पावसाळी आरोहण व सुळकेगिरी करणे हे साहस युवक प्रतिष्ठानच्या मावळ्यांचे ध्येय. यावेळी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-निरगुडपाडा येथील बसगड ऊर्फ भास्करगडाचे आरोहण करण्याचे ठरले. मात्र निसर्गाने अनेक आव्हानं समोर उभी केल्यामुळे बसगडचा हा ट्रेक थरारक ठरला.
‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा..
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा, श्री महाराष्ट्र देशा..’’
असा हा आपला सर्वगुणसंपन्न महाराष्ट्र, याच महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत आपले कणखर, राकट असे आकाशाला गवसणी घालणारे गड, किल्ले, सुळके आजही साद घालत उभे आहेत. अशा गडकिल्ल्यांवर दुर्गप्रेमी आरोहण करून आपल्या धाडसाचा ठसा उमटवतात, तर काही जण ‘दुरून डोंगर साजरे’ म्हणून रामराम ठोकतात.
१८ जुलै २०१५ रोजी रात्री ११.३० वा. मुंबापुरीच्या काँक्रीटच्या जंगलातून वाट काढत आमची २६ जणांची बस अंधेरीवरून बसगडाकडे रवाना झाली. बसगड येथे रात्र काढण्यास योग्य जागा नसल्याचे माहीत असल्यामुळे आम्ही निरगुडपाडय़ाच्या मागे १५ कि.मी. वर पहाटे वाटेत एक सुंदर प्रशस्त मंदिर पाहून बस थांबवली. या मंदिराशेजारी एक भले मोठे पक्के घर होते. सकाळ होईपर्यंत आम्ही काही जणांनी मंदिरात तर काहींनी बसमध्ये पथा-या पसरवल्या. पावसाची रिपरिप चालू होती. सकाळ होताच आजूबाजूच्या हिरवळीने आणि तेथील निसर्गाने सर्वाची झोपच उडाली.
तेथील निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. तेथील हिरवाई आणि पावसाचा आनंद घेत असताना बस पाहून त्या घरातील एक आजोबा व आजी बाहेर आले. आम्ही आमची ओळख सांगितली. आमच्या गप्पा रंगल्या, आजोबांनी आम्हाला स्वत:च्या मुलांप्रमाणे जीव लावला. त्यांनी कोरा-गवती चहा बनवून दिला. आजी-आजोबांनी मायेने बनविलेल्या चहाचा आस्वाद आजही आमच्या सर्वाच्या जिभेवर रेंगाळतोय.
आम्ही आजी-आजोबांना त्यांनी सर्वासाठी बनवलेल्या चहाचा मोबदला देण्यास गेलो असता, त्यांनी तो नाकारला, पण आमच्या मुलांकडून एक भेट म्हणून त्यांना घेण्यास सांगितली. त्यानंतर मंदिरात दानपेटीत दक्षिणा अर्पण करून आम्ही सर्वानी आजी-आजोबांचा आशीर्वाद घेतला.
पुढे बस निरगुडपाडय़ाला पोहोचली, पावसाचा जोर कमी- जास्त होत होता. धुक्याची दुलई दूरवर पसरली होती. त्यामुळे बसगड नजरेस पडत नव्हता, पण गावातल्या एका व्यक्तीच्या दिशादर्शकामुळे बसगडाचे आरोहण सुरू झाले. सर्व टीमचे नेतृत्व मी, अमित भांबीड, कमलाकर चव्हाण व समीर असे करत होतो, तर जोडीला गडकरी म्हणून जगदीश महाडिक, अविनाश पागडे, आशीष भांबीड, सचिन खांबे हे होते, तर महिलांमध्ये गार्गी ठाकूर, संगीता खांबे व ध्रुविका कोरे होत्या.
पाऊस, सोसाटय़ाचा वारा, धुकं, चिखल, निसरडी वाट या सर्वामुळे आरोहण करण्यास त्रास जाणवत होता, पण तेवढाच आनंदही मिळत होता. अंग भिजून गारठलं होतं, पण जोशही तेवढाच होता. गवत वाढल्यामुळे नेहमीची वाट बुजली होती आणि वेगळीच वाट निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत वाट शोधणं हे एका गिर्यारोहकासाठी आव्हानच असतं, आमची टीम वाट काढत काढत बसगडसारख्या दिसणा-या डोंगरांच्या मधोमध पोहोचली. पण धुक्यामुळे नक्की बसगड कोणता व त्यावर जाणारी वाट कोणती याबाबत संभ्रम निर्माण झाला. आम्ही गुगलमॅपवर ही वाट शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईलला रेंज नसल्यामुळे तोही प्रयत्न अयशस्वी झाला.
