भाजपाचा पराभव झाल्याने अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. पण, संकटकाळी जो पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
नाशिक- भाजपाचा दिल्लीत पराभव झाल्याने अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. पण, दुस-याच्या घरात पोर झाल्याचा आनंद फार काळ टिकत नाही. संकटकाळी जो आपल्या पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
दिल्लीतील पराभवाचे आम्हाला चिंतन करावेच लागेल, त्यामागची कारणेही तपासावी लागतील, अशी कबुलीही फडणवीस यांनी नाशिक येथे पोलीस अकादमीच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
दिल्लीतील पराभव आम्ही मान्य केला आहे. आम्ही पराभवाचे आत्मचिंतन करून झालेल्या चुका दुरुस्त करू. हा एकट्या मोदींचा नव्हे तर पक्षाचा पराभव आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले आहे. त्यातच राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे नाशिकमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीला राजकीय प्रश्न येथे नकोत, असे पत्रकारांना बजावले. नंतर मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे त्यांना भाग पडले.
यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीला शरद पवारांकडे नव्हे तर तेथे होणा-या विकास प्रकल्पाच्या कार्यक्रमासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने निर्यातक्षम भाजीपाला गुणवत्ता केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचे भूमिपूजन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. शरद पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मात्र या कार्यक्रमानंतर बारामती येथील शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी भोजनासाठीही नरेंद्र मोदी जाणार आहेत. याची पत्रकारांनी आठवण करुन दिली असता पवार आणि मोदी यांनी भेटायचेच नाही काय, अशा प्रकारची राजकीय अस्पृष्यता आपल्या देशात नाही, अशी सारवासारवीची उत्तरे फडणवीसांनी दिली.
बाबरी वेळी सेना तुमच्या पाठी नाही पुढे उभी होती तुमचा बचाव कराय आणि तुम्ही त्याच सेनेच्या पाठीत चाकू भोकसलात…
आणि आता कशाला मैत्रीचे नियम शिकवताय…?