पोलिस अधिकारी सचिन सुर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई- विधिमंडळात निर्माण झालेला ‘पोलिस विरुद्ध लोकप्रतिनिधी’ हा संघर्ष शुक्रवारी अधिकच तीव्र झाला. ‘‘सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पाच आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या आणि सूर्यवंशी यांच्यासह विधान भवनात बेकायदा प्रवेश करणा-या पोलिस अधिका-यांना निलंबित करा,’’ अशी मागणी करत शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वपक्षीय आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला. हा गदारोळ वाढत गेल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच दोन्ही बाजूंचे सदस्य उभे राहिले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. ‘पोलिस अधिका-यांवर कारवाई कधी?,’ अशी मागणीच त्यांनी लावून धरली. ‘‘आमदारांनी चुकीचे वागले म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले. हे निलंबन करताना जे आमदार सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत नाहीत.’, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. पोलिस ठाण्यातही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
या आमदारांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे हे कलम लावण्यात आले आहे. सचिन सूर्यवंशी विधान भवनात कोणते सरकारी काम करत होते आणि ते काम करण्यास आमदारांनी काय अडथळा केला, याचा खुलासा झाला पाहिजे. आमदारांवर खोटी कलमे लावली जात असेल, तर सर्वसामान्यांचे काय,’’ असा सवाल करत भाजपच्या गिरीष बापट यांनी हा मुद्दा उपस्थित केला. खोटारडया सचिन सूर्यवंशीला आणि विधान भवनात बेकायदा प्रवेश करणा-या अधिका-यांना निलंबित करावे आणि आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी बापट यांनी केली. त्याला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला.
या मागणीसाठी दोन्ही बाजूचे सदस्य वेलमध्ये उतरल्याने अखेर विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी पहिल्यांदा एक तासासाठी कामकाज तहकूब केले. मात्र तासाभराने कामकाज सुरू झाल्यानंतरही सदस्यांचा गोंधळ कमी झाला नव्हता. ‘‘आम्हाला कामकाज करायचे आहे. मात्र, सदस्यांचा अपमान सहन करून कामकाज चालू देणार नाही. जोपर्यंत आमदारांचे निलंबन मागे घेण्यात येणार नाही, तोपर्यंत कामकाज चालून देणार नाही,’’ असे बापट यांनी सांगितले. सर्व सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यानंतर गोंधळ अधिकच वाढल्याने पुरके यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
विधान परिषदेतही सूर्यवंशी यांना निलंबित करण्याची मागणी आमदार हेमंत टकले यांनी केली. पोलिस यंत्रणा विश्वस्त यंत्रणेपेक्षा वरचढ होत आहे, असे त्यांनी सांगताच सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उभे राहून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘अधिका-यांवर कारवाई झालीच पाहिजे’, अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यामुळे तालिका सभापती मोहन जोशी यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
आमदारांना ५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवापर्यंत राखून ठेवण्यात आली असून, दोघांनाही पाच एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ठाकूर व कदम यांना गुरुवारी एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर शुक्रवारी स्थानिक न्यायालयात उभे करण्यात आले. सरकारी वकील व बचाव पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायदंडाधिका-यांनी दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तातडीने दोघांनीही त्यांचे जामिनाचे अर्ज न्यायालायापुढे सादर केले. त्याबाबतचा निर्णय मात्र न्यायालयाने सोमवापर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे दोघांनाही तीन रात्र आर्थर रोड कारागृहात काढावी लागेल.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्याही चौकशीत काही आमदारांची माहिती पुढे आली आहे. पण त्याबाबत ठोस पुरावे उभे करण्यासाठी सीसीटीव्हीचे चित्रीकरणही घेण्यात येणार असून, त्यानंतर सूर्यवंशी यांच्याकडून संबंधित आमदारांची ओळख पटवण्यात येईल.
Virodhi paksha pan saamil zale he dhakkaadayak aahe.