विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोय असं पालकांच्या लक्षात आलं तर, त्याची रुची वाढावी, यासाठी पालकांनी स्वत:हून प्रयत्न करून पाल्याला सकारात्मक मार्गानं समजावून सांगणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कोणतेही पालक हे मुलांचे पहिले गुरू, शिक्षक, मार्गदर्शक असतात.
विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोय असं पालकांच्या लक्षात आलं तर, त्याची रुची वाढावी, यासाठी पालकांनी स्वत:हून प्रयत्न करून पाल्याला सकारात्मक मार्गानं समजावून सांगणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कोणतेही पालक हे मुलांचे पहिले गुरू, शिक्षक, मार्गदर्शक असतात. याचं भान ठेवून प्रत्येक पालकानं आपल्या पाल्याला योग्य मार्ग दाखवला तर त्याचा फायदा आपल्याच पुढच्या पिढीला होणारच.
एका कार्यक्रमात संगीतकार अमितराज यांनी आदेश बांदेकर यांचे जाहीर आभार मानले. याचं कारण सांगताना त्यांनी खुलासा केला होता की, ‘‘माझे आई-वडील दोघेही सरकारी नोकरीत. त्यामुळे साहजिकच मीसुद्धा सरकारी नोकरीत जावं असं पालकांना वाटत होतं. मात्र माझं मन संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी ओढ घेत होतं. त्यामुळे घरात कायम संघर्ष सुरू होता. नेमकं त्याच काळात माझ्या आईची आदेशदादाबरोबर भेट झाली. तिनं सगळी परिस्थिती दादाच्या कानावर घातली. त्यावर दादानं आईला सांगितलं होतं की मुलाच्या परीक्षेतल्या गुणांपेक्षा त्याच्या अंगी असणा-या गुणांना जास्त महत्त्व द्या. त्यामुळे त्याच्या मनासारखं करिअर घडेल. तुमचा पाठिंबा कायम ठेवा.
दादाच्या या उद्गारांनंतर पालकांचा विरोध कायमचा मावळला.’’ हा किस्सा ऐकताना नकळतपणे माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे त्यांच्या पालकांसह डोळ्यांसमोर तरळले. घरातल्यांचा पािठबा नसेल तर प्रसारमाध्यमात काम करणं किती अवघड आहे, याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आपल्या पाल्यानं आयुष्यात कोण व्हावं, याचा विचार अनेकदा पालकच करताना दिसतात.
पाल्य संशोधक, संगीतकार, गायक, खेळाडू, कलाकार होऊन कितीसे पैसे मिळणार आहेत? त्यापेक्षा डॉक्टर, इंजिनीअर व्हावे, नेहमी गुणवत्ता यादीत यावे, परदेशात जाऊन भरपूर पैसे मिळवावेत, शक्य असेल तर कायमस्वरूपी परदेशातच स्थायिक व्हावे अशीच अनेक पालकांची तीव्र इच्छा असते. त्यांच्या दृष्टीने असं आयुष्य म्हणजे सुखी आणि यशस्वी जीवन.
आपल्या पाल्यानं नियमित अभ्यास करावा, प्रत्येक परीक्षेत प्रत्येक विषयात उत्तम गुण मिळावेत, सर्व विषय त्याला उत्तमरीत्या कळावेत अशी अपेक्षा सर्वच पालकांची असते. ही अपेक्षा महाविद्यालयात शिक्षकांकडून पूर्ण व्हाव्यात अशीही पालकांची इच्छा असते. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही; मात्र या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पालकांचाही सहभाग, त्यांचे सहकार्य असणं गरजेचं असतं याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं.
महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्गात असणारी विद्यार्थीसंख्या ही दरवर्षी वाढणारी आहे. शिक्षकांना अनेक वर्गामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं. नेमक्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. परीक्षा घेणं, पेपर तपासणं, निकाल तयार करणं, स्नेहसंमेलन, सहली या सगळ्यात इच्छा असूनही शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांकडं लक्ष देता येत नाही. यासाठीच पालकांचाही पाल्याच्या प्रगतीत हातभार लागणं आवश्यक आहे. मात्र हा हातभार सकारात्मक असणं अत्यंत गरजेचं आहे.
मराठी बीएमएमच्या वर्गात एक विद्याíथनी अत्यंत बोलकी. उत्तम अँकर, सूत्रसंचालक होण्याचे गुण तिच्यात होते. मराठी भाषेवर उत्तम पकड. त्यामुळे ‘तू अँकर हो’ असाच माझा आग्रह होता. ती विद्याíथनीही मेहनतीसाठी तयार होती. मात्र वडिलांचा या सगळ्याला विरोध होता. मुळातच बीएमएमला प्रवेश घेण्यालाच त्यांचा विरोध होता. या विरोधाला न जुमानता तिने हट्टानं प्रवेश घेतला.
शिक्षण पूर्ण केलं. मात्र शिक्षणानंतर घरीच बसली. आजही ही विद्याíथनी फोन करते, तेव्हा प्रसारमाध्यमे एका उत्कृष्ट वृत्तनिवेदिकेला मुकल्याची जाणीव तीव्र होते. तिच्या वडिलांनी आपण का समजावू शकलो नाही, याचा पश्चाताप मला आयुष्यभर राहणार हे नक्की. याउलट अनुभव दुस-या एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत आला. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून कोणत्याही गोष्टीला ‘नाही’ ऐकण्याची सवयच नाही. पालकही नको इतके पझेसिव्ह.
