बाबा आपल्याला कधीतरी नक्कीच सापडतील अशी आशा आम्हाला आणि आईलाही होती. सर्व रेल्वे स्टेशन्सवर बाबांचे फोटो लावूनही काही उपयोग झाला नव्हता. तसेच टीव्ही चॅनेलवर हरवल्याची फोटोसह माहितीही देऊन झाली होती. साधारण वर्षभरात आई पहिल्यासारखी ठणठणीत झाली होती. ती आता व्यवस्थित जेवण करू लागली. आम्हा भावंडांनाही आता धीर आला होता. पण..
आज बरोबर पंधरा वर्षे झाली. पंधरा वर्षानी वडिलांच्या श्राद्धाचे सोपस्कार पूर्ण केले. जवळच्या मोजक्याच नातेवाइकांना बोलावले. आईच्या मनातील आणि आम्हा चार भावंडांच्या मनातील विचारांचा कल्लोळ कायमचा बंद होईल अशा आशेने श्राद्धाचे सर्व विधी पूर्ण करण्यास सुरुवात केली. पण आईचे सौभाग्य एका क्षणात आम्ही हिरावून घेतलं आणि तिला कायमची मुकी करून बसलो. दिनकर दु:खद अंत:करणाने सांगत होता.
मुंबईमध्ये एका निम्न मध्यमवर्गातील कुटुंब एका चाळीत राहात होते. लग्नानंतर संसार व्यवस्थित सुरू होता. वडिलांचा छोटासा व्यवसायही ब-यापैकी चालू होता. चार मुले झाली, त्यांचे शिक्षण, त्यांचे लाड करण्यामध्ये आईचा वेळ कसा जायचा हे तिलाही कळत नसे.
अचानकपणे वडिलांना साध्या साध्या गोष्टींचे विस्मरण व्हायला लागले. त्यांना प्रत्येक वेळी आठवण करून द्यावी लागत असे. काही महिन्यांनंतर तर, एके दिवशी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले. परंतु संध्याकाळी येताना आपले घर कुठे आहे हेच त्यांना आठवत नव्हते. परंतु ते प्रवास करीत असलेल्या ट्रेनच्या डब्यात सुदैवाने चाळीतील एक रहिवासी होते. त्यांनाही बाबांनी ओळखले नाही. तरीही त्या गृहस्थांनी ट्रेनमधून त्यांना खाली उतरवले व रिक्षामध्ये बसवून कसेबसे घरी आणले. आम्हाला चाळीमधील रहिवाशाने घडलेला प्रकार सांगितला.
डॉक्टरांचे उपचार तर सुरू होतेच. त्यानंतर आम्ही बाबांना मोठया हॉस्पिटलमध्ये नेले. ‘सी.टी. स्कॅन’ तसेच इतर चाचण्या केल्या. त्यानंतर रिपोर्ट मिळाले. बाबांना ‘स्मृतिभ्रंश’ हा आजार झाल्याचे डॉक्टरनी सांगितले. तेव्हापासून बाबांसोबत छोटया भावाला पाठवू लागलो. परंतु त्याला एके ठिकाणी चांगल्या नोकरीची संधी चालून आली व भाऊ तेथे रूजू झाला. बाबांचे कामावर जाणे आम्ही बंद केले. कारण आम्ही चार भावंडे आता काम करीत होतो. आता आईच बाबांची काळजी घेऊ लागली.
एक दिवशी दुपारी जेवल्यानंतर आई नेहमीप्रमाणे झोपून गेली. बाबांनी अचानक दरवाजा उघडला व लेंगा-सद-यानिशी ते बाहेर पडले. चाळीतील बाहेर खेळणा-या मुलांनी त्यांना पाहिले. तसेच इतर स्त्रियांनीही पाहिले. स्त्रियांनी तर त्यांना हाका मारल्या. त्यांनी प्रतिसादही दिला. त्यामुळे चाळीतील स्त्रियांना व मुलांना वाटले की आता बाबांची प्रकृती सुधारत असावी. पाय मोकळे करण्यासाठी ते बाहेर आले असावेत. त्यामुळे माझ्या आईलाही त्यांनी उठविले नाही.
