तब्बल ३५ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परचुरीवासियांचे स्वप्न पूर्ण करणा-या परचुरी पुलाकरता १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या पुलाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
रत्नागिरी – तब्बल ३५ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परचुरीवासियांचे स्वप्न पूर्ण करणा-या परचुरी पुलाकरता १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या पुलाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या पुलामुळे संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर तर रत्नागिरीतील गणपतीपुळे या दोन महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमधील अंतर कमी होऊन थेट जोडली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नदी पलिकडील परचुरी, कोळंबे, कोचरी, कुरधुंडा, कोसुंब, उक्षी, टेंबे, फुणगुस या गावांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. पावसाळय़ात विद्यार्थ्यांना नदीतून होडीने प्रवास करावा लागत होता. याशिवाय नदी पलीकडील ग्रामस्थांना संगमेश्वर बाजारपेठेत येण्याकरता २६ कि. मी. ची पायपीट करावी लागत होती.
परचुरी नदीवर पूल उभारण्यात यावा याकरता येथील ग्रामस्थांनी ३५ वर्ष पाठपुरावा केल्यानंतर २० जानेवारीला परचुरी नदीवर पूल उभारण्याकरता १२ कोटीच्या निधीला तांत्रिक मान्यता देण्यात आली.
परचुरी नदीवर १२० मीटर लांबीचा चार गाळय़ांचा दुपदरी पूल उभारण्यात येणार असून दोन वर्षाच्या कालावधीत परचुरीवासीयांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. पुलाचे बांधकाम झाल्याने परचुरी पंचक्रोशीतील गावे राष्ट्रीय महामार्गाला जोडली जाणार आहेत.
याशिवाय संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर आणि रत्नागिरीतील गणपतीपुळे देवस्थान यातील अंतर या पुलाने कमी होणार असून, पर्यटन विकासाच्यादृष्टीने हा पूल महत्त्वाचा ठरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
खूप छान बातमी आहे.
संगमेश्वर तालुक्यात मार्लेश्वर, कर्णेश्वर, सप्तेश्वर, टिकळेश्वर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत पण रस्तेव्यवस्था खूप वाईट आहे.
या स्थळाचा विकास व्हावा.