याचा परिणाम त्याच्या वर्तनात नेहमीच दिसून यायचा. याशिवाय प्रत्येक दोन-तीन दिवसांनी आई-वडील दोघेही शिक्षकांना भेटून शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्यायचे. महाविद्यालयीन आयुष्यात रंगीबेरंगी दिवसांचा आस्वाद घेण्याऐवजी हा विद्यार्थी काहीसा तणावग्रस्त राहात होता. शेवटी त्याच्या आई-वडिलांचेच समुपदेशन करावं लागलं. त्यानंतर मात्र खूपच सकारात्मक फरक पालक-पाल्यात दिसून आला. असे अपवाद हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.
पाल्य किंवा विद्यार्थी लहानपणापासूनच ज्या परिवारात, ज्या वातावरणात वाढतात त्याचा काही ना काही परिणाम त्यांच्यावर कळत नकळत होत असतात. म्हणूनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी घरातही पोषक वातावरण असणं आवश्यक असतं. शाळा, महाविद्यालयात जेवढा वेळ विद्यार्थी असतात त्यापेक्षा जास्त काळ ते आपल्या घरी असतात. म्हणूनच आई-वडिलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, घरातील इतर सदस्य शिक्षणाला किती महत्त्व देतात, पाल्याच्या शैक्षणिक विकासाकडे पालक सातत्यानं लक्ष देतात का, यासारख्या गोष्टींवरही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अवलंबून असते.
त्यामुळे पाल्याच्या अपयशासाठी एकटया शिक्षकांनाच दोषी मानता येणार नाही. पाल्याची शैक्षणिक प्रगती उत्तम हवी असेल तर, घरातच त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. बीएमएमच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळी वर्तमानपत्राच्या वाचनाचं महत्त्व समजावून सांगत असतो, त्यावेळी एक प्रश्न हमखास विचारतो की किती जणांच्या घरी आवर्जून वर्तमानपत्रं विकत घेतली जातात? उत्तर माहीत असलं तरी सत्य परिस्थिती आम्हाला काही प्रमाणात निराश करणारी असते. यावर उपाय म्हणून लायब्ररीत बसून वर्तमानपत्र वाचा, असा सल्ला आम्ही देतो.
शिक्षक-पालक बैठकांमध्येही पालकांना समुपदेशन करण्याचं काम आम्हाला करावं लागतं; ते विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने विचार करून. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाला पोषक वातावरणच नसतं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही पालक विद्यार्थ्यांसाठी कर्ज काढून शिकवत असतात. अभ्यासासाठी वेगळी खोली, नवी कोरी पुस्तके यासारखी ‘चैन’ त्यांना परवडणारी नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थी अभ्यास करताना तरी घरात तेवढा वेळ शांतता ठेवली जाईल, याकडे लक्ष द्या, असा सल्ला आम्ही देतो.
याशिवाय त्याच्या अभ्यासातलं काही कळतच नाही, असं म्हणण्यापेक्षा तो काय शिकतोय, जे शिकतोय ते त्याला समजतंय का? अशी साधी चौकशीही त्या पाल्याला नवा हुरूप देते. अनेकदा जबरदस्ती करून, मागे लागून, शिक्षा करून आई-वडील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्याचा प्रयत्न करतात. हा जुलमाचा रामराम काही काळ विद्यार्थी सहन करतात मात्र हळूहळू हा प्रवास बंडाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. यापेक्षा विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोय असं पालकांच्या लक्षात आलं तर, त्याची रुची वाढावी, यासाठी पालकांनी स्वत:हून प्रयत्न करून पाल्याला सकारात्मक मार्गानं समजावून सांगणं अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्टीव्हन रुडाल्फ यांनी ‘टेन लॉज ऑफ लìनग’ या पुस्तकात पालकांसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन तत्त्वं सांगितली आहेत –
१. मुलांना स्वत:विषयी काळजी घ्यायला शिकवा
२. मुलांना स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा
३. मुलांना जिज्ञासू व शोधक बनवा
४. मुलांना आयुष्यात स्वत:चं ध्येय, उद्दिष्ट ठरवायला शिकवा
५. मुलांना विषयानुरूप योजना बनवायला शिकवा
६. मुलांना विविध खेळांचे मूलभूत नियम शिकवा
७. मुलांना प्रत्यक्ष कृती व सराव करायला शिकवा
८. मुलांना व्यवहारज्ञान शिकवा
९. मुलांना नियमानुसार, शिस्तबद्ध वागायला, खेळायला शिकवा
१०. मुलांना नेहमी विजेत्यासारखे वागायला शिकवा.
हे नियम जर नीट वाचले तर त्यांचा परस्पर संबंध आहे हे लक्षात येईल. कोणतेही पालक हे मुलांचे पहिले गुरू, शिक्षक, मार्गदर्शक असतात. याचं भान ठेवून प्रत्येक पालकानं आपल्या पाल्याला योग्य मार्ग दाखवला तर त्याचा फायदा आपल्याच पुढच्या पिढीला होणार हे नक्की!
छान माहिती आहे