, श्रीलंका, सिंगापूर, टोरांटो, लंडन, स्पेन अशा अनेक देशातूनही नावाजलेल्या कलाकारांनी या प्रदर्शनात आजवर भाग घेतला आहे.
दरवर्षी एका प्रतिभाशाली कलाकाराला कलाविष्कारासाठी दिला जाणारा ‘आयएएफ अवॉर्ड’ या वर्षी २७ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी दोन वाजता उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रदान केला जाईल. या प्रदर्शनात भाग घेणा-या कलादालनात आधुनिक आर्ट गॅलरी, नवी दिल्ली, अनिहा आर्ट गॅलरी, नवी दिल्ली, आर्ट अॅण्ड अस्थेटीक, नवी दिल्ली, आर्ट अलिंडा कोलकाता, आर्ट देश द स्टुडीओ, मुंबई, आर्ट कौन्सल्ट, नवी दिल्ली, आर्ट नव्हू गुरगाव, आर्टक्वेस्ट आर्ट गॅलरी, मुंबई, डेक्कन आर्ट गॅलरी, हैदराबाद, फोरम आर्ट गॅलरी, चेन्नई, गॅलरी आर्ट एटेम, नवी दिल्ली, गॅलरी सारा अरक्कल बंगलोर, गॅलरी पायोनिअर नवी दिल्ली, गॅलरी रुकी, नवी दिल्ली, गॅलरी वाय. एस. इरा, इंदोर, जे.पी. सिंघल फाऊंडेशन, मुंबई, लावण्य आर्ट गॅलरी, नवी दिल्ली, मा पॅशन सिनिओ पेटिंग्ज, मुंबई, मोक्ष आर्ट गॅलरी, मुंबई, पेंटेड ऱ्हीदम गॅलरी, मुंबई, पर्ल आर्ट गॅलरी, नवी दिल्ली, रंगकुंचला आर्ट, ठाणे, स्टुडीओ एंडलेस थॉट्स, फरिदाबाद, स्टुडिओ सेव्हन, नवी दिल्ली, ताओ आर्ट गॅलरी, मुंबई, द गॅलरी ऑफ ज्ञानी आर्ट्स, सिंगापूर, द लेक्सिकॉन आर्ट गॅलरी, नवी दिल्ली यासारख्या कला दालनांचा समावेश आहे.
चैतन्य ही मुख्य संकल्पना रंगरेषांतून व्यक्त करणारे पराग बोरसे यांचे चित्रप्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटर येथे २५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, ते १ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
रायगड जिल्हय़ातील कर्जत येथील तरुण चित्रकार पराग बोरसे यांनी आजवर महत्त्वाच्या १४ कलादालनांमधून आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले आहे. जे.जे.मधून कलाशिक्षण घेतलेल्या या तरुण कलाकाराला जगभरात जिवंतपणा आणि चैतन्य जाणवते. ते आपल्या चित्रांत मांडत असतात. ते आपल्या या चित्रांबद्दल म्हणतात, ‘चित्राची निर्मिती करताना रंग व आकार यांच्या साहय़ाने मी दृश्याचे विभाजन करत असलो तरी ती केवळ कलाकृती साकारण्यासाठी स्वीकारलेली सोय असते. वास्तविक निराकारातील चैतन्य केवळ आकारांच्या मदतीने मी चित्रात आणण्याचा प्रयत्न करीत असतो.’
फुललेले फूल चित्रात काढता येते; पण त्याचा सुगंध कसा काढणार? तो अनुभववाच लागतो. याचप्रकारे निराकारात जाणवणारी चैतन्याची स्पंदने आकारांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचवण्याचा बोरसे यांचा प्रयत्न आहे. तो अनुभव घेण्यासाठी कलारसिकांना कलादालनात जावे लागणार आहे. त्यांच्या चित्रांचे विषय ‘फेटेवाले धनगर’, ‘कोंबडी हातात घेतलेल्या वृद्ध स्त्रिया’ अशा चित्रांबरोबरच ‘पाण्यातील प्रतिबिंब, त्यात पडलेला पालापाचोळा’ अशा चित्रातील जिवंतपणा कलारसिकांना बोरसे यांच्या रंगरेषेतून शोधावा लागणार आहे. ऑईलपेंट व ड्राय पेस्टल या माध्यमातील विविध विषयांवरची पंचवीस चित्रं पाहताना जगण्यातले चैतन्य या चित्रांतून कलारसिक अनुभवतील, असा विश्वास बोरसे याना आहे.
