कणकवली नगरपंचायतीत स्वाभिमान पक्षाचा नगराध्यक्ष आणि ११ नगरसेवक असा झालेला विजय हा महाराष्ट्रातील नवीन समीकरणाची चाहूल आहे.
कणकवली- कणकवली नगरपंचायतीत स्वाभिमान पक्षाचा नगराध्यक्ष आणि ११ नगरसेवक असा झालेला विजय हा महाराष्ट्रातील नवीन समीकरणाची चाहूल आहे. या दिशेने भविष्यात आम्ही पुढे जाणार आहोत. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, हे या निवडणुकीतून सिद्ध होत आहे. महाराष्ट्रातील जनता याच पद्धतीने भविष्यात आमच्या स्वाभिमान पक्षाला मतदान करेल, असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला. कणकवलीच्या सर्व मतदारांचा मी ऋणी आहे. आभार मानतो. त्यांनी नागरी विकासाला मत दिलेले आहे. माझ्यावर तसेच माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्यावर तसेच माझ्या पदाधिका-यांवर जो विश्वास टाकला, त्या जनतेच्या विश्वासाला पात्र असे काम करून अपेक्षित असलेला विकास घडवू, असा विश्वास खा. नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या निवडणुकीत आ. नितेश राणे यांनी जे परिश्रम केलेले आहेत, त्याला तोड नाही. दिवस-रात्र त्यांनी मेहनत घेऊन जो वेळ खर्च केला. कार्यकर्त्यांत संघटनात्मक एकोपा घडवून काम केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जिल्हा कार्यकारिणी आणि सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी व इतरही प्रमुख पदाधिका-यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेऊन काम केले. त्यांचाही या यशात सिंहाचा वाटा आहे. हा विजय महाराष्ट्राला स्वाभिमान पक्षाच्या पदार्पणाचे, पक्षाने टाकलेल्या नवीन पावलाची संपूर्ण महाराष्ट्र दखल घेईल असा विश्वास स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, खा.नारायण राणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात जे पक्ष आहे त्यापेक्षा जनहित जोपासणारा पक्ष हा स्वाभिमान पक्ष आहे. हे या निवडणुकीतुन दिसुन आले. स्वाभिमान पक्षाची भुमिका ही लोककल्याणकारी आहे. जनतेला दिलेला शब्द पुरा करेन हा विश्वास देऊन पक्षाची वाटचाल सुरु राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता निश्चितच आमच्या विचारांच्या बाजुने उभी राहिल.
आ. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीचा अभिमान : खा. नारायण राणे
आ. नितेश राणे सक्षमपणे विरोधकांना सामोरे गेले आणि त्यांच्या वादळात हे विरोधक कुठे उडून गेले? ते आज कणकवलीत कुठे जवळपास दिसत नाहीत. आ. नितेश राणे यांनी ज्या पद्धतीने काम केले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अभिमान वाटतो. त्यांच्या संयमाबद्दलही हेवा वाटतो. असे गौरवोद्गार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काढले. बापापेक्षा बेटा सवाई किंवा आणि काहीही म्हणा, कारण कोणत्याही वडिलाला आपल्या मुलाची प्रगती चांगलीच वाटत असते. आ. नितेश राणे यांनी मिळविलेले हे यश सर्वानाच अभिमानास्पद आहे.
आजपर्यंत जे पक्ष राज्यात आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, ज्यावेळेला निकाल लागला आणि स्वाभिमानचा विजय झाला त्याचवेळी कणकवलीतील सर्व राजकीय दुकाने बंद झाली. संदेश पारकर यांचे नाव घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, आजच्या दिवशी अशा लोकांची नावे घेऊन चांगल्या दिवसात कशाला अपशकुन करता. कोण आहे तो? स्वत: निवडून येऊ शकत नाही. आता एखादे लहानसे गाव बघ आणि तिथे ग्रामपंचायतीला निवडणुक लढव तिथेही माझे कार्यकर्ते तुझा पराभव करतील आणि म्हणून त्याने स्वत: बढाया मारु नये. स्वत: निवडून येऊ शकत नाही. तो दुस-यांना निवडून काय देणार? अशा लोकांचे प्रश्न पत्रकारांनी मला विचारुही नये असा सल्ला खा.राणे यांनी दिला.आजच्या नितेश राणेंच्या झटक्याने रात्री झोपणार तरी काय? माहित नाही. अशीही विरोधकांची खिल्ली उडविली.
