पूर्वीपेक्षा आजकाल पती-पत्नींच्या नात्यात खूप मोकळेपणा आला आहे. म्हणजे त्यात शेअरिंगचा भाग वाढला आहे. एकमेकांसोबत सुख-दु:ख वाटली जातात. मात्र या जोडीदारापैकी कोणीही एक गेलं तरी मागे राहिलेल्याच्या वाटेला एकटेपणा येतो. मात्र कित्येकदा पुरुष मंडळी दुसरं लग्न करून मोकळे होतात. मात्र हेच त्या स्त्रीच्या बाबतीत झालं तर चित्रं वेगळं असतं. तिच्या पदरी कायमच एकटेपणा वाटय़ाला येतो. मात्र आयुष्याच्या एका वळणावर ही एकटेपणाची सल कायमच तिच्या मनी राहते.
छत्तीस वर्षापूर्वी नवरा गेला. तेव्हा तर मी अगदी तरुण होते. त्यात मूलबाळही नाही. कारण लग्नानंतर साधारण वर्षभरातच पतीचं निधन झालं. दुसरं लग्न तर सोडाच पण साधी लाल रंगाची टिकली लावायची म्हटलं तरीही नाना टोमणे सहन करावे लागायचे. आता साठी जवळ आली. आता काय दुसरं लग्न करणार? आता घरात एकटीच शरीराचं मुटकुळं करून झोपते. कधी कधी झोपही लागत नाही. वेळ जाता जात नाही. कोणी बोलायला पण नाही. छोटी नोकरी करते. तेवढाच वेळ जातो. पण आता विचार केला तर असं वाटतं की एखादा जोडीदार असता तर बरं झालं असतं; पन्नाशीतली सुगंधा सांगत होती.
शुभांगीचं देखील असंच काहीसं झालं. तिचा तर प्रेमविवाह. चार-पाच र्वष संसार फुलला. मुलगी होऊन ती शाळेत जायला लागली आणि नवरा तिला कायमचा सोडून गेला. पदरात मुलगी असल्यामुळे दुसरं लग्न करण्याचा विचारच तिच्या मनाला शिवला नाही. आणि आपल्या मुलीच्या शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष दिलं. आता मुलगी मोठी झाली आहे. उद्या त्या मुलीचं लग्नही होईल. पण मग पुढे काय? हा प्रश्न तिच्यापुढे आ वासून उभा राहिलाच आहे.
सरलाला चार मुलं. चारही मुलांची शिक्षणं झाली. सगळी मुलं चांगल्या ठिकाणी कामाला लागली. खूप कष्ट केल्यानंतर जरा कुठे सरलाला चांगले दिवस आले होते. आणि आता मुलांची लग्न झाल्यावर उतारवयात सोबतीने राहायचं तर नवरा सोडून गेला. खूप दिवस शोधलं पण काहीच पत्ता नाही. कधी कधी सरला या दु:खाला वाट करून द्यायची.
राधिकाचं सगळं चांगलं चाललं होतं. पण ती नोकरी करत नव्हती. पदरी दोन मुलं होती. नवरा चांगल्या हुद्यावर काम करत होता. साधारण चाळिशी-पंचेचाळीशीचीच असतील दोघं. मुलं शाळेतच होती. अचानक नवरा गेला आणि ती एकाकी पडली. संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी तिला नोकरी करावी लागली.
नैना एकुलती एक मुलगी. आई-वडिलांच्या आजारपणात त्यांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे किंवा त्यांच्याकडे नीट लक्ष देता यावं म्हणून तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आज आई-वडील गेले. मात्र कुठेतरी संध्याकाळच्या कातरवेळी मन कातर झालं की हे एकटेपण तिला खायला उठतं.
कधी मुलांसाठी तर कधी स्वत:साठी तर कधी कुटुंबाकडे बघून आपल्या दु:खावर फुंकर घालून स्त्री स्वत:च्या पायावर उभी राहते आणि संसाराचा रेटा ढकलण्याचा प्रयत्न करते. पतीच्या निधनाचं तिला काय दु:ख होत नसेल का? पण ते सगळं बाजूला सारून संसाराचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न करते. पण आपला समाज कितीही पुढारलेल्या विचारांचा का असेना पण तिला जगू देत नाही.. काही ना काही खुसपट काढतच राहतो. तिच्या दागिने घालण्यावर, घरात राहण्यावर त्या समाजाचं नाही म्हटलं तरी बारीक लक्ष असतं. त्या टक्क्याटोमण्यांनी?तिने कसं जगायचं. कितीही?दुर्लक्ष करायचं म्हटलं तरीही या गोष्टी लपत नाहीत.
