जाचक रूढी, अनिष्ठ परंपरा, वाईट गोष्टी आदींचं दहन करून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा सण म्हणजे होळी उत्सव!
विजयदुर्ग- जाचक रूढी, अनिष्ठ परंपरा, वाईट गोष्टी आदींचं दहन करून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा सण म्हणजे होळी उत्सव! मात्र काही ठिकाणी याची पायमल्ली होताना दिसते तेव्हा सण साजरे करण्याच्या मार्गातील कुप्रवृत्ती प्रकर्षाने जाणवतात. कोकणात प्रत्येक भागात होळीची वेगवेगळी परंपरा आहे.
वेगवेगळ्या चाली आहेत. मात्र त्यामागे सर्वाची भावना एक आहे. या भावनेची जपणूक करताना आजही परंपरेला फाटा न देता कोकणातील गावागावात होळी उत्सव साजरा केला जातो. होळी पौर्णिमेला मध्यरात्री होळी जाळणे, त्यानंतर साजरी केली जाणारी धुळवड आणि बाहेर पडणारी सोंगं या क्रमानुसार जवळजवळ सर्वच ठिकाणी होळी साजरी केली जाते.
मात्र हे करताना त्या त्या भागातील पद्धती वेगवेगळ्या आहेत. गाबीत समाजाचा होळी उत्सव कोकण पट्टयात फार मोठया उत्साहात साजरा केला जातो. विजयदुर्ग, गिर्ये-बांदेवाडी, मोंड, मुणगे, मिठमुंबरी, तांबळडेग, मोर्वे, आचरे, देवबाग, तारकर्ली, मिर्याबांदा आदी गाबीत वस्ती मोठया प्रमाणात असलेल्या भागात शिमगोत्सवाचं स्वरूप आगळंवेगळं असतं.
राजापूर तालुक्यातील जैतापूर, आंबेरी, कात्रादेवी गावांमध्येही या समाजाचा शिमगोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. देवगड तालुक्यातील विजयदुर्गच्या गाबीत समाज बांधवांचा शिमगोत्सव आपल्या वैशिष्टय़ांमुळे कोकणात प्रसिद्ध आहे. हा उत्सव जवळजवळ पंधरा दिवस चालतो. पंचमीला या उत्सवाची सुरुवात होते.
‘दस-याच्या मुहुर्तान हो, इंग्रज आले बा-यावर
नांगर टाकूनी गा, नांगर टाकूनी अवल्यावर
मार काय देतो किल्ल्यावर
सुमरण करूनी हो, सुमरण करूनी गा
सुमरण करूनी रामेश्वराचे, तोफी गोळा घातला
गोळा पडला हो, गोळा पडला गा
पडला तरांडयावर, तरांडा जळायासी लागला
इंग्रज पळोनिया गेला…’
यासारख्या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या शिमग्यातील पारंपरिक फागांवर गाबतांच्या घुमटाची थाप विजयदुर्गमध्ये घुमते तेव्हा संपूर्ण विजयदुर्ग गजबजून जातो. विजयदुर्ग येथील गाबीत समाजाचा शिमगोत्सव म्हणजे उत्साह, आनंद आणि जल्लोष!
या समाजाच्या प्रत्येक घरातील एक ना एक कुणीतरी मुंबई वा अन्य बाहेरगावी स्थायिक आहे. मात्र शिमग्यामध्ये प्रत्येक घरातील एक तरी प्रतिनिधी विजयदुर्गला या सोहळ्यासाठी हजर राहतो.
पंचमीला सायंकाळी बंदर कार्यालयाजवळच्या खालच्या मांडावर असलेला होळदेव वर काढून गाबतांच्या छोटया होळीला सुरुवात होते. शिमगोत्सवाची सांगता होताना हा होळदेव या ठिकाणी पुरण्यात येतो. पूर्वी असं सांगत की आदल्या वर्षी पुरण्यात येणारा होळदेव जेव्हा पुढच्या वर्षी वर काढला जात असे तेव्हा जमिनीमध्ये निखारे दिसत होते.
अर्थात, होळदेवाचाच हा चमत्कार असल्याची सर्वाची श्रद्धा होती. होळदेव वर काढल्यावर खालच्या मांडावरून निघणारी ही होळी राम मंदिराजवळच्या मधल्या मांडावरून चौगचारवाडी येथील वरच्या मांडामार्गे निघते व पुन्हा खालच्या मांडावर येते. ही होळी एक दिवस गोखले घाटी व एक दिवस चाफेगल्ली घाटी अशी दोन मार्गाने जाते.
‘सोडला पाणी गेला मळ्यामध्ये’, ‘वाट गे भटणी मिरयाची चटणी’ यासारखी पारंपरिक होळीगीते म्हणत ढोल आणि झांजेच्या तालावर ‘झँच्याक झँच्याक’ असा अंगामध्ये वेगळी स्फूर्ती निर्माण करणारा आवाज काढत जाणारी ही होळी गाबतांच्या शिमगोत्सवाची वातावरणनिर्मिती करते.