त्यामुळे धुकं जाऊन थोडफार ऊन येण्याची वाट पाहू लागलो, तर एकीकडे जगदीश व अविनाश गडावर जाणारी वाट शोधू लागले. अवघ्या २५ मिनिटांनी धुकं सरलं आणि बसगड दिसू लागला. सर्वाचे चेहरे आनंदमय झाले, पण गड दिसला असला तरी गडावर जाणारी वाट सापडत नव्हती. अथक प्रयत्नानंतर गडावर जाणारी वाट मागे राहिल्याची समजली, त्यामुळे पुन्हा अध्र्या तासाच्या वाटचालीनंतर गडावर जाणा-या वाटेजवळ पोहोचलो व आरोहणास सुरुवात केली.
बसगडाच्या निम्म्या टप्प्यावर पोहोचलो व पुन्हा तशाच भुलवून देणा-या वाटा सुरू झाल्या. त्यातच धुकं, पाऊस, वारा, भिजलेलं अंग यामुळे पुन्हा चक्रव्युहात अडकल्यासारखे झाले. त्यातच भूकपण लागलेली सर्वाचे चेहरे त्या भुकेने थकल्यासारखे झाले होते. यावेळी कमलाकर, अमित व जगदीश असे आम्ही सर्व वाट शोधण्याचा प्रयत्न करत असताना जगदीशला वाट सापडली, पुन्हा आरोहण सुरू झाले. जसजसे वर पोहोचत होतो, तसतसे दाट धुकं वाढत होतं.
तोंडावर पावसांच्या सरींचा तडाखा पडत होता. या सर्वाचा सामना करत बसगडाच्या पोटात असलेल्या निसर्गनिर्मित घळीजवळ सर्व टीम येऊन पोहोचली. घळीपर्यंत पाणी पोहोचत नसल्यामुळे ती कोरडी होती. त्यामुळे सर्वानी त्या ठिकाणी ठाण मांडलं व आपल्यासोबत आणलेल्या पदार्थाचा फडशा पाडण्यात आला. पुढे निमुळत्या, निसरडय़ा व फक्त एक व्यक्ती जाईल एवढय़ा छोटय़ा वाटेने पुढचे आरोहण सुरू झाले.
प्रत्येक आरोहकास अनुभवी जोडीदार दिला होता. याप्रमाणे एक एक टप्पा सुरू होता, पण तो जास्त वेळ टिकला नाही, कारण पुढचा टप्पा अतिशय कठीण व धोकादायक होता. अनुभवी आरोहकांशिवाय तो टप्पा कुणीही पार करण्याच्या तयारीत नव्हता, त्यामुळे २६ पैकी ९ जणांनी पुढचा टप्पा आणि माथा गाठण्यासाठी पुढचे आरोहण सुरू ठेवले, तर बाकींनी त्या ठिकाणीच आपलं ठाण मांडलं. या नऊ जणांच्या टीममध्ये मी, कमलाकर अमित, आशीष, जगदीश, सागर, संगीता, गार्गी अशी नवीन टीम तयार झाली.
आम्ही सर्वानी पुढील आरोहण सुरू ठेवले. त्या निमुळत्या वाटेवरची माती चालताना खचत होती. त्यातच धुकं असल्यामुळे पुढचा रस्ता अंदाजाने शोधत पुढील आरोहण सुरू होतं. मी आणि कमलाकर या उर्वरित टीमचे नेतृत्व करत होतो. थोडं पुढचं अंतर पार केल्यानंतर दरड कोसळून थोडाफार रस्ता बंद झाला होता. त्यामध्येच सोसाटय़ाच्या वा-यामुळे झाडं उन्मळुन पडली होती. त्यातच भर म्हणून गडाच्या माथ्यावरून कोसळणा-या पाण्याच्या प्रवाहामुळे वाट खाली दबली गेली होती व धबधबा तयार झाला होता.
