जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ! वाढत्या तापमानवाढीचे दुष्परिणाम जाणवत असतानाही मुंबईकरांच्या कृतीत अद्याप फरक पडलेला नाही.
मुंबई – जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ! वाढत्या तापमानवाढीचे दुष्परिणाम जाणवत असतानाही मुंबईकरांच्या कृतीत अद्याप फरक पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सृष्टीज्ञान या संस्थांच्या वतीने एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम ‘लहानग्यांना पर्यावरण संवर्धना’चे धडे देणारा असणार आहे.
वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या ‘क्लायमेट अॅम्बेसेडर्स मुंबई-स्टॉकहोम’ या प्रकल्पांतर्गत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या कार्याचा लेखाजोखा २४ जानेवारीला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मांडणार आहेत. स्वीडन येथील ‘क्लायमेट अॅक्शन’ या संस्थेच्या सहकार्याने सुरू झालेल्या या प्रकल्पात ‘हवामान बदल आणि तापमानवाढीची समस्या’वर काम सुरू आहे. मुंबईतील महर्षी दयानंद महाविद्यालयातील ३० विद्यार्थी, मुंबईतील ९ शाळांतील विद्यार्थी तसेच स्वीडनमधील ग्लोबल कॉलेजचे विद्यार्थी यात सहभागी होते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून वर्षभरात या विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उपक्रमाची माहिती या कार्यक्रमातून दिली जाईल, अशी माहिती सृष्टीज्ञान संस्थेचे संस्थापक प्रशांत शिंदे यांनी दिली.
निसर्गाची माहिती समजून घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, खारफुटी, रस्त्यावरील वृक्षांचा अभ्यास केला होता. जगभरात साज-या होणा-या ‘अर्थ अवर’ या जनजागृतीपर कार्यक्रमात सहभागी होऊन अनावश्यक वीज वापर टाळा, पाणी वाचवा, सौरऊर्जा वापरा इत्यादी संदेश देणारी रॅली काढली होती. सोबतच पथनाटय़े सादर करून विविध प्रदर्शने मांडली होती. वातावरणातील बदल समजून, कृती आराखडा तयार केला आणि अंमलात आणला, असे शिंदे यांनी सांगितले. स्वीडनमधील विद्यार्थ्यांनीही तेथील प्रतिकूल वातावरणातही जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी फुलपाखरांची बाग तयार केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या एक वर्षाच्या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी इतके उपक्रम राबवल्याने या विद्यार्थ्यांचा विश्वास दुणावला आहे. हवामान बदलाच्या समस्येला हे उत्तर आहे. एका प्रकल्पातून इतका परिणाम साधता येत असेल तर असे अनेक प्रकल्प मुंबई-महाराष्ट्रातून राबवले गेले तर जैवविविधता संवर्धनाचे खूप मोठे काम होऊ शकते, असा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला.
२४ जानेवारीला होणारे कार्यक्रम
»हवामान बदलाविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
»हवामान बदलाविषयी स्टॉल्स
»मुलांची पर्यावरणस्नेही वेशभूषा
»विशेष वन्यजीव संवर्धनासाठी लहानग्यांचा मोर्चा
वीज वापर टाळा, पाणी वाचवा हे घोष वाक्य मुंबईकरांच्या कानापर्यंत पोहचवण्यास सरकार असमर्थ आहे हे मुंबईच्या जनजीवनामुळे सरकारला पटले असेल. मुंबईत कित्येक ठिकाणी कपड्याचे,दागदागिन्याचे दुकान उभारण्यात आले आहे, ज्यांना परवाने नाहीत. ज्यांचे महिन्याचे उत्पन्न हि साधारण रु.१००/- हि होत नाही, त्यांचे विजेचे बिल किमान रु. ५००/- तरी असेलच, हे बिल भरण्या इतपत तरी लायकी त्या दुकानदारांची आहे का? याचा अर्थ वीज वापर टाळा हा आहे का? प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या ह्या विजेच्या बिलाचा भरणा सामान्य नागरिकावर पडतो. घरात एखादा “Fridge” म्हणजे पंखा आणि ट्यूबलाईट यांचे एकूण महिन्याचे बिल रु.१,०००/-, याचा अर्थ तरी काय? जोगेश्वरी येथे पाण्याची वेळ सकाळी ४.०० ते ६.३० तेही पूर्ण फोर्सने सोडण्यात येणारे पाणी, जे किमान २०मिनिटात साधारण १०जणास पुरेल इतके पाणी, तरीही तेथील पाणी नाले,गटारे,रस्त्यावरून पाण्याची पाईप लाईन फुटली नसतानाही वाया जाते, तरीही पालिका अधिकारी तेथे दखल घेत नाही किंवा तेथील स्थानिक नगरसेवक किंवा आमदार. याचा अर्थ “पाणी वाचवा” हा आहे का? वेळोवेळी नगरसेवकांच्या कानापर्यंत हि बाब पोहोचवली जात असून तेथील गटप्रमुख, उपशाखाप्रमुख काहीच करू शकत नाही? मग ते पाणी जर किमान दोन दिवस मिळाले नाही तर रस्ता रोको आंदोलन करायचेच का?