प्रेमाविषयी लिहीत असलेल्या या सदराबद्दल एका मैत्रिणीशी बोलत होते. कॉलेजात शिकणारी तिची मुलगी शेजारीच बसली होती. कथा-कादंब-या वा सिनेमातून आपल्यापुढे प्रेमाचं जे रूप मांडलं जातं ते खोटं आहे.
प्रेमाविषयी लिहीत असलेल्या या सदराबद्दल एका मैत्रिणीशी बोलत होते. कॉलेजात शिकणारी तिची मुलगी शेजारीच बसली होती. कथा-कादंब-या वा सिनेमातून आपल्यापुढे प्रेमाचं जे रूप मांडलं जातं ते खोटं आहे. किंबहुना फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून मांडलेलं आहे, असं तिचं मत होतं. प्रेमाचं जे उदात्तीकरण केलं जातं ते नकोसं वाटू शकतं.
प्रेमाकरता खूप मोठा त्याग करावा लागतो. तो अनावश्यक आहे, असंही ती म्हणाली. तिच्या बोलण्यात काही अंशी तथ्य होतं. पण तिचं पुढचं वाक्य होतं की, प्रेम ही आवश्यक गोष्ट नाही, तर प्रेमाची भावना म्हणजे एक पर्याय आहे. उठून जाता जाता तिची मुलगी आमच्याकडे बघत म्हणाली.
प्रेम एक पर्याय? मी क्षणभर सुन्न झाले. नंतर मनात विचार आला की, इतक्या लहान वयात किंबहुना अशा तरुण वयात प्रेमाविषयी अशी नकारात्मक आणि टोकाची भावना नेमकी कशी तयार होईल? ब्रेकअप वा प्रेमभंग झाला तरी ही तरुण पिढी त्याला आता योग्यप्रकारे सामोरं जायचा प्रयत्न करते असं दिसतं. हिचा ब्रेकअप वगरे झाला असेल असंसुद्धा मला वाटलं नव्हतं.
तिच्या पालकांशी असलेलं तिचं नातंसुद्धा इतर चारचौघांसारखं होतं. तरुणाईमध्ये असते तशी एक बंड पुकारण्याची वृत्ती, विरोध करणं वा शक्तीपरीक्षा अशा काही गोष्टी घराघरात दिसतात तसंच तिचंही वागणं होतं. तरुण मुलं त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या भविष्याचा विचार करतात त्यातही गर काही नाहीच, पण हाच विचार जर वाढत गेला, अधिकाधिक व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिवादाचा जोर असेल तर अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोनच दूषित होतो, तसं हिचं प्रेमाविषयी झालं असेल का?
अमेरिकेत आणि एकंदर जगात सध्या व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिवाद दोन ताकदवान संकल्पना आहेत. एखादी गोष्ट स्वीकारण्यामागे मुख्य उद्देश हा स्वार्थ असतो हा त्यातला प्रमुख धागा. या स्वार्थाचा कडेलोट म्हणजे फक्त स्वत:चाच विचार. आपल्याकडे आणि एकंदरच जगातही प्रेमाच्या संकल्पनेला त्यागाने मढवलं आहे.
किंबहुना प्रेम म्हणजे फक्त त्याग करावा लागतो, असं समीकरण स्त्रियांकरता तरी असावं असं कोणत्याही स्त्रीच्या मनात सहज येऊ शकतं. सर्वसामान्य माणसे काही रोमियो-ज्युलिएट नाहीत. तेव्हा असं एवढं मागण्याचं प्रेम स्त्रियांनी वा कुणीही नाकारणं हेसुद्धा मी समजू शकते. प्रेमात स्वत:चा काहीच फायदा नाही, म्हणून प्रेम नाकारायचं का, या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. पण तो मुद्दा बाजूला ठेवू या.
