कोकणात डबल डेकर धावू शकणार नाही, अशी साशंकता रेल्वेतील अधिका-यांच्या एका गटाला आधी होती. प्रत्यक्षात चाचणीच्या वेळी डबल डेकरने मुंबईपासून मडगावपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठल्याने सुरक्षा आयुक्तांनी तिला मंजुरीही दिली.
रत्नागिरी – कोकणात डबल डेकर धावू शकणार नाही, अशी साशंकता रेल्वेतील अधिका-यांच्या एका गटाला आधी होती. प्रत्यक्षात चाचणीच्या वेळी डबल डेकरने मुंबईपासून मडगावपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठल्याने सुरक्षा आयुक्तांनी तिला मंजुरीही दिली. यानंतर ती यशस्वीपणे चालवण्याची जबाबदारी रेल्वेची होती. असे असताना मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेतील असमन्वयाचा फटका बसलेली डबल डेकर दुसरीकडे वळवण्याचा घाट घालण्याची संधी रेल्वेला मिळाली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ांच्या प्रचंड गर्दीवर उतारा म्हणून जिच्याकडे मोठया आशेने पाहिले जात होते ती गाडीही दुस-या मार्गावर चालवण्याची तयारी चालली आहे.
सध्या देशभरात नऊ मार्गावर डबल डेकर गाडया सुरू आहेत. त्यातील सिकंदराबाद-तिरूपती डबल डेकरसह आणखी एक अशा दोन डबल डेकरचा अपवाद वगळला तर इतर सात गाडय़ांना हवा तितका प्रतिसाद मिळत नाही. मात्र, या गाडया रेल्वेने बंद केलेल्या नाहीत. अल्प प्रतिसाद मिळणा-या या गाडय़ांचे उत्पन्न कसे वाढेल, या दृष्टीने रेल्वेला प्रयत्न करावे लागत आहेत. दुर्दैवाने कोकणच्या वाटयाला आलेल्या डबल डेकर गाडीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. एक तर ही गाडी अजून लोकांना माहीत नाही आणि दुसरे म्हणजे सुरुवातीच्या काळात तिला जो काही तोटा सहन करावा लागला, प्रीमियम दराने चालवल्याने प्रवाशांनी तिच्याकडे पाठ फिरवली यात रेल्वेचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरल्याचे आरोप झाले. ही गाडी चालण्यासाठी, ती प्रवाशांच्या पसंतीला उतरण्यासाठी काही कालावधीपर्यंत तोटा हा सहन करावा लागणारच आहे. तसं नसेल तर सप्टेंबर २०१३मध्ये सुरू झाल्यापासून अगदी आजपर्यंत तोटयात असलेली भोपाळ-इंदूर डबल डेकर अजून सुरू कशी? ती तर गेल्या १३ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता.
इतकेच नव्हे तर १३ ऑगस्ट २०१४ पासून आयआरसीटीसी साईटवर तिचे आरक्षण मिळणेही बंद झाले होते. अशा परिस्थितीत ही गाडी लोकांच्या आग्रहास्तव मध्य प्रदेशातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या हस्तक्षेपानंतर रेल्वेने बंद केलेली असतानाही अचानक सुरू झाली. यामागे काय घडामोडी झाल्या, हे त्या भागातील लोकांना चांगले ठाऊक आहे. असे असताना कोकण रेल्वे मार्गावरील डबल डेकरबाबत वेगळा न्याय का, असा सवाल कोकणसह गोव्यातील प्रवासी जनतेकडून रेल्वे प्रशासनाला विचारला जात आहे. भोपाळमधील डबल डेकरकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने तिचे आठ डबे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. यानंतर अवघ्या दोन डब्यांसह आजही इंदूर-भोपाळ डबल डेकर चालवली जात आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन डब्यांची असूनही या गाडीला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळेच आता ती इंदूर-सुरत मार्गावर चालवण्याचा विचार सुरू आहे.
मुंबई-मडगाव या बारमाही गर्दीच्या मार्गावर चालवण्यासाठी भोपाळमधील डबल डेकरचे आठ डबे मुंबईत आणण्यात आले होते. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या आठ डब्यांच्या डबल डेकरला अपेक्षित भारमान मिळाले नाही, असे सांगणा-या मध्य रेल्वेने तिच्या उत्पन्न वाढीसाठी काय केले, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
रेल्वे अर्थ संकल्पाकडे प्रवाशांचे लक्ष
विविध ठिकाणांहून मिळवलेल्या माहितीनुसार नऊपैकी दोनच डबल डेकर गाडय़ांना अपेक्षित भारमान मिळत आहे. याचाच अर्थ उर्वरित गाडया तोटा सहन करत चालवल्या जात आहेत. असे असताना मुंबई- गोवा मार्गावर चालवण्यात आलेल्या डबल डेकरला वेगळा न्याय का, असा सवाल गोव्यासह कोकणातील प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचारला जात आहे. ही गाडी याच मार्गावर कायम ठेवावी, म्हणून गोव्यातील प्रवाशांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच गोव्याचेच असलेले देशाचे संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांना एक निवेदन सादर केले आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. धावण्याच्या आधीपासूनच बरीच चर्चा झालेली आणि गणेशोत्सव तसेच त्या नंतर दसरा-दिवाळीतील विशेष फे-या संपल्यानंतर बंद करण्यात आलेली डबल डेकर कोकण रेल्वे मार्गावरच कायम करण्याची घोषणा रेल्वेमंत्री आपल्या अर्थसंकल्पात करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निलेश राणे यांचा आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवडयात रत्नागिरी येथील आंदोलनात कोकणात डबल डेकर चालू राहावी, या मागणीसह रेल्वेविषयक मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वातानुकुलीत रेल्वे चा हट्ट न धरता कोकणात राहणाऱ्या गरीब माणसाचा विचार व्हावा वातानुकुलीत रेल्वे पेक्षा मांडवी,कोकणकन्या सारखी ऎखादी नवीन रेल्वे गाडी दूरू व्हावी ह्या साठी प्रयत्न व्हायला पाहिजेय. कोकण मार्गावर दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या आहेत आणि आणखीन गाड्या येत आहेत. चिंता ह्या गोष्टीची वाटते कि उद्या कोकणसाठी नवीन रेल्वे सुरु करावयाची झाल्यास रेल्वे व्यस्थ वेळापत्रकाचे कारण दाखऊन हि गाडी नाकारू शकते. तसेच कोकण मार्गावर कोकणात जाणारया आणि दक्षिणेकडे जाणारया गाड्यांची संख्या समान असायला हवी मात्र कोकण मार्गावर दक्षिणेकडे जाणाय्रा गाड्या खूप जास्त आहेत आणि त्यांना कोकणात मर्यादित थांबे आहेत? हे चित्र बदलायला हवे? कोकण रेल्वे चा सर्वाधिक फायदा कोकणला झाला पाहिजे. चिपळूण,रत्नागिरी,कणकवली,कुडाळ अश्या चार स्थानकां व्यतिरिक्त इतरही स्थानकांवर रेल्वे थांबल्या पाहिजेत.