पौर्णिमेला मोठी होळी खेळवली जाते. ही होळी खेळवताना मधल्या मांडावर राममंदिराच्या पुढे मणचेकर घराजवळच्या तटावर खोताच्या होळीची गाठ पडते तेव्हा खोताची होळी या ठिकाणी अडवली जाते. मात्र खेळीमेळीत साजरा होणा-या या प्रसंगामध्ये आजवर कधीही कटुता आलेली नाही. हा प्रसंग पाहण्यासाठी गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोक मोठया संख्येने इथे जमतात.
होळी पौर्णिमेच्या दुस-या दिवशी सकाळपासून बंदरातील खालच्या मांडावर नारळ, कोंबडे, बकरे देऊन होळदेवाला गा-हाणे घालतात. या वेळी नवसाची दारूही देवाला मानवली जाते.
गाबतांचे प्रसिद्ध रोंबाट म्हणजे रंगपंचमी! या रोंबाटाची लय वेगळीच असते. त्यानंतर विजयदुर्गमध्ये येणारे रामेश्वर, चौंडेश्वरी मंदिरातील देवखेळे, कोळीण, गोमूचे नाच वगैरेंनी विजयदुर्ग परिसर गजबजून जातो.
दरम्यान, गाबतांचे घुमाट आणि घुमटाच्या तालावर म्हटले जाणारे पारंपरिक ऐतिहासिक व पौराणिक ‘फाग’ येथील शिमगोत्सवामध्ये रंग भरतात. सप्तमीपर्यंत हे घुमाट घरोघरी जाते. सप्तमीला शिंपण झाल्यावर गाबीत समाजाच्या या मोठया उत्सवाची सांगता होत जाते. शिंपणाच्या दिवशी मधल्या मांडावर आणली जाणारी सोंगं हाही एक करमणुकीचा कार्यक्रम असतो. या वेळी गा-हाणी, देणी, नवस आदी धार्मिक कार्यक्रम होतात.
शिंपण झाल्यावर दोन दिवसातच चौगचारवाडीजवळच्या वरच्या मांडावर पोस्त केलं जातं. या पोस्तावेळी भाविकांनी होळदेवाला दिलेले बकरे, कोंबडे कापले जातात आणि त्याचा प्रसाद वाटला जातो. या वेळी गा-हाणे घालून देव खालच्या मांडावर नेऊन पुरतात आणि गाबीत समाजाच्या शिमगोत्सवाची यशस्वी सांगता केली जाते.
जवळजवळ १५ ते २० दिवस चालणारा विजयदुर्गमधील गाबीत समाजाचा हा शिमगोत्सव म्हणजे उत्साह आणि आनंद असतो. दरम्यान, तांबळडेगमध्ये पौर्णिमेला देवहोळी व दुस-या दिवशी वाडीवाडीवर होळी उभी करण्याचा कार्यक्रम होतो.
घुमटावर वाजवले जाणारे पारंपरिक फाग म्हणत घरोघरी कोळीण नाचवली जाते. येथील शिमगोत्सव दशमीपर्यंत असतो. मीठमुंबरी बागवाडीला गाबीत समाजाच्या वस्तीवर मध्यभागी मांड आहे.
येथील शिमगा प्रतिपदेपासून नवमीपर्यंत चालतो. मांडावर बांधलेल्या कुंडात लाकडे लावून आग पेटवली जाते व शिमगा साजरा केला जातो. या मांडावर मात्र दारूला अजिबात स्थान नाही. फाल्गुन वद्यषष्ठीच्या दिवशी रात्री धूळ जागर असतो. या वेळी नाटक, दहिकाला व अन्य कार्यक्रम करून पहाटेपर्यंत कार्यक्रम केला जातो. या गावातही पोस्त साजरे करून शिमग्याची सांगता होते. मुणगे गावात पोफळीची होळी असते.
इथे मानकरी आणि गावातील लोकांच्या परवानगीने गुरव पोफळीच्या झाडावर कु-हाडीचा पहिला घाव घालतो. त्यानंतर ते झाड सर्वाच्या मदतीने तोडून जमिनीवर न पाडता वाजतगाजत भगवती मंदिराशेजारी होळी उभी करण्याच्या ठिकाणी आणतात. ही पोफळ आंब्याचे टाळ बांधून सजवतात. त्याला निशाण लावतात.
सायंकाळी आडबंदर येथील गाबीत समाजाचे लोक दोरीचा फासा त्या पोफळीला बांधतात. त्यानंतर होळी उभी केली जाते. घाडी, हरिजन, गुरव, देवळी बारा पाचाचे मानकरी यांच्या साथीने हा शिमगोत्सव मोठया उत्सवात साजरा केला जातो.