आईला जेव्हा जाग आली तेव्हा तिच्या लक्षात आले की बाबा घरी नाहीयत. ताबडतोब तिने शेजा-यांना, मुलांना विचारले व त्यांनी पाहिल्याचे सांगितले. आई रडायला लागल्याचे पाहून चाळीतील स्त्रियांनी तिला धीर दिला आणि सर्व जण बाबा ज्या दिशेला गेले त्या दिशेला शोधू लागले. रस्त्यामधील सर्व माणसांना विचारू लागले. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. बाबा घरातून अंदाजे दुपारी ३.३० वाजता बाहेर पडले आणि आईला ३.४५ वाजता जाग आली.
म्हणजे केवळ १५ मिनिटांच्या अंतरामध्ये एखादी वयस्कर व्यक्ती गायब होते हे आमच्यासाठी धक्कादायक होते. शिवाय चाळीतील मुलांनी रिक्षा तसेच बाईकवर बसूनही त्यांचा शोध घेतला. पंधरा मिनिटांमध्ये एखादी व्यक्ती जेवढे अंतर चालेल त्यापेक्षाही जास्त अंतरावर चाळीतील मुलांनी बाईक्सवरून बाबांचा शोध घेतला. साधारण तासाभरात आम्ही चारही भावंडे आम्हाला कळल्यावर घरी पोहोचलो होतो. मी आल्यावर थेट पोलिसांत बाबा हरवल्याची तक्रार केली. चाळीतील सर्व रहिवासी आणि आम्ही पोलिसांच्या मदतीने रात्रभर शोध घेतला. सर्व रेल्वे स्टेशन्सवर तक्रार नोंदवली. पण काहीच पत्ता लागला नाही.
आई तर संपूर्णपणे कोलमडून गेली होती. तिच्यामुळे बाबा हरवले असे तिला वाटत होते. तिनेही अचानकपणे बोलणेच बंद केले. कोणी विचारपूस करायला आले तर केवळ डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असत. पण तिचा आवाज मात्र बंद झाला होता. त्यामुळे आम्ही चारही भावंडे अजूनच खचून गेलो होतो. घरातील मोठा मुलगा म्हणून मला खंबीर राहणे आवश्यक होते. तसा मी प्रयत्नही करत होतो. आईवर डॉक्टर उपचार सुरू केले. तिला मानसिक धक्का बसला असल्यामुळे ती बोलत नाहीय. हळूहळू ती बोलू लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आणि खरोखर काही दिवसांनी आई थोडे थोडे बोलू लागली. परंतु ‘तिच्यामुळे बाबा हरवले आहेत’ अशी खंत कायमच आम्हाला तिच्या डोळ्यात दिसत होती.
बाबा आपल्याला कधीतरी नक्कीच सापडतील अशी आशा आम्हाला आणि आईलाही होती. सर्व रेल्वे स्टेशन्सवर, बाबांचे फोटो लावूनही काही उपयोग झाला नव्हता. तसेच टीव्ही चॅनेलवर हरवल्याची फोटोसह माहितीही देऊन झाली होती. साधारण वर्षभरात आई पहिल्यासारखी ठणठणीत झाली होती. ती आता व्यवस्थित जेवण करू लागली. आम्हा भावंडांनाही आता धीर आला होता. आम्हीही त्या दु:खातून सावरू लागलो होतो.