श्वास घ्यायचा की नाही हा प्रश्न कुणाला पडत नाही. श्वास घेणं पर्याय होऊ शकत नाही. तसंच प्रेमाचं आहे, असं वाटणारे अनेक आहेत. पण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वर्गाला प्रेम करायचं का नाही असा पर्याय आपल्यापुढं आहे, असंही वाटू शकतं हा मुद्दा आहे. म्हणजे यांच्या लेखी कुणावरही प्रेम केलं नाही तरी काहीही फरक पडत नाही. त्याशिवाय आयुष्यात कोणतीही उणीव राहत नाही. प्रेम हा एक ऑप्शन वा पर्याय असेल तर प्रेम करणंही; मग साडी, ड्रेस, मेकअप वा वस्तूसारखंच, की जे नाकारलं तरी काही बिघडत नाही.
प्रेमाचा व्यापार झाला आहे वा होतो आहे यात तथ्य आहे. प्रेमाची भावना पर्याय झाली, यामागे पण आपली व्यापारी वृत्ती जबाबदार असावी. अन्यथा प्रेमासारखी भावना हा एक पर्याय कसा ठरेल, प्रेमाऐवजी कशाचा स्वीकार करणार आहोत, काय आवश्यक झालं आहे असेही प्रश्न डोक्यात आले. एखाद्याबद्दल प्रेम वाटणं ही नसíगक भावना आहे, ती किती सखोल आहे, तीव्र आहे वा नाही त्यात फरक असेल, पण प्रेम करायचं नाही असा पर्याय नात्यात असू शकतो का? मैत्रिणीच्या मुलीचं बोलणं ऐकल्यावर हा विचार डोक्यातून जात नव्हता.
पालक आणि पाल्य, भावंडं, जोडीदार, आजी-आजोबा वा मित्र-मैत्रिणी यापैकी किती नाती प्रेमाशिवाय शिल्लक राहू शकतात? सहवासाने प्रेम वाढतं. एखाद्याच्या असण्याची सवय झाली तरी त्याचं असणं हवंसं असतं. मग प्रेमाशिवाय फक्त कर्तव्यपूर्ती करायची वा फक्त स्वार्थ पाहायचा, फक्त व्यापारी दृष्टिकोन ठेवायचा, असं सर्व मनात ठेवून ही नाती किती आणि कशी निभवता येतात? प्रेमाशिवाय? माझ्या मते एखादी टोकाची, नकारात्मक घटना या नात्यातलं प्रेम आटवते. पण प्रेमच नसणं ही सुरुवात आणि तोच शेवटही असेल तर ते नातं किती अन्यायकारक आहे!
किंबहुना ते नातं नसतं तर एक बंधन म्हणून राहिलेलं असतं. नातं तुटतं ते त्यातला ओलावा नाहीसा होतो, आपलेपणा नाहीसा होतो म्हणून. शिल्लक उरतात ती लादलेली बंधनं म्हणजे नातं नाही. नातं का हरपतं? प्रेमाची व्याख्या आपण विसरतो, हे त्यामागचं एक कारण असावं.
प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आर्कषण नाही, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांविषयी आदर असणं, एकमेकांच्या हिताचा निर्णय घेणं असे प्रेमाला अनेक पैलू असतात. हे सर्व पैलू नात्यातल्या व्यक्तींनी लक्षात ठेवायचे असतात. कृतीत आणायचे असतात. सुरुवातीला जरी नाही तरी कालांतराने तरी! माणसं जशी स्वकेंद्रित होतात तशी ती ही महत्त्वाची बाब विसरतात.
आपल्या जवळच्या, प्रेमाच्या व्यक्तीचा विचार, तिचं भलं यांचा विसर पडला तर ते प्रेम खरं कसं मानायचं? नात्यातल्या कुणा एका व्यक्तीने जन्मभर असा विचार आणि कृती करणं अशी अपेक्षा आजच्या काळात अशक्यच, म्हणूनच दोघांनी ती जबाबदारी घ्यायला हवी. ही जबाबदारी घेतली नाही तर प्रेमाला पर्याय समजणारी पिढी तयार होण्यास वेळ लागणार नाही.
प्रेमाला पर्याय हा विचार च भयंकर वाटतो. प्रेम आपसूक होते. त्या बद्दल पर्यायाचा विचार करण्यासाठी आधी प्रेमापासून अलिप्त व्हावे लागेल. लेख छान जमलाय!