पूर्वीच्या काळी नवरा-बयकोचा संबंध केवळ समागमापुरताच यायचा. मात्र आता हे चित्रं बदललं आहे. तिच्यावर कायमच घराची जबाबदारी असायची. तेव्हा तर एकमेकांशी बोललेलही?चालायचं नाही. पण?आता तसं राहिलं नाही. पूर्वीपेक्षा नवरा आणि बायको या नात्यात खूप मोकळीक निर्माण झाली आहे. अरेंज मॅरेज असलं तरीही?आता दोघं एकमेकांना ओळखत असतात. त्यामुळे एकमेकांशी शेअरिंग वाढलं आहे. कित्येक महिला प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराबरोबर शेअर करतात. मग अशा वेळी तो जोडीदारच सोडून गेल्यावर त्याची कमतरता त्या कशी भरून काढणार? फार क्वचित मुली दुसरं लग्न करतात. पण ते करताना त्यांना खूप लोकांना तोंड द्यावं लागतं, मुळात महिला विधवा झाली तर तिला दुस-या लग्नाचा कोणी सल्लाच देत नाही. आणि महिलांनादेखील त्याची फारशी काही गरज वाटत नाही.
कारण त्यांना मुळातच जबाबदारी?पेलण्याची सवय असते. मात्र हीच गोष्ट काहीशी उलटी झाली म्हणजे पुरुष विधुर झाला तर मात्र त्याला दुसरं लग्न (विधवा चालत नाही.) करण्याचा ताबडतोब सल्ला दिला जातो. कारण त्याच्या मुलांना आईची गरज असते म्हणून.. मग स्त्री जेव्हा विधवा होते, तेव्हा तिच्या मुलांना वडिलांची गरज नसते का? त्या वडिलांची कमी कोण भरून काढणार, याचा कोणी विचारच करत नाही. समजा विचार केला तरी दुसरं लग्नाचा सल्ला दिला जात नाही. तेव्हा मात्र बाईच्या माथी ‘बिचारीचं नशीब दुसरं काय?’ असा शिक्का चिकटवला जातो. तिने दुसरं लग्न केलं म्हणून बिघडलं कुठे? मात्र अशी उदाहरणं अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत.
हळूहळू मुलांचं शिक्षण संपतं, त्यांना नोकरीही लागते पण एकदा का मुलांची लग्न झाली की मग पुढे काय? ती घरात एकटीच राहणार. नोकरी करणारी स्त्री असेल तर तिचा जरा तरी वेळ जातो मात्र जी महिला एकटीच घरी असेल तिने काय करायचं? मग अशा स्त्रिया स्वत:ला देवाधर्मात गुंतवून घेतात. कोणी संगीत ऐकणे, पुस्तक वाचन करणे, पोथी वाचणे, तोरणं करणे, दळणं काढून देणे किंवा टीव्ही पाहणे आणि हल्ली?तासन्तास मोबाईलवर खेळणे असं काही ना काही करत स्वत:ला गुंतवून ठेवतात. शेवटी काय मन कशात तरी गुंतवून ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण या रिकाम्या मनात नाही नाही ते विचार येतात. नाहीतर हे एकटेपण खायलाच उठतं म्हणा. आजूबाजूला मुलं असली, नातवंडं असली कितीही गोंधळ असला तरी कुठेतरी जोडीदाराची गरज भासते हे देखील तितकंच खरं आहे. कारण सुना-मुलांना त्यांचे व्याप असतात. नातवंडं सोबत राहून तरी किती राहतील? शेवटी राहून राहून ती व्यक्ती एकटीच राहणार ना? संसार एक-र्वष असो किंवा वर्षानुवर्षाचा त्यात कित्येक गोष्टी घडत असतात.
त्या गोष्टी कोणाबरोबर तरी शेअर करायच्या असतात. तेव्हा आपल्या जोडीदाराची कमतरता भासते. कधी एकमेकांबरोबर संसार करताना वाटय़ाला आलेली चुकभूल तर कधी सुख-दु:ख, कधी कौतुकाची थाप तर कधी तक्रार. तेव्हा ते दिवस चुकभूल घेण्याचेच असतात. कधी पैशांच्या अभावी राहून गेलेल्या कित्येक गमतीजमती त्या दिवसांतच करायच्या असतात. कारण या दिवसांत तसं पाहायला गेलं तर टेन्शन नसतं. नोकरीची धावपळ नसते. त्यामुळे आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करण्यासाठी हीच तर खरी वेळ असते. अशा वेळी जोडीदाराची साथ नसेल तर काय उपयोग आहे?
नैनासारख्या कित्येक मुली आपल्या आई-वडिलांसाठी एकटं राहण्याचा निर्णय घेतात. त्यांचं आयुष्य पणाला लावतात. पण कितीही काही झालं तरी आयुष्याच्या सरत्या वर्षात हेच एकटेपण माणसाला खायला उठतं. तुम्ही म्हणाल की जोडीदार तरी किती र्वष पुरणार म्हणा.. त्यामुळे एक र्वष काय किंवा अनेक वर्षाचा संसार असला म्हणून काय झालं शेवटी त्या जोडीदाराचं निधन झालं की पुन्हा तेच एकटेपण वाटय़ाला येतच. पण निदान त्या एकटेपणाला समोरं जाण्याचं बळ तेव्हा त्यात आलेलं असतं. असं म्हणायला काही हरकत नाही.
वास्तवदर्शी लेख . उपाय सुचवावा जेणेकरून हा सल जर सुसह्य होईल .