महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा राजीनामा घेतल्याचे सरकारला जाहीर करावे लागले. त्यानंतर महाराष्ट्रभर आनंदीआनंद व्यक्त झाला.
मुंबई- महाराष्ट्राचे तुकडे करण्याची वारंवार घोषणा करणारे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांना अखेर मंगळवारी आपला राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द करावा लागला. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. राजीनामा दिल्यानंतरही अॅड. अणे यांचे फुत्कार सुरूच असून आपण केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडय़ावर मोठय़ा प्रमाणात अन्याय होत असल्याने विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र झाला पाहिजे, असे फुटीरतावादी वक्तव्य करणा-या अॅड. श्रीहरी अणे यांच्याविरोधात सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला. अॅड. अणे यांच्या हकालपट्टीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील भाजपा वगळता सर्वच पक्षांचे सदस्य एकवटले होते. यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच वेगळ्या विदर्भाबाबत अॅड. अणे यांनी वक्तव्य केले होते. त्या वेळी वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाठीशी घातले होते. आता दुस-यांदा अॅड. अणे यांनी तसेच वक्तव्य केल्यामुळे सरकार नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी श्रीहरी अणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अॅड. अणे यांनी माफी मागावी, त्यांच्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनीही केली. यावर सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करून अॅड. अणे यांनी राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, राज्याचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात काल अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकार त्यांच्या मताशी सहमत नाही, हे आम्ही कालच जाहीर केले आहे. अॅड. अणे यांनी आपल्या वक्तव्याबाबत सरकारकडे खुलासा केला आहे. परंतु त्यांनी मंगळवारी सकाळी राज्यपालांची भेट घेऊन महाधिवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शंका उपस्थित केली की, राज्यपाल योग्य कारवाई करतील, असे मुख्यमंत्री म्हणतात. मग त्यांचा राजीनामा मंजूर होणार आहे की नाही, त्याबाबत सरकारची भूमिका काय आहे? राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शिवसेनेच्या सदस्यांनीही याबाबत स्पष्टीकरण मागितले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अॅड. अणे यांचा राजीनामा स्वीकारावा, अशी शिफारस मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यपालांना करण्यात येईल. त्यानंतरही श्रीहरी अणे यांच्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना महाराष्ट्र विधिमंडळाची माफी मागण्यास भाग पाडावे, अशा घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिल्या.
अॅड. अणे आपल्या मतावर ठाम
महाराष्ट्र तोडण्याची भाषा केल्यामुळे संपूर्ण राज्यात असंतोष निर्माण झाल्यानंतर अॅड. श्रीहरी अणे यांनी सकाळी १०.१५ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन आपला राजीनाम दिला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, विदर्भापेक्षा मराठवाडय़ाला निधी कमी मिळतो. मराठवाडा दुर्लक्षित राहतो, अशी टिप्पणी जालना येथील कार्यक्रमात अॅड. प्रदीप देशमुख आणि बाबा उगले यांनी केली होती. त्यावर आपण वेगळ्या मराठवाडय़ाबाबत मत व्यक्त केले होते आणि ते योग्यच होते, असे सांगत आपण केलेल्या विधानावर ठाम असल्याचे मत अॅड. अणे यांनी व्यक्त केले.
आता मा गो वैद्य म्हणतात महाराष्ट्राचे चार तुकडे करा. आता त्यांच्यावरहि कारवाई व्हावी . देशाचे तुकडे करण्याचे हे षड्यंत्र वाटते