बघता बघता वर्ष संपले.. आज थर्टी फर्स्ट येऊन ठेपला.. जुन्या वर्षाला दणक्यात निरोप देऊन नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना फुल्ल टू धम्माल करण्याचे प्लॅनिंग तयार झाले आहे.
मुंबई/ठाणे – बघता बघता वर्ष संपले.. आज थर्टी फर्स्ट येऊन ठेपला.. जुन्या वर्षाला दणक्यात निरोप देऊन नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना फुल्ल टू धम्माल करण्याचे प्लॅनिंग तयार झाले आहे. ऑफिस सुटल्यानंतर कुठे जायचे.. कुठे बसायचे.. तू काय खाणार.. या जंत्रीच मोबाईल, व्हॉट्सअॅपवरून पाठवली जात आहे.
यंदा थर्टी फर्स्टला बुधवार आल्याने चिकन, मटण, मच्छीवर हात आडवा करता येणार आहे. सर्वसामान्यांनी आपल्या गच्चीलाच डिस्कोथेक बनवले असून, रात्रभर नाचण्यासाठी डीजे बुक केले आहेत. खिसा गरम असणा-यांनी पब, डिस्को, हुक्का पार्लरची वाट धरण्याचे ठरवले आहे. या जल्लोषाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई व ठाणे पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त ठेवला असून अमली पदार्थावर नजर राहणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी अवघ्या मुंबापुरीसह राज्य सज्ज झाले आहे. सरकारने सकाळी पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला अंदाजे सात कोटी लिटरपेक्षा अधिक दारूविकली जाण्याचा अंदाज आहे.
शहरात गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, वरळी, गिरगाव, दादर व जुहू यासारख्या चौपाटय़ांवर मोठय़ा प्रमाणात मुंबईकरांसह परदेशी पर्यटक भेट देणार आहेत. त्यामुळे तेथे विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील हॉटेल्स व पब्सनी विशेष कार्यक्रम व मेनूंचे आयोजन केले आहे. तसेच विविध पब्ज, हॉटेल, डिस्कोज आणि पाटर्य़ामध्ये रात्री बारा वाजता लाईट बंद करू नये, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. अंधाराचा गैरफायदा घेऊन अश्लील कृत्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
बारमध्ये परवाना असल्याशिवाय दारूपिण्यास देऊ नये, त्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास संबंधित बारमालकांवर कारवाई करण्यात येईल, तसेच तळीरामांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी बारमालकांवर टाकण्यात आली आहे. त्याची नोटीस बारमालकांना देण्यात आली आहे. पहाटेपर्यंत बार सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहनांची रीघ लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. बंगळूरु येथे झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी ४६ हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या २० प्लाटून, पाच शीघ्र कृती दलाच्या तुकडय़ा, १४ बॉम्बशोधक व नाशक पथके, एक हजार होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.
राज्यात दारूच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत आहे. याशिवाय मध्य प्रदेश, दीव-दमण, गोवा राज्यातून चोरटय़ा मार्गानेही दारू आणली जाते. यंदा मुंबई व ठाणे परिसरात सर्वाधिक बिअरची विक्री होण्याची शक्यता आहे, तर नागपूर परिसरात सर्वाधिक देशी दारूची विक्री होण्याचा अंदाज आहे. परराज्यातून येणा-या दारूला पायबंद घालण्यासाठी सीमेवर कडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे अधिका-याने सांगितले.
आधी मदत नंतर दंड
ठाणे शहर वाहतूक पोलीस सोमवारी मध्यरात्री रहेजा कॉम्प्लेक्स परिसरात गस्तीवर होते. तेव्हा राजेंद्र चव्हाण हा दुचाकीस्वार भरपूर मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत त्यांना रस्त्यावर पडलेला दिसला. वाहतूक पोलीस कर्मचारी मिलिंद जोशी, विजयकुमार पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक यू. एस. माने हे त्याच्या मदतीला धावले. राजेंद्र चव्हाण शुद्धीवर नसल्याने त्याला रस्त्याच्या बाजूला नेले. शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दंड ठोठावण्यात आला.
३१ डिसेंबरच्या रात्री रक्तदान
रक्तदान ग्रुप, महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून ठाण्याच्या शिवाजी मैदानात प्रतिवर्षी बुधवारी रात्री रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.
तळीरामांवर सीसीटीव्हीची नजर
मद्यप्राशन करून बेधुंद होणा-या तळीरामांना आता सांभाळूनच पाटर्य़ा झोडाव्या लागणार आहेत. मद्यप्राशन करून गाडय़ा हाकणा-या तळीरामांवर सीसीटीव्हीची नजर ठेवण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात २२ ठिकाणी मद्य प्राशन करणा-या वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी नाके उभारले आहेत. शहराच्या मुख्य चौकांमध्ये, नाक्यांवर ही तपासणी केला जाईल. येऊर या अतिसंवेदनशील परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त असेल. महिलांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. मद्य पिऊन वाहन चालवणा-यांना चाप बसावा यासाठी वाहतूक पोलीस शाखेतील अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. दारू पिऊन धांगाडधिंगाणा घालणा-यांवर कारवाई केली जाणार आहे. नव्या वर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी पहाटे पाचपर्यंत पोलिसांना जागरण करावे लागणार आहे.
खुल्या मैदानात भाषणाचा आवाज आणि त्याची क्षमता डेसिमल इतपतच ठेवा याबद्दल पोलिसांची करडी नजर असते ,पण ३१डिसेंबर आणि त्याच्या कर्कश्य आवाजाला पोलिस दुर्लक्ष्य करणार. कारण त्याचे म्हणणे पण खरे आहे १ हवालदार ५०,००० नागरिकांना कसा रोखू शकेल? गल्लीबोल्यात ५० स्पीकर एकत्रकरून डीजे लावून मद्यधुंद होऊन धांगडधिंगा घातला तरी मुंबई पोलिस शांतच, कारण आम्ही कायच करू शकत नाही, हे त्यांचे घोषवाक्य कारण ते त्यांना घाबरतात. कायदा फक्त शांत माणसास कसे भडकावता येईल या करिता वापरण्यास.