शेतक-यांच्या कर्जमाफीवरून तापलेले वातावरण काल काही प्रमाणात निवळले आणि आज तर पार थंडावलेले दिसले. शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय हे सभागृह चालू देणार नाही, अशा ठोकलेल्या आरोळ्या आता हवेत विरल्या.
शेतक-यांच्या कर्जमाफीवरून तापलेले वातावरण काल काही प्रमाणात निवळले आणि आज तर पार थंडावलेले दिसले. शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय हे सभागृह चालू देणार नाही, अशा ठोकलेल्या आरोळ्या आता हवेत विरल्या. आज विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज अगदी सुरळीतपणे सुरू झाले. केवळ तीन आठवडय़ांचे विधिमंडळाचे अधिवेशन आहे. प्रत्यक्ष कामकाज तर केवळ १४ दिवसच चालणार आहे.
या चौदा दिवसांतले तीन दिवस विरोधकांनी कोणत्याही कामकाजाशिवाय विधान भवनाच्या पाय-यांवर बसून वाया घालविले. आपण किती आक्रमक आहोत हे दाखविण्यासाठी विरोधकांनी (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी विधान भवनाच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले. हे आंदोलन करीत असताना आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे फोटो लावलेले होते. इतका गंभीर विषय असताना तितकेच गंभीर वातावरण जपणे गरजेचे होते. मात्र आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या फोटोखाली विरोधी पक्षांचे सदस्य हास्यविनोद करताना दिसत होते.
प्रसारमाध्यमांचे कॅमेरे समोर आल्यावर त्यांच्या घोषणांना जास्तच चेव चढताना दिसत होता. त्यामुळे सरकारही हादरले. यांचे आंदोलन चॅनेलने नाही दाखवले तर यांची हवा जाईल म्हणून कॅमेरेवाल्यांना ते शूट करण्यास बंदी केली. कॅमेरे पुढे यायला बंदी केली तर हे कॅमे-यापुढे जाऊन टाळ घेऊन नाचत सुटले. तिथे नाचतानाही त्यांच्यामध्ये कोणतेही गांभीर्य पाहायला मिळत नव्हते. हे सर्व आंदोलन सुरू असतानाच गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराऐवजी काँग्रेसचा उमेदवार बसल्याची बातमी येऊन धडकली आणि विरोधी पक्षांच्या एकीचा फुगा फुटला.
शुक्रवारी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधकांच्या फुटीवर जाहीर शिक्कामोर्तब झाले आणि भाजपाचा जीव भांडय़ात पडला. विरोधकांत फूट पडली की सत्ताधारी निर्धास्त होतात, हे आज पुन्हा दिसले. साडेतीन दिवस एकीचे ढोल वाजविणारे विरोधक ढिले पडताच दोन्ही सभागृहांतील कामकाज एकदम सुरळीत सुरू झाले. विधानसभेच्या पाय-यांवर आणि कॅमे-यासमोर शेतकरी कळवळ्याचा विषय मांडणारे विरोधक किती आक्रमकपणे सभागृहात बोलतात याकडे सर्वाचेच लक्ष होते. खरे तर विधानसभेतील चर्चा नेहमी वादळी ठरतात. या वेळी मात्र जरा वेगळे चित्र दिसले. विधानसभेपेक्षा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिक आक्रमकपणे विषय मांडला होता. विधानसभेतील भाषणे त्यामानाने खूपच सौम्य झाली. त्यातही आज शुक्रवार असल्याने प्रत्येकालाच आपापल्या मतदारसंघात परतायची घाई झाली होती. म्हणूनच सकाळपासूनच दोन्ही सभागृहांतील उपस्थिती रोडावलेली दिसत होती. दुपारनंतर विधानसभेत तर ती फारच कमी झालेली दिसली.
आज विधानसभेतील दिवसभराच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांचे भाषण अत्यंत वास्तववादी झाले. जयंत पाटील यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलेले असल्याने शेतक-यांना कर्जमाफी देणे कसे अवघड आहे आणि त्यातून काय मार्ग काढता येऊ शकतो याची सुंदर मांडणी केली. दोन्ही सभागृहांत झालेल्या चर्चेला आता मुख्यमंत्री सोमवारी उत्तर देणार आहेत. त्याच वेळी दुष्काळाने होरपळणा-या शेतक-यांना सरकार कसा दिलासा देते ते दिसून येईल.
पाहू आता पुढे काय होतायते //
शेत्कारांचा विचार करारे/? आधीच दुष्काळ पडलाय तुमी तिकडे करताय मजा बिचारे शेतकरी बघतात कधी वरून राजा तेंब तेंब पाडतोय ..