दरम्यानच्या काळात आम्हा चारही भावंडांची लग्नं झाली. दोन बहिणी आपापल्या सासरी संसार करू लागल्या तर धाकटा भाऊ लग्नानंतर दुसरीकडे खोली घेऊन राहू लागला. आई माझ्याकडेच राहायला आहे. माझ्या मुलांमध्ये ती रममाण होऊन जाते. आईने आता बाबा हरवल्याचे सत्य ब-यापैकी स्वीकारले होते. त्यामुळे आम्हा भावंडांच्या लग्नाच्या वेळचे आई-बाबांनी मिळून करावयाचे विधी मात्र तिने समाजाच्या विरोधात जाऊन स्वत: एकटीने केले होते.
आई अजूनही कुंकू लावत होती व मंगळसूत्र घालीत होती. बाबांना काहीही झालेले नाहीए आणि एक ना एक दिवस ते नक्कीच घरी येतील, असा तिला ठाम विश्वास होता. हा तिचा विश्वासच माझा हुरूप वाढवत होता.
बघता बघता १५ वर्षे निघून गेली होती. ही पंधरा वर्षे आम्हाला १५० वर्षाप्रमाणे वाटली. बाबांच्या आठवणीशिवाय एकही दिवस गेला नाही. आम्ही सर्व भावंडांनी आणि आईने मिळून विचार केला की, आता बाबांची प्रतीक्षा करण्यात काहीच अर्थ नाहीय. ते जर जिवंत असते तर एवढया वर्षात नक्कीच सापडले असते. त्यामुळे ते आता या जगात नाहीत असे समजून आपण त्यांचे श्राद्ध घालू. किमान त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल व आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ. आईनेही विचार करायला दोन दिवस घेतले आणि शेवटी एकदम जवळच्या काकांना बोलावून श्राद्ध उरकून घेण्याची परवानगी दिली.
ज्या दिवशी बाबा गायब झाले तो दिवस श्राद्धासाठी ठरवला. ब्राह्मणाला बोलावले. प्रेतयात्रेच्या वेळी विधवा स्त्रियांचे विधी करावे लागतात, त्याप्रमाणे विधीला सुरुवात झाली. एका विधवा आजीने आईच्या हातातील बांगडया तोडल्या अन् कपाळाचे कुंकू पुसले. आईने विरोध केला नाही. पण एकदा जोरदार हंबरडा फोडला. उपस्थित सा-यांना अश्रू अनावर झाले.
श्राद्धाच्या कार्यक्रमाला या विधींमुळे वेगळेच वळण लागले. सुरुवातीला आई श्राद्ध घालण्यास तयार होती. परंतु मी मंगळसूत्र वापरणारच व आयुष्यभर कुंकू लावीन असे ती ठामपणे म्हणत होती. परंतु आम्ही तिची समजूत काढल्यामुळे तिने या विधीला होकार दिला होता.
बाबांच्या हरवल्यानंतर पंधरा वर्षानी हा जो तिने हंबरडा फोडला अन् क्षणार्धात ती बेशुद्ध झाली. थोडया वेळाने शुद्धीवर आली. परंतु तिने आता पूर्णपणे अबोला धरला होता. डॉक्टर ट्रिटमेंट चालू होती. त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. कारण ती आता कायमची मुकी झाली होती.
आयुष्यभरच समाजाला न घाबरता जर मी आईच्या विचारांना साथ दिली असती, तिला कुंकू पुसायला लावले नसते, बांगडया फोडण्यास विरोध केला असता तर आज माझी आई मला पूर्वीसारखी मिळाली असती. याआधी बाबा हरवले अन् आता तर आईसुद्धा असून नसल्यासारखीच. एक जिवंत प्रेत. समाजातील रूढी, परंपरेच्या जोखडामुळे मी माझ्या आईचे वात्सल्य गमावून बसलोय..!
बाबा हरवल्याच्या दु:खाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी आज पंधरा वर्षानी जो विधी केला त्यामुळे आईची कायमची वाचा जाण्याचे शल्य मला आता कायमचे बोचत राहणार आहे आयुष्यभर.
आशा आहे कि हे सर्व काल्पनिक आहे. तुमच्यासोबतच काय, कुणाहीसोबत हे असे कधीच घडू नये. सुंदर लिखाण.