मुंबईच्या लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाला बघता बघता सात वर्षे पूर्ण झाली. ११ जूलै २००६ ला अवघ्या अकरा मिनिटांत सात बॉम्बस्फोट झाले आणि मुंबईची लाईफलाईन पूर्णपणे ठप्प पडली. दहशतवादी कारवायांना बळी न पडता मुंबापूरी आज पून्हा एकदा नव्या जोमाने उभी आहे. यातच मुंबईकरांच खरं स्पीरीट आहे.
संध्याकाळची वेळ… मुंबईकर नेहमीप्रमाणे ऑफिसमधून परतीच्या वाटेवर निघालेला. चर्चगेट स्थानकातून संध्याकाळी साडेपाच वाजता निघालेली लोकल खार आणि सांताक्रूझ स्थानकादरम्यान असताना सहा वाजून २४ मिनिटांनी पहिला स्फोट झाला. क्षणार्धात काही कळायच्या आतच वांद्रे-खार (सहा वाजून २४मिनिटे) ,जोगेश्वरी (सहा वाजून २५ मिनिटे), माहिम (सहा वाजून २६ मिनिटे), मिरा रोड – भाइंदर (सहा वाजून २९ मिनिटे), माटूंगा-माहिम (सहा वाजून ३० मिनिटे), बोरीवली (सहा वाजून ३५ मिनिटे) असे एकापाठोपाठ एक असे सात स्फोट झाले. या सर्व स्फोटांमध्ये कूकरचा वापर करण्यात आला होता. आरडीएक्स कूकरमध्ये भरुन हा स्फोट घडवण्यात आला होता. हे सर्व स्फोट लोकलच्या पहिल्या दर्जाच्या डब्यामध्ये घडवण्यात आले होते.
मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात २०९ जणांचा बळी गेला तर सातशेहून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले. मात्र घटनेच्या दुस-या दिवसापासूनच मुंबईकर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. मुंबई पोलिसांची तपास यंत्रणाही तात्काळ वेगाने कामाला लागली. ३६ तासांमध्ये ३५० लोकांना राज्याच्या विविध भागातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. लष्कर ए तैयब्बाने एका इमेलद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. गुजरात आणि काश्मीर भागातील मुस्लिम अल्पसंख्याकाचा विरोध करण्यासाठी हा हल्ला केल्याचे नमूद करण्यात आले होते.
मुंबई पोलिसांच्या पथकाने २१ जूलै २००६ ला या प्रकरणी तीन जणांना पहिल्यांदा अटक केली. सिमी या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याच्या संशयावरुन बिहारमधून दोन जणांना तर एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली. याच दिवशी अब्दुल करिम तूंडा या लष्करच्या दहशतवाद्याला केनियाच्या मोमबासा येथून अटक केली. विशेष मोक्का न्यायालयात या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १३ जणांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आणि पुढील चार वर्षांत सूनावणी पूर्ण करण्यात आली.
या घटनेत गेली सात वर्षे मृत्यूशी झुंज देणा-या पराग सावंतची जिद्द म्हणजे कोणताही दहशतवादी मुंबईकरांना थोपवू शकणार नाही याचे हे एक जिवंत उदाहरण आहे दहशतवाद्यांच्या कारवायांना एका सच्चा मुंबईकराने दिलेली ही एक चपराकच म्हणावी लागेल.
बघता बघता या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली पण ११/७ नंतरही मुंबई दहशतवाद्यांच्या नेहमीच ‘हिटलिस्ट’वर राहिली. देशाच्या आर्थिक राजधानीला संपवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी नेहमीच केला आहे. मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटानंतरही दादर कबूतरखाना, झवेरी बाजार आणि सगळ्यात मोठा २००८ मध्ये दहशवाद्यांनी दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेलवर हल्ला केला. एकामागून एक होणा-या दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबईकरांचा मुक्तपणे होणारा वावर ‘सीसीटीव्हीच्या कोंदणात’टाकला गेला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्लॅटफॉर्मपासून ते विविध कार्यालयामध्ये सीसीटीव्हीचा वापर सर्रास होऊ लागला. सरकारने आतापर्यंत करोडो रुपये या सीसीटीव्हीवर खर्च केले आहेत. पण अनेक ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक कारणांमुळे बंदच असतात.
रेल्वे प्रशासनानेही रेल्वे स्थानकांबाहेर रुग्णवाहिका तैनात केल्या. मात्र आज प्रत्येक स्थानकाबाहेर रुग्णवाहिकांचा योग्य त्या प्रमाणात वापर केला जात नाही. त्याशिवाय सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही आतापर्यंत केलेले प्रयत्न मुंबईला कितपत सुरक्षित ठेवू शकतात? मुंबईत होणा-या दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत आहे का… बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतरही इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने मुंबईला पुन्हा एकदा ‘टार्गेट’करण्याची धमकी दिली आहे… या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई आणि मुंबईकर सुरक्षित आहे का, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.
११/७ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटाला गुरुवारी सात वर्षे पूर्ण झाली. या सात वर्षांत काय काय बदललं असं तुम्हाला वाटतं… ? तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.
मला आठवतंय, मुंबईच्या लोकलमधील बॉम्बस्फोट झाल्यानंतर लोकांनी जखमींना जमेल तसं उचलून वाहनांमध्ये एकावर एक कोंबून हॉस्पिटलमध्ये धाडलं होतं. लोकांचं उद्दिष्ट जरी चांगलं होतं तरी अशाप्रकारे प्रथमोपचार न करता जखमींना हाताळणं अत्यंत चूक होतं. यातल्या ब-याच लोकांचा घाबरल्यामुळे रक्तदाब वाढला होता. अनेकांना दुस-यांचं रक्त लागलं होतं. पण आपणच प्रचंड जखमी झाल्याचं त्यांना वाटत होतं. खरं तर त्यांना प्लॅटफॉर्मवरच नीट झोपवून प्रथमोपचार देऊन चार दिलासादायक वाक्य त्यांच्याशी बोलण्याची गरज होती. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून देण्याची गरज होती. रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन मदतीच्या वाहनांसाठई रस्ता मोकळा ठेवण्याची गरज होती. आजही अशी परिस्थिती ओढवल्यावर लोकांनी काय करावं याचं ज्ञान दुर्दैवाने आपल्या समाजाकडे नाही. स्वयंशिस्तीने लोकांनी आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे.