जागतिक बाजारपेठेत ज्याप्रमाणे रुपयाच्या किमतीत घसरण होत आहे त्याहून अधिक मोदींची प्रतिमा घसरत चालली आहे, अशी खिल्ली उडवून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
पाटणा (बिहार)- मोदी सरकारच्या काळात महागाईचा आगडोंब उसळला आहे. जागतिक बाजारपेठेत ज्याप्रमाणे रुपयाच्या किमतीत घसरण होत आहे त्याहून अधिक मोदींची प्रतिमा घसरत चालली आहे, अशी खिल्ली उडवून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. चौदा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार केवळ ‘शोबाजीत’च रमले आहे, असा हल्लाबोलही सोनिया गांधी यांनी केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष या महायुतीतर्फे रविवारी आयोजित पाटणा येथे लाखोंच्या जनसमुदायात ‘स्वाभिमान रॅली’ काढण्यात आली होती. त्यावेळी आयोजित जाहीर प्रचारसभेत सोनिया बोलत होत्या. ‘मनरेगा’सारख्या गरिबांसाठी असलेल्या योजनांत कपात करण्यात आल्याबद्दलही सोनिया यांनी मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ५६ इंचाची छाती पुढे काढून मोदींनी खोटय़ा आश्वासनांवर मते मिळवली. निवडणुकीपूर्वी पाकिस्तानवर कडाडून टीका करणारे मोदी दररोज सीमारेषेवर हल्ले होताना मौनव्रत धारण करून आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात आपले जवान शहीद होत आहेत. सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. त्यावर कोणताही उपाय हे सरकार करत नाही. मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याने देशात खळबळ उडवून दिली. मात्र या घोटाळय़ावर मोदींनी का चुपी साधली आहे? असे अनेक सवाल सोनिया गांधी यांनी यावेळी उपस्थित केले. पंतप्रधान मोदी यांनी बिहारींच्या डीएनएविषयी केलेल्या वक्तव्याचे उत्तर बिहारची जनता त्यांना मतपेटीतूनच देईल, असेही सोनिया म्हणाल्या. बिहारची संस्कृती आणि बिहारींना ‘बिमारू’ म्हणणा-या मोदींना त्यांची जागा दाखवण्याची हीच संधी असल्याचे आवाहन सोनिया यांनी बिहारच्या जनतेला केले. उद्योजक आणि व्यापारीवर्गाचे हित जपणारे मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. भू-संपादन विधेयकाच्या माध्यमातून शेतक-यांची जमीन व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा डाव मोदी सरकार आखत असल्याचा आरोपही सोनिया यांनी केला. या विधेयकाला विरोध करण्यासाठी आम्ही संसदेत आणि संसदेबाहेर दिलेल्या लढय़ामुळे मोदी सरकारला माघार घ्यावी लागल्याचेही सोनिया यांनी यावेळी सांगितले.
स्मार्ट शहरे नकोत, स्मार्ट गावे हवीत
केंद्रातील मोदी सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेची खिल्ली उडवताना आम्हाला स्मार्ट शहरे नकोत, स्मार्ट गावे हवीत, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये आयोजित ‘स्वाभिमान रॅली’त केली. महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून त्यावर मोदी सरकारने देशातील जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला.
काँग्रेसने बिहारी जनतेचा कायम सन्मान केला आहे. मात्र काहींना बिहारला कमीपणा दाखवण्यात आनंद वाटतो. त्यांना आता त्यांची जागा दाखवून द्या. मोदींनी सत्तेवर बसण्यापूर्वी दरवर्षी एक कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याला वर्षपूर्ती झाल्यानंतरही आश्वासनपूर्ती झालेली नाही. नोकरी देणे दूरच देणे केंद्र सरकारतर्फे भरतीही बंद केली आहे. त्यामुळे आता यांच्या भूलधापांना बळी पडू नका, असे आवाहनही सोनिया गांधी यांनी बिहारी जनतेला केले.
बिहारमध्ये रविवारी आयोजित स्वाभिमान रॅलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव, समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी मोदी सरकारच्या कारभारावर कडाडून हल्ला चढवला.
अरे कसली ह्याची किमत मज्जा मारच काम चालू आहे नुस्त हि योजना ती योजना करून पैसे लुटायचे आणि परदेशात जावून मज्जा मारायची!