व ती जागा गुळगुळीत, निसरडी झाली होती. या सर्व गोष्टींमुळे पुढचा पॅच गाठणे कठीण होऊन बसले होते. एक धक्का व एक चूक आमच्या अपघाताला निमंत्रण होतं, पण माझ्या आणि कमलाकरच्या प्रशिक्षण तंत्राच्या सहाय्याने आम्ही हा टप्पा अतिशय धाडसाने पूर्ण केला. सोबतीला ३० फुटाचा रोप होताच. अंतिम टप्प्याजवळ येताच बसगडच्या पाय-या दिसल्या. सर्वानी ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष करत आनंद व्यक्त केला. पाय-यांवर गडाचे मोठमोठे दगड ढासळून पडलेले होते व त्यावरून जोरजोरात वेगाने पावसाचे पाणी वाहत होते.
यावेळी मला हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेची आठवण झाली. हा सर्व पॅच पूर्ण करून अखेरीस आम्ही गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. प्रवेशद्वार खूप छोटे असल्यामुळे आतमध्ये प्रवेश करताना संपूर्ण गुडघे टेकून वाकूनच प्रवेश केला. आणि माथ्यावरील जो काही नजारा नजरेस पडला तो काही औरच!
माथ्यावर पोहोचल्यावर धुकं तर होतेच, परंतु पावसाच्या सरींचा मारा अंगावर जोरात तडाखे देऊन जात होता.
थंडीने अंग कुडकुडत होते, भूक पण लागली होती. मग काय.. भर पावसात मी, गार्गी आणि सागरने आणलेल्या बिस्कीट, फरसाण आणि चकल्यांवर हात मारण्यास सुरुवात झाली, पण खाताना पावसाचे पाणी फरसाणामध्ये मिक्स होत असल्यामुळे त्याचीच मिसळ तयार होत होती, पण भुकेच्या जोरापुढे आणि निसर्गाच्या सान्निध्यात पावसात या दुर्गप्रेमी भटकंतीत या मिसळीची चव काही वेगळीच आस्वाद देत होती.
माथ्यावरील बुरूज संपूर्ण ढासळलेल्या स्थितीत होता. पाण्याची टाकीही बुजली होती. या गडाची झालेली पडझड, ढासळलेले दगड, तुटलेल्या कातळपाय-या पाहून आम्हाला मनात खंत वाटली आणि मनाशी सर्वानी असा निश्चय केला की पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा या गडाला भेट देऊन गावातील गावक-यांच्या मदतीने गडाची साफसफाई, अतिकठीण वाटेची दुरुस्ती करायची आणि या गडाचा नावलौकिक करायचा.
असे ठरवून या गडाचा निरोप घेत, भटकंती करत गड उतरण्यास सुरुवात केली, ज्या धोकादायक वाटेने मोठय़ा जोमाने आरोहण केले होते. त्याच वाटेने खाली उतरताना अतिशय नाजूकपणाने काळजी घ्यावी लागत होती, कारण जरा कुठे पाय निसटला तर सरळ धुक्याच्या दुलईतल्या दरीत.. ! असे तीनही धोकादायक पॅच सुरक्षितपणे ओलांडून माथ्यावर न आलेल्या सहका-यांजवळ पोहोचलो, पण सहकारी आम्ही खाली येईपर्यंत अर्ध्या टप्प्यात वाटचाल करत आले होते, त्यानंतर आमच्यात (म्हणजेच ज्यांनी माथा गाठला होता) व त्या ग्रुपमध्ये ही माची येईपर्यंत फूट पडली होती.
काही जण वाट शोधत बसमध्ये सुखरूप पोहोचले होते, तर काही जण माचीवरील झाडीमुळे व वेगवेगळ्या वाटांमुळे, भूलभुलय्यात फसले होते व वाट चुकले होते, परंतु साहस टीमच्या जिद्दीपुढे व प्रयत्नामुळे अखेरीस योग्य वाट मिळाल्यामुळे गडाच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या बसपाशी निरगुडपाडय़ात पोहोचले. सर्व टीमने बसगडाकडे पाहत मोकळा श्वास घेतला. रोचक आठवणी मनात ठेवत, वाटेत भोजनाचा नैवेद्य घेत सर्व मावळे काँक्रीटच्या जंगलात म्हणजेच मुंबापुरीत पुन्हा रोजचे धावपळीचे जीवन जगण्यास सज्ज झाले.
tumha sarvanche अभिनंदन,!