हिंदळे गावच्या मोर्वे वाडीत काळभैरवाच्या मंदिरासमोर देवहोळी असते. हे एक जागृत देवस्थान असल्याने त्या दिवशी देवळाव्यतिरिक्त अन्यत्र होळी पेटवली जात नाही. मोर्वेमध्ये असलेल्या मांडावर होळीच्या दिवशी प्रमुख मानक-याच्या हस्ते नारळ ठेवून गा-हाणे घातले जाते. त्यानंतर घुमटावरची थाप, सोंगं आणणं, दशावतार, लळीत व शेवटच्या दिवशी गा-हाणे, नवस बोलणे, नवस पेडणे आदी माध्यमातून गाबीत समाज बांधव इथे शिमगोत्सव साजरा करतात. आचरे-पिरावाडीत गावची बैठक होऊन फाल्गुन द्वितीयेपासून पाडव्यापर्यंत शिमगोत्सव असतो. या शिमगोत्सवात संगीत नृत्याचे अनेक कलाप्रकार पाहायला मिळतात.
नाटय़संगीत, भक्तिसंगीत, घुमटावरील निरनिराळ्या चालीमध्ये वादन, झपताल, केरवा, ठुमरी, दादरा इ. ताल व त्याची गाणी या ठिकाणी ऐकायला मिळतात. मिर्याबांदा-सर्जेकोट गावच्या होळीची परंपरा शंभर वर्षापूर्वीपासूनची आहे. इथे होळीच्या शेवटच्या पोस्तादिवशी दुपारी प्रथम गावचा कोंबडा बळी दिला जातो व त्यानंतर नवसाचे कोंबडे, बकरे बळी देऊन देवाला प्रसाद ठेवल्यावर सर्वाना तो वाटला जातो.
कोकणात ज्या ज्या भागात गाबीत समाजाची वस्ती आहे, त्या त्या ठिकाणी तेथील परंपरेनुसार शिमगोत्सव साजरा केला जातो. बहुतेक ठिकाणी घुमटावर बोलले जाणारे फाग आणि मांडावर आणली जाणारी सोंगे हा प्रकार एकच असतो.
महाभारत, रामायण, इतिहास या सर्वच विषयांवरील फाग शरीरामध्ये चैतन्य निर्माण करतात. फाग हा एकाच चालीत म्हटला जाणारा प्रकार असला तरी या मात्राबद्ध गीतप्रकारामध्ये कल्पकता आढळते. त्यामुळे घुमटावरची थाप वाजली आणि चढया आवाजात फाग सुरू झाले की, त्यातील एक-एक शब्द तत्कालीन आठवणी जाग्या करतात.
गाबीत समाजाच्या होळीतील दुसरा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे सोंगं! लहान लहान प्रसंग डोळ्यासमोर आणून त्याला गावातील लोकांचे संदर्भ देऊन विनोदी पद्धतीने ही सोंगं मांडावर सादर केली जातात. या वेळी कुणाच्या नावाचा उल्लेख झाला तरी ‘बुरा न मानो होली है’ असं समजून चाललं जातं. सुरुवातीला गणपतीचं सोंग आणल्यावर नंतर इतर सोंगांना सुरुवात होते.
हल्ली काही ठिकाणी सोंगं बाजूला ठेवून आधुनिक नाटयाविष्कार मांडावर रंगू लागले आहेत. तरीही अनेक ठिकाणी सुरुवातीला सोंगं आणली जातात. गाबीत समाजाच्या या शिमगोत्सवातील सर्व चालीरीती, कोळीण नाचवताना म्हटले जाणारे पहाडी आवाजातील फाग, त्याचे एकेक संदर्भ, मांडावरचे धार्मिक प्रकार, सोंगं या सर्वामुळे संपूर्ण कोकणात शिमगा आणि शिमग्यात गाबतांचा शिमगा प्रसिद्ध आहे.
कोकणातील गाबीत बांधवांचा हा शिमगोत्सव अनुभवण्यासाठी आता तर देशभरातील पर्यटकही शिमग्यामध्ये कोकणात खास करून उतरतात. कोकणातील या सणासाठी एस.टी. महामंडळ, रेल्वे याचबरोबर खासगी वाहतूक सेवाही आधीपासूनच सज्ज असते.
गाबीत समाजाला पशु हत्त्या, पक्षी हत्त्या या गुन्ह्याखाली अटक करून जेलमध्ये टाकले पाहिजे… भारत देशाचे कायदे या मागासलेल्या गाबीत समाजाला माहित नाहीत काय… भारत देशात कायद्याचे राज्य आहे… गाबीत समाजाची संस्कृती आणि परंपरा हि अंधश्रद्धा आहे…. माहिती दिल्याबद्दल आभारी.. लवकरच कायदेशीर कारवाईसाठी मंत्रालयावर धरणे आंदोलन करण्यात येतील. होळी आहे समजून घ्या.