केवळ औपचारिकेतेने म्हटलेल्या स्तोत्रमंत्रांविषयी सामान्यजनांत खूप अज्ञान आहे. परिणामी शुष्क कर्मकांडांवरील अंधश्रद्धांचे महात्म्य वाढलेले दिसते. मत, पंथ, संप्रदाय, भाषा व प्रांत यांच्या सीमा ओलांडून मंत्रपुष्पांजली सामूहिकपणे म्हणण्याचा प्रघात का पडला? हे या मंत्राचा अर्थ जाणून घेतल्यानंतरच कळते. खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रीयगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्टय़ा ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.
मंत्रपुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत, ती खालीलप्रमाणे –
ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन। तेहनाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: ।। १।।
(मूळ स्तोत्र : ऋग्वेद मंडल १, ऋचा १६४)
ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।।२।।
(मूळ स्तोत्र : तैत्तरीय अरण्यक, अनुवाक ३१, मंत्र ६ )
ओम स्वस्ति। साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ठय़ं राज्यं, महाराज्यमाधिपत्यं समन्त पर्यायी स्यात् सार्वभौम: सार्वायुष आन्तादापरार्धात्। पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ।।३।।
(मूळ स्तोत्र : ऐतरेय ब्राम्हण, पंचिका ८, कांड १९)
ओम तदप्येष:श्लोको भिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुतस्यावसन गृहे। अविक्षतस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति।।४।
(मूळ स्तोत्र : ऐतरेय ब्राम्हण, पंचिका ८, कांड २९)
या मंत्रांचा अर्थ कळण्यासाठी काही शब्दांचे विग्रह व अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की, अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकांतील काही शब्दांचे अन्वयार्थ व श्लोकांचे अर्थ येणेप्रमाणे :
विग्रह व शब्दार्थ :
श्लोक – १ : यज्ञेन यज्ञं अयजन्त देवा: तानि धर्माणि प्रथामानि आसन
यज्ञं – यज्ञरूप प्रजापती, अयजन्त – यजन केले, पूजन केले, प्रथमानि धर्माणि आसन – प्रारंभीचे धर्मविधी होते.
तेह नाकं महिमान: सचन्त
यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा:
नाकं – स्वर्ग, महिमान: – गौरव, धन्यता, सचन्त – संधान बांधणे, प्राप्त करणे, साध्या: साधकदेव-देवता निवास, स्वर्गलोक
श्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत, ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.
श्लोक – २ : ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। नमो वयं वैश्रवणाय कुर्म हे। स मे कामान् कामकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।
प्रसह्य – अनुकूल, राजाधिराज – वैश्रवण, कामेश्वर वैश्रवण, कुबेर वैश्रवण इ. वैश्रवणाची विशेषणे.
श्लोकाचा अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकूल घडवून आणणा-या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वर-कुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या) सर्व कामनांची पूर्ति प्रदान करो.
श्लोक – ३ : (प्रथमार्थ)
ओम स्वस्ति।
सामाज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं
पारमेष्ठय़ं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।
स्वस्ति – सर्व कल्याणकारी, भौज्यं- उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण, स्वाराज्यं – लोकराज्य, वैराज्यं- आसक्ति विहित, निर्मोहि राज्य, पारमेष्ठय़ं महाराज्यं – परमश्रेष्ठ राज्य, अधिपत्यमयं – अधिपत्य (सत्ता), अयम् (आमची)
श्लोकाचा अर्थ – आमचे ‘सर्व कल्याणकारी राज्य’ असावे. आमचे ‘साम्राज्य’ सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तीरहित, लोभरहित असावे. अशा परमश्रेष्ठ ‘महाराज्या’वर आमची अधिसत्ता असावी.
श्लोक – ३ : (द्वितियार्थ)
समन्तपर्यायीस्तात सार्वभौम: सार्वायुष आन्तादापरार्धात। पृथीव्यै
समुद्पर्यंताया एकराळ इति।
समन्तपर्या – सर्व बाजूंनी, क्षितिजापर्यंत, ईस्यात् – रक्षण करो, सुरक्षित करो, सावार्युष:- दीर्घ आयु असलेला, अन्तात परार्थात – परार्धवर्षापर्यंत (अंतापर्यंत), एकराळ – एक राष्ट्र
श्लोकाचा अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्षपर्यंत सुरक्षित राहो.
श्लोक – ४ : तदप्येष: श्लोकोऽ भिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। अविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति।।
तत् अपि एष: श्लोक: अभिगीतो :
अभिगीत – किर्तीस्तवन, स्तुतीगीत, अविक्षितस्य मरुत्यावसनगृहे – अविक्षित पुत्र मरुताच्या घरी, मरुत: – मरुतगण, मरुतराजाच्या राज्यसभेचे सभासद
श्लोकाचा अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या कीर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुत, याच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्यांची जाणीव प्रत्येकाला करून देणारी ही विश्वप्रार्थना. अंतिम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील; परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या, सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हाच शक्य आहे, जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.
प्रत्येक मानवजाती-समूहाच्या विशेषतांच्या आरक्षण – संरक्षणाची हमी देणारी शासन व्यवस्था असेल. परस्पर समादर सहिष्णु समाज व्यवस्थाच संपूर्ण विश्वसमुदायाच्या आकांक्षापूर्तीची हमी देऊ शकतो. या वैश्विक कल्याणाच्या विचारधारेतून कधी कृष्णंतो विश्वमार्यमचा जाहीरनामा निघाला, तर ज्ञानदेवांनी, हे विश्वची माझे घर म्हटले. रामदासांनी चिंता करितो विश्वाची अशी ललकारी दिली. भेद वरवरचे; परंतु आंतरिक भाव एकात्म राष्ट्रीयतेचा एवढा विशाल अर्थ मंत्रपुष्पांजलीचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार सतत करणा-या या मंत्राने प्रत्येक कार्यक्रमाची सांगता व्हावी म्हणून जाणीवपूर्वक पाडलेला हा प्रघात आहे.
खूप सुंदर रीतीने मंत्रपुष्पांजलीचा अर्थ समजावून सांगितला त्याबद्दल आपले आभार