आमच्या विरोधकांच्या पराभवाची हॅट्रिक झाली. आचरा ग्रामपंचायत आणि पिंगुळी पंचायत समितीत स्वाभिमान पक्ष विजयी झाला. याचा अर्थ त्यांच्याकडे जनाधारच नाही. म्हणूनच तर त्यांचा सातत्याने पराभव होतो.आज आमच्या ११ जागा आल्या. उरलेल्या १-१ जागा आम्ही त्यांना वाटुन दिल्या. अशी खिल्लीही यावेळी शिवसेना-भाजपची नारायण राणे यांनी उडविली.
कणकवलीकरांचा ‘स्वाभिमानवरच’ विश्वास, आमदार नितेश राणे विजयाचे शिल्पकार
मुंबई (विकास पवार) – अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्वाभिमानचा किल्ला आमदार नितेश राणे यांनी एकहाती लढवला. भाजपने कणकवलीत एकेकाळी वर्चस्व असलेल्या संदेश पारकर यांनाच थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवून रंगत आणली. पारकर कणकवलीतील आपले वर्चस्व राखणार की, नितेश राणे पारकरांना अस्मान दाखवणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विद्यमान नगरसेवक समीर नलावडे यांच्या पाठीशी आमदार नितेश राणे यांनी सर्व ताकद उभी केली. प्रचारात कोणतीही कसूर राहू नये यासाठी आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत ठाण मांडले होते. स्वाभिमानच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवसरात्र एक केली. घरोघरी प्रचारावर भर दिला. मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत होते. सोशल मीडियावरही स्वाभिमानचा प्रचार लक्षवेधी ठरला, तर दुसरीकडे संदेश पारकर यांच्यासाठी भाजपनेही प्रचारसभांचा धडाका लावला. राणे विरुद्ध पारकर हे कणकवलीतील पारंपरिक शत्रू एकमेकांसमोर ठाकले. मतदानाच्या आदल्या दिवशी खासदार नारायणराव राणे यांनी पत्रकारांना मोठय़ा विश्वासाने प्रतिक्रिया दिली, कणकवलीत आमचा नगराध्यक्ष ८०० मतांनी विजयी होणार..!
निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या संदेश पारकर यांचा धुव्वा उडवत स्वाभिमानचे समीर नलावडे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. आमदार नितेश राणे यांची निवडणूक रणनीती विरोधकांना अस्मान दाखविणारी ठरली. मी म्हणजे कणकवली समजणा-या संदेश पारकर यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करताना शेवटचा केंद्रबिंदूही उद्ध्वस्त केला. कणकवली म्हणजे आपली जहांगिरीच असल्याच्या रुबाबात वावरणारे संदेश पारकर यांनी २२ वष्रे कणकवलीत सत्ता उपभोगली. स्वत:चा विकास करत आपली घराणी मोठी केली. मात्र, कणकवलीला विकासाच्या आशेवरच ठेवले. ना इथे पायाभूत सुविधा ना पर्यटन उद्योगाला चालना. याचाच राग मतदारांमध्ये धुमसत होता. ज्या राणेसाहेबांनी संदेश पारकर यांना लाल दिवा दिला तेच पारकर काँग्रेसची सत्ता जाताच राणे यांना सोडून भाजपमध्ये सामील झाले.
महामंडळ किंवा विधान परिषद आमदारकीचे भाजपमधील स्वप्न भंग पावल्याने काहीच नाही तर नगराध्यक्षपद तरी मिळेल, या आशेने या निवडणुकीत उतरले. २०१५ साली नगरसेवक फोडून राणेसाहेबांशी केलेली गद्दारी आणि काही जुने हिशेब चुकते करायच्या इराद्याने पेटून उठलेल्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान संदेश पारकर यांच्या नाकी दम आणला. संदेश पारकर यांचे जुगाराचे धंदे जनतेसमोर आणले. पारकरांचा खरा भ्रष्ट चेहरा उघडा पाडला. पारकरांची २२ वर्षाची अपयशी सत्ता जनतेसमोर ठेवली. अखेर जनतेच्या दरबारात पारकर यांची कारकीर्दच नेस्तनाबूत केल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
वैभववाडी आणि देवगडपाठोपाठ कणकवलीतही विजय मिळवून आमदार नितेश राणे यांनी हॅट्ट्रिक साधली आहे. परमपूज्य भालचंद्र महाराज आणि अप्पासाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी असलेल्या कणकवलीतील निकालाने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. वैभववाडी आणि देवगड नगरपंचायत हद्दीमध्ये आमदार नितेश राणे यांनी मागील वर्षे दोन वर्षात विकास केला. त्यामुळे तेथील जनता खूश आहे. त्याचप्रमाणे कणकवली शहराचा सर्वागीण विकास करण्याकरिताच कणकवलीकरांनी नगरपंचायतीच्या चाव्या आमदारांच्या सुरक्षित हातात सुपूर्द केल्या आहेत. आता नगराध्यक्षपदी विराजमान झालेले समीर नलावडे यांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.
