स्वाईन फ्लूच्या नावाखाली विविध औषध विक्रेत्यांनी कमाईचा नवा मार्ग सुरू केला आहे. आयुर्वेदिक औषधे स्वाईन फ्लूवर रामबाण उपाय असल्याचा खोटा दावा करत विविध ठिकाणी ते यांचा प्रचार करत आहेत.
मुंबई – स्वाईन फ्लूच्या नावाखाली विविध औषध विक्रेत्यांनी कमाईचा नवा मार्ग सुरू केला आहे. आयुर्वेदिक औषधे स्वाईन फ्लूवर रामबाण उपाय असल्याचा खोटा दावा करत विविध ठिकाणी ते यांचा प्रचार करत आहेत. सामान्य ग्राहक या औषधांच्या जाहिरातींना बळी पडत असून सरकारचे मात्र, याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईसह राज्यभरात स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लू वाढण्याची भीती अधिकच तीव्र झाली आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून पालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व प्रयत्न फोल ठरत असल्याचे दिसत आहे.
इतकंच नव्हे तर शासकीय रुग्णालयात अशा स्वाईन फ्लूच्या रुग्णांसंदर्भात टॅमी फ्लू, विशेष रक्तपेढी, स्वाईन फ्लू लससमवेत पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याचाच फायदा घेत काही औषध कंपन्या आपले खिसे भरण्याच्या उद्देशाने स्वाईन फ्लू रोखण्यासाठी होमिओपॅथिक औषधे उपायकारक असल्याचे जनतेला भासवून देत आहेत. दरम्यान, या फसव्या जाहिरातींकडे लोकही आकर्षित होत आहेत.
अशा प्रकारचे कुठलेही औषध होमिओपॅथिक नसून, होमिओपॅथिकचे औषध असल्याचे सांगून नागरिकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत आहे. या औषधांचा कदाचित आरोग्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
औषधांबाबत चौकशी करू..
स्वाईन फ्लू हा कोणत्याही आयुर्वेदिक औषधांनी आटोक्यात येईल, असे वाटत नाही. कारण, मुळात तसे असते तर राष्ट्रीय स्तरावर किंवा सरकारतर्फे तशी घोषणा करण्यात आली असती. तसेच इंडियन कौन्सिल ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ही संस्था आयुर्वेदिक औषध निर्माण करते.
परंतु आयुर्वेदिक औषधांमुळे स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी होतो असे या संस्थेने किंवा राज्य सरकारने अद्याप जाहीर केलेले नाही, असे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी म्हटले आहे. आयुर्वेदिक औषधांची विक्री करणा-या कंपन्या केवळ आपली प्रसिद्धी करत आहेत. त्यामुळे या बनावट औषधांची चौकशी निश्चित केली जाईल. याशिवाय याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देईल.
मुळात या आयुर्वेदिक औषधे शरीराला अपायकारक आहेत की नाहीत हे सांगता येत नाही. परंतु नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध खरेदी करू नये, असा सल्लाही डॉ. सतीश पवार यांनी दिला.
श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब ,महाराष्ट्राची काळजी घ्या ओ जरा,!