दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कानठळ्या बसवणा-या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होते. यंदा ध्वनी प्रदूषणात शिवसेना भवनाजवळील दहीहंडी पथकाने बाजी मारली.
मुंबई – दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कानठळ्या बसवणा-या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होते. यंदा ध्वनी प्रदूषणात शिवसेना भवनाजवळील दहीहंडी पथकाने बाजी मारली. तेथे तब्बल १०६. ८ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल वरळी येथील जांभोरी मैदान येथे राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या उत्सवात ९८.१ डेसिबलची नोंद झाली.
दरवर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान होणा-या ध्वनी प्रदूषणावर ‘आवाज फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने नोंद ठेवण्यात येते. आवाज फाउंडेशनच्या संस्थापिका सुमैरा अब्दुलली यांच्याकडून ध्वनी मोजमाप यंत्रणेद्वारे ध्वनी प्रदूषणाची नोंद करण्यात येते. यंदा पुण्यातील डॉ. गणेश कोल्हटकर यांनी आवाज फाउंडेशनच्या वतीने ध्वनी प्रदूषणाची नोंद केली.
दादर येथील शिवसेना भवनाजवळील दहीहंडी, राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठान तसेच घाटकोपर येथील राम कदम मित्र मंडळातील दहीहंडी महोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण मोजले जाते. दुपारी बारा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आवाज फाउंडेशनकडून हे काम सुरू होते.
यंदाच्या ध्वनी प्रदूषणात दुपारी साडेतीन ते ४ वाजण्याच्या दरम्यान शिवसेना भवन येथे मोजण्यात आलेल्या ध्वनी प्रदूषणात कमाल प्रदूषण हे ७१.२ डेसिबल नोंदवण्यात आले. ध्वनिक्षेपकाचा वापर होताच आवाजाची पातळी ९८.५ डेसिबल नोंदवली गेली. डीजे सुरू झाल्यानंतर आवाजाच्या पातळीने शंभरी पार करून १०६.८ डेसिबल आवाज नोंदवला.
त्याखालोखाल वरळी येथील जांभोरी मैदानात दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान किमान आवाज ७०.१ डेसिबल नोंदवण्यात आला. मात्र स्पीकरच्या आवाजाने आवाजाची पातळी ९४.१ डेसिबलपर्यंत पोहोचली. डीजेच्या वापरामुळे आवाज ९८.२ डेसिबलपर्यंत ध्वनी प्रदूषण नोंदवले गेले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांपासून पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत घाटकोपर येथील राम कदम मित्र मंडळातील ध्वनी प्रदूषण मोजले गेले.
त्या वेळी कमाल आवाजाची पातळी ८६.१ डेसिबल नोंदवली गेली. मात्र कालांतराने किमान आवाजाची पातळी ८९.६ डेसिबल नोंदवली गेली. मात्र अभिनेता गोविंदाच्या आगमनानंतर प्रवेश नाकारला गेल्याने डीजेमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणाची नोंद आवाज फाउंडेशनला करता आली नाही. तोपर्यंत आवाजाची पातळी ९२.६ डेसिबलपर्यंत पोहोचली होती, अशी माहिती कोल्हटकर यांनी दिली.
शाब्बास !! धैर्यवान !!!!