मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची घोषणा केली असून पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा असणार आहे.
मुंबई – राज्यातील महाकाय अशा ठाणे जिल्ह्याच्या विभाजनासाठी गेल्या अनेक वर्षापासून होत असलेल्या मागणीची दखल घेऊन विभाजनाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे ठाण्यातून पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
त्याचे मुख्यालय पालघर येथेच असेल आणि पुढील दोन महिन्यांत नव्या जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होऊन १ ऑगस्ट हा पालघर जिल्ह्याचा स्थापना दिन असेल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. त्यामुळे पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा बनेल.
ठाणे हा क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा जिल्हा होता. जवळपास ९ हजार ५५८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हा जिल्हा विस्तारला होता. त्यातच जव्हार, मोखाडा, विक्रमगड यांसारख्या दुर्गम आणि आदिवासी तालुक्यांचाही त्यात समावेश होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा मुख्यालयात प्रशासकीय कामांसाठी जाणे अडचणीचे ठरत होते.
शिवाय प्रशासकीय स्तरावर काम करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली जात होती. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करताना त्याचे ‘द्विभाजन की त्रिभाजन’ अशीही चर्चा केली जात होती. त्या चर्चेला आत पूर्णविराम मिळाला आहे.
या नव्या जिल्ह्यात पालघर, वसई, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा निर्मिती नंतर ५६ नवीन प्रशासकीय कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. तर जवळपास ४ हजार ३०० अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी ४६५ कोटी ८९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, जुन्या ठाणे जिल्ह्यात कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांचा समावेश असेल.
आदिवासी भागांचा जलदगतीने विकास व्हावा हाच या विभाजनामागचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. चांगले अधिकारी आणि कर्मचारी नव्या पालघर जिल्ह्यात जातील आणि जिल्ह्याचा विकास निश्चित करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या निर्णयाचे सर्वानीच स्वागत केले.
नव्या पालघर जिल्ह्यात ८ तालुके
१ ऑगस्टला स्थापना दिन
पालघर येथे जिल्हा मुख्यालय
आदिवासी जिल्हा म्हणून नवीन ओळख
आदिवासींच्या विकासाला मिळणार चालना
नव्या जिल्ह्यासाठी ४६५ कोटी ८९ लाखांचा निधी
ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात मोठा जिल्हा असून, या जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आणि २४ विधानसभा मतदारसंघ येतात. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून दोन जिल्हे निर्माण करण्याची प्रक्रिया येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिले होते.
ठाणे जिल्ह्याचं विभाजन झले परंतु गडचिरोली जिल्ह्याचे विघाजन केव्हा होणार