चित्रकला, रंगरेषांचा वापर करून भावना अभिव्यक्त करणारं एक सशक्त असं माध्यम. आजच्या अनेक माध्यमांचा जन्म हा या चित्रकलेतून झाला आहे. अगदी गुहांमधील चित्रांच्या माध्यमातूनही या कलेचं प्राचीनत्व अनेकदा सिद्ध झालेलं आहे. या चित्रकलेत भारतानंही आपलं विलक्षण असं योगदान दिलेलं आहे. अंजिठा वेरुळ व इतर अनेक ठिकाणची चित्रं आजही रसिकांना भुरळ पाडतात. भारतीय चित्रकारांची ही परंपरा अनेक दिग्गज कलाकारांनी पुढे चालवली आहे. यातलं एक नाव म्हणजे राजा रविवर्मा,
राजा रविवर्मा यांचा जन्म एका राजघराण्यात झाला. राजघराण्यातल्या शांततेत व समृद्धीमध्ये न रमलेला हा कलाकार आधीपासूनच मनातून अस्वस्थ होता. त्यात त्याच्या शिक्षणाने अधिकच भर घातली. ही सारी अस्वस्थता व्यक्त करण्याचं त्यांचं माध्यम होतं ते चित्र. लहानपणापासून आपल्या चित्रकलेत रमणा-या या तरुणाने मग चित्रकलेचं रितसर शिक्षण घेतलं. त्यातही आपली परंपरा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न अधिक होता. भारतीय साहित्यातल्या व्यक्तीरेखांना मुर्त रुप देण्याचं मोठं कार्य त्यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून केलं. महाभारत व रामायणातल्या अनेक व्यक्तीरेखांना त्यांनी आपल्या चित्रांमधून अक्षरश: जिवंत केलं. राजा रविवर्मा हे प्रकाशात आले ते १८७३ साली त्यांच्या चित्रांना व्हिएन्ना इथल्या चित्रप्रदर्शनात मिळालेल्या पुरस्काराने. या प्रदर्शनानंतर केवळ भारतातल्या अभिजात लोकांमध्येच नव्हे तर जगभरातल्या चित्रकलेच्या रसिकांमध्ये त्यांचे नाव झाले. आपल्या चित्रकलेच्या विषयासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. त्यांनी अनेक भारतीय देवदेवता या दाक्षिणात्य स्त्रीच्या रुपाने सजीव केल्या. आजही सर्वत्र जी लक्ष्मीची चित्रं पाहिली जातात ती रविवर्मा यांच्याच सर्जनशीलतेचा अविष्कार आहे. दुष्यंत व शकुंतला या कथेतल्या विविध प्रसंगांना आपल्या चित्रांमधून व्यक्त करण्याचे कार्यही त्यांनी केलं. त्या काळाचा विचार करता ही त्यांची एक चित्रमालिकाच होती असचं म्हणावं लागेल. काही तज्ज्ञांकडून त्यांच्या चित्रकलेच्या शैलीवर टिका जरी झालेली असली तरी त्यांची चित्रं ही लोकप्रिय होती. सर्वसामान्यांनाही त्यांच्या या चित्रांमधून आनंद मिळत होता हे विशेष.
केवळ आपल्या चित्रकलेच्या शैलीवरच प्रेम न करता त्यांनी ही चित्रं सर्वसामान्यांपर्यंत जाईल याचाही विचार केला. त्यामुळेच त्या काळात मुंबई-पुणे रस्त्यावरच्या मळवली इथे त्यांनी शिळाप्रेसची स्थापना केली. त्या आधी ही प्रेस त्यांनी मुंबई जवळच्या घाटकोपर इथे काढली होती. १९०१ मध्ये ही शिळाप्रेस त्यांनी एका जर्मन तज्ज्ञाला विकली होती. मात्र त्यांनी ही प्रेस बंद केली. आजही मळवलीच्या त्या जागेत या शिळाप्रेसचे दगड दिसून येत असल्याचं सांगितलं जातं. या शिळाप्रेसमध्ये महाभारतातली अनेक महत्त्वाच्या व्यक्तीरेखा या साकारण्यात आल्या होत्या. या ठिकाणी देवदेवतांची अनेक चित्रं ही छापली गेली होती. राजा रविवर्मा यांच्या या चित्रांना आज अमरत्व प्राप्त झालं आहे. १९०४ साली त्यांना ‘केसर ए हिंद’ या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. राजा रविवर्मा यांनी त्या काळातल्या सामाजिक रचनेबरोबर संघर्ष करूनही आपली सर्जनशीलता जपली होती. आजही राजा रविवर्मा यांची चित्रं ही काळाच्या पुढची वाटतात हेच त्यांच्या चित्रांचं ठळक वैशिष्टय़ म्हणता येईल. भारतीय चित्रकलेचा सन्मान वाढवणा-या या कलाकाराची आठवण नेहमीच त्यांच्या चित्रांमधून होत राहिल.
