शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन-अर्चन केले, म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचा जप करीत असताना, त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. सर्व लोक भजन-पूजन करतात, पण भांडे कुठे ठेवावे, पळीताम्हण कुठे ठेवावे, वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व, माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो. त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो, परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एका मुलाला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देव्हा-यात ठेवून देई. दुसरे पत्र आले की ते वाची आणि मागले पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत ठेवले. काही दिवसांनी वडिलांकडून आलेल्या एका गृहस्थाने विचारले ‘‘तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘हो’’, ‘‘अरे, मग पैसे का नाही पाठविलेस वडिलांना?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘तेवढेच राहिले बघा!’’ तसे आपले होते. आपण कृती करतो, परंतु सद्गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता, अहंपणा वाढवायलाच मदत करतात. सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे करावे. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही. पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्यांचे काम, फक्त बाण अचूक दिशेला सोडणे. त्याप्रमाणे आपण सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज
जय सद्गुरू