कणकवली न.पं.त मालक समजणा-यांचा पराभव – आ. नितेश राणे
कणकवली – कणकवली नगरपंचायतीत मालक म्हणून काम करणा-या स्वाभिमान विरोधी पक्षाला आणि त्यांच्या उमेदवाराला जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. मालक हरले आणि सेवक असलेला स्वाभिमान पक्ष जिंकला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आम्ही सर्वच कार्यकर्ते सेवक आहोत आणि हे रयतेचे राज्य आहे. जनतेपेक्षा कोणीही मोठे समजू नये. मालक समजणा-यांना हे जनतेने दिलेले उत्तर आहे असा टोला आ. नितेश राणे यांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला हाणला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेमय करणे हेच आमचे लक्ष आहे. देऊ तो शब्द पूर्ण करणार, कार्यकर्ते, पदाधिका-यांनी केलेल्या संघटित कामातून आणि जनतेने देवगड-वैभववाडीत विकासकामे केली त्यावर विश्वास ठेवून कणकवलीत हे विजयाचे सर्टिफिकेट दिलेले आहे असेही आ. नितेश राणे यांनी सांगितले.
नारायण राणे साहेब हे आमचे दैवत आहे. ते आमचा स्वाभिमान आहेत. स्वाभिमानाला नख लावण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर कार्यकर्ता पेटून उठतो. संदेश पारकर यांना राणेसाहेबांनीच लाल दिवा दिला. जो शब्द दिला तो पाळला मात्र या निवडणुकीत राणेसाहेबांबद्दल काढलेले अपशब्द हा कार्यकर्त्यांचा अपमान होता आणि त्या अपमानाचा बदला कार्यकर्त्यांनी घेऊन विजयानंतर मिरवणुकीने राणेसाहेबांचा फोटो कणकवली नगरपंचायतीमध्ये लावला. सर्वपक्ष एकत्र येऊन माझ्या विरोधात लढले. मात्र ते मला पाडू शकलेले नाहीत. खरे म्हणजे २०१४ पासुन जिल्हा बँक, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था, ३०० पेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि नगरपंचायती राणेसाहेबांच्या विचारांच्या निवडून देऊन जनतेने २०१९ च्या विजयाची खात्री दिलेली आहे. देवगड, वैभववाडीनंतर कणकवलीत मला जनतेने मिळवून दिलेला विजय हा माझ्या कामाची पोच आहे. येथील नागरिकांना मी जो शब्द दिला आहे. वेगळय़ा स्वप्नवत शहराची निर्मिती करूनच दाखवू असा विश्वासही आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
नितेश राणेला हरविण्याची हिंमत विरोधकांमध्ये नाही. कारण नितेश राणेंच्या मागे जनतेची ताकद आहे. कार्यकर्त्यांची संघटना आहे. मी प्रत्येकाच्या प्रसंगाला धावून जाणारा कार्यकर्ता आहे. विकासाचे व्हिजन घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले तरी माझा पराभव करू शकत नाही. माझ्यावर टीका, राणे कुटुंबावर टीका करून मते मिळत नाहीत. हे जनतेनेच दाखवून दिलेले आहे. राणेसाहेब आणि सिंधुदुर्ग, कणकवली असे एक वेगळे नाते आहे. हे या विजयातून सिद्ध झाले. घोषणा आणि पत्रकार परिषदांमधून मते मिळत नाहीत. तर जनतेसमोर काय करणार याचे व्हिजन ठेवावे लागते. माझ्या विरोधकांसमोर ते व्हिजन नव्हते आणि म्हणूनच त्यांचा पूर्णत: पराभव झाला. काँग्रेस पक्षाचे २००च्या जवळपास मते मिळून डिपॉझिट जप्त झाले, यातूनच त्यांनी राणेसाहेबांना गमावल्यानंतर काय मिळवले याचे परीक्षण करावे असे आ. नितेश राणे यांनी सांगितले.
Kankavali mhaje purn Maharashtra nahi. Saheb