पुण्यातील चित्र-शिल्पकार बापूसाहेब झांजे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत १७ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, ते २३ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. या कलाकृतींमधून झांजे यांनी निसर्गाशी संवाद साधला असून, तो संवाद आपल्या वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून या प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांशी शेअर करत आहेत.
आपण निसर्गात जगतो तर निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात असा संवाद साधण्यासाठी आपल्याकडे कविमन, संवेदनशील मन असावयास हवे. बहुदा चित्रकार, शिल्पकार किंवा अन्य कलाकारांकडे असे मन असते, त्यामुळेच त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतीतून आपल्याला पाहायला मिळते. असाच निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न चित्र-शिल्पकार बापूसाहेब झांजे यांनी त्यांच्या कलाकृतींमधून केलेला दिसतो. निसर्गाशी असलेले घट्ट नाते त्यांच्या चित्र आणि शिल्पाकृतीतून आपल्याला पहायला मिळते. प्रत्यक्ष जीवनात व पाहण्यात असलेल्या अनावश्यक गोष्टीच कलाकारांना जास्त भावतात. सर्वसामान्यांना अशा गोष्टीचे महत्त्व नसते. ते त्यांना नेत्रसुखद वाटत नाही. त्याचा काही उपयोग नाही असे विचार सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात असतात, त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. नेमके याच गोष्टीकडे कलाकारांचे लक्ष वेधले जाते आणि हे घटक त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून सौंदर्यात्मकतेने सादर होतात. झांजे यांच्या चित्रातूनही याच गोष्टी असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
निसर्गात घडणा-या गोष्टींचा, घटनेचा खोल परिणाम कलाकारांच्या मनावर होत असतो. ज्या दिवशी महाराष्ट्रातील माळीण गावची घटना घडली, डोंगर कोसळून त्यात माळीण गाव होत्याचे नव्हते झाले. त्याचा खोल परिणाम होऊन त्यातून एक चित्र झांजे यांच्याकडून निर्मिले गेले आहे. त्यात समृद्ध माळीण गाव गडद हिरव्या रंगात प्रतिकात्मकतेने चितारलेले असून, त्याचा काही भाग डोंगर, ढासळलेले मुरूम, मातीने झाकला गेला आहे. त्यातून काही अस्पष्ट अशा घरांच्या, मानवाच्या आकृत्या असल्याचा भास आपल्याला होतो. डोंगर ढासळल्याचा अक्षरश: लोंढा खाली आला आहे, अशी जाणीव ते चित्र पाहणा-याला होते, हे चित्र या प्रदर्शनातील लक्षवेधी ठरले आहे.
झांजे यांच्या चित्रांत प्रामुख्याने लाल रंगाचा वापर आहे, कदाचित तो मातीचा म्हणून असावा. रंगांना कोणत्याही चौकटीत न बांधता स्वैरपणे उधळण केलेली आहे. असे असतानाही प्रत्येक चित्रात रंगाचा सुंदर मेळ तयार झाला आहे. मध्येच विशिष्ट ठिकाणी गडद रंगातून त्यांच्या खास शैलीतून मानवी चेह-याच्या हालचाली ब्लेडच्या साहाय्याने कोरून, खरवडून रेखाटल्या आहेत. हे साकारताना लहानात लहान ते ब-याच मोठ्या चित्रफलकाचा वापर केलेला दिसतो. ६ फूट ते १२ फूट आकारमानाच्या चित्रात त्यांनी अनेक मानवी मनाचा संवाद चालू असल्याचे दाखवण्यासाठी पाच-सहा चेह-यांची रचना केलेली आहे.
चित्रांबरोबरच त्यांचे शिल्पकलेतील कौशल्यही वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे अत्यंत आवडते माध्यम म्हणजे महाराष्ट्रातील काळा पाषाण. जसे चित्रातून निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न दिसतो तसाच संवाद साधणा-या मानवाकृती त्यांच्या शिल्पातून आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक आकृती ही स्वतंत्र आहे. तिचे अस्तित्व स्वतंत्र आहे. ती शिल्पं समूह रूपाने मांडली तर खरोखरच एक दुस-याशी संवाद करते आहे, हे जाणवते. संपूर्ण शिल्पाकृतीवर विशिष्ट प्रकारचा पोत छिन्नी हातोडीच्या साहाय्याने तयार केला आहे. कुठेतरी केवळ चेह-यावर अगदी घासून घासून त्या दगडाचा पृष्ठभाग गुळगुळीत केला. हा गुळगुळीतपणा व पोत यांचा सुंदर ताळमेळ बसून सौंदर्यात्मकदृष्टय़ा या सर्व शिल्पाकृती उत्कृष्ट झाल्या आहेत. अशा या चित्र-शिल्पांची झांजे यांनी केलेली समृद्ध मांडणी बघितली पाहिजे अशीच आहे.
mast