भाजणी, पेरणी, नांगरणी, चिखल, उकळ ही कष्टाची शेती वाढत्या मजुरीमुळे परवडेनाशी झाल्याने भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यातील पारंपरिक भातशेती उजाड आणि ओसाड पडली आहे.
महाड – भाजणी, पेरणी, नांगरणी, चिखल, उकळ ही कष्टाची शेती वाढत्या मजुरीमुळे परवडेनाशी झाल्याने भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यातील पारंपरिक भातशेती उजाड आणि ओसाड पडली आहे. मजुरीत झालेली वाढ, वाढती महागाई, मजुरांची टंचाई आणि शहरीकरणाच्या लोटेमुळे अनेकांनी शेती करणेच सोडून दिले आहे.
अशा नकारात्मक परिस्थितीत मुंबईवाल्याच्या मनिऑर्डरवर विसंबून असलेल्या कोकणातील शेतक-यांसाठी कृषितज्ज्ञ चंद्रेशखर भडसावळे यांच्या एसआरटी तंत्रामुळे आशेचा नवा किरण आला आहे. पारंपरिक भातशेतीसाठी उपसावे लागणारे अपार कष्ट कमी करून पेरणी आणि रोपलागवडीतून हिरवं शिवारं फुलवण्याची किमया भडसावळे यांच्या एसआरटी भातलागवड तंत्राने साधली आहे.
या आधुनिक तंत्राचा लाभ महाडमधील १२ गावांतील शेतक-यांनी घेऊन कोकणात हरित क्रांतीचा नवा नाराच दिला आहे. नेरळमधील कृषितज्ज्ञ भडसावळे यांनी कोकण हा प्रयोग यशस्वीरित्या राबवून कमी कष्ट आणि कमी पैशांत खणखणीत उत्पन्न मिळेल, असा विश्वास शेतक-यांत भरल्याने शेतक-यांच्या चेह-यावर समाधान झळकू लागले आहे.
या प्रयोगाचा कोकणातील बहुतांश भागात अवलंब केल्यास शेती करणे अधिक सुलभ व फायद्याची ठरेल, असा विश्वासही भडसावळे यांनी ‘प्रहार’शी बोलताना व्यक्त केला. कोकणपट्टय़ात पावसाच्या बळावर एकपिकी भातशेती केली जाते. मात्र मागील काही वर्षात शहरीकरणाचा बुरखा पांघरण्यास सुरुवात झाल्याने शेतक-यांची मानसिकता बदलत चालली आहे.
त्यात तरुणवर्ग शेतीकडे दुर्लक्ष करून मुंबईत नोकरीसाठी मोठय़ा प्रमाणावर वळू लागल्याने शेतजमिनी विकून तेथे हौशा गवशांच्या फार्महाऊसचे वारेमाप पीक येऊ लागले आहे. हे चित्र बदलण्यासाठी आधुनिक तंत्राचा नवा पर्याय निर्माण झाला असून आधी (तरवा)भाजणीसाठी होणारी झाडांची कत्तल, पेरणी आणि आवन रोपे काढून होणारी लावणी, मशागत (बेणणी) नागंरणी यासाठी पैसा, वेळ आणि कष्ट खर्ची घालावे लागतात.
मात्र इतके करूनही त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतक-याने भातशेतीला रामराम करण्याची तयारी चालवली आहे. शेतक-यांना या दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी एसआरटी म्हणजे सगुणा राइस टेक्नॉलॉजी, नेरळमधील कृषितज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांनी आणली आहे.
महाड तालुक्यात विभागीय कृषी अधीकारी सुनील खैरनार व तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारे भातलागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे. महाडमधील चांढवेगावातील तसेच एका शेतक-याने या प्रकारे भातलागवड केल्यानंतर पाऊस उशिराने आल्यानंतरही भाताची वाढ उत्तम झाली.
नेरळच्या सगुणा बागेतील आधुनिक पॅटर्न
सगुणा बागेत भातशेतीच्या प्रयोगाची यशस्वी निर्मिती करताना उखळणी, चिखल व लावणी न करताच कायमस्वरूपी गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने भात लावण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. याच गादीवाफ्यावर कडधान्ये तसेच भाजीपाला अशी पीके घेता येणेही शक्य झाले आहे.
नवीन पध्दतीमुळे रोपांच्या मुळांना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होऊन ओलावा कायम राहतो. तसेच लावणी केली जात नसल्याने पावसाची वाट बघत बसण्याची वेळ येत नाही. भाताचे रोप लावणी करता काढल्यानंतर ते लावणी होईपर्यंत मातीपासून वेगळे राहते. वाफे तयार करून त्यावर एसआरटी साच्याद्वारे भोके पाडून पेरणी केली जाते.
एकदा पेरणी केल्यानंतर रोपे चांगल्या प्रमाणात वाढतात. नंतर त्यावर तणनाशक फवारणी करावी लागते. सुयोग्य प्रमाणात खतांची मात्रा दिल्यानंतर रोपांची वाढ आश्चर्यकारक झाल्याचे दिसून येते. दोन वाफ्यांत अंतर असल्याने पुरेशी हवा मिळते. लावणीसाठी पावसाची वाट पहावी लागत नसल्याने वेळही वाचतो. नांगरणीसाठी मजुरावरविसंबून राहावे लागत नाही.
कोकणातील शेतकरी मागील अनेक पिढय़ा एकाच पद्धतीने शेती करत आहे, यामुळे शेतजमिनीचा कस कमी झाला आहे. वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान दिलासादायी आहे.
– चंद्रशेखर भडसावळे, कृषितज्ज्ञ
I am very appreciate above subject, since i am required Mr. Chandrashekhar Bhadsavale Sir contact details (i.e. Phone no. / cell no. / e-mail / address etc )
My name is Mr. Vivek Sahasrabudhe – 9869790845
Thanks & Regards,
Vivek