‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण ऐकली असेल तर ती आचरणातसुद्धा आणा.
‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण ऐकली असेल तर ती आचरणातसुद्धा आणा. कारण वाचनामुळे आपल्याला अनेक नवीन गोष्टींची माहिती होते. आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचा. हवं तर तुमच्या आवडत्या विषयापासून सुरुवात करा. तुम्हाला आवडतील अशा विषयांची दोन पुस्तकं कवी-लेखक अरुण देशपांडे यांनी प्रकाशित केली आहेत. एक गोष्टीचं तर दुसरं कवितेचं. कवितेच्या पुस्तकाचं नाव आहे ‘आली आली परीराणी’. या पुस्तकात २४ कविता आहेत. कवितांचे विषय वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप नवनवीन विषयांवरच्या कविता या पुस्तकात वाचायला मिळतील. ‘कलाम आजोबा, सलाम आजोबा’ ही कविता नेहमीच्या कवितांपेक्षा वेगळी आहे. यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सद्गुणांविषयी देशपांडेकाकांनी कवितेद्वारे कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘आळस हा माणसाचा शत्रू आहे’ हा विचार त्यांनी ‘संधी सोनेरी’ या कवितेत लिहिला आहे. ते म्हणतात,
दिवस येई, दिवस जाई
आळशाला फरक नाही,
शंधी आलेली गमावतो
मग रडून उपयोग नाही.
सगळ्यात शेवटी त्यांनी ‘प्रार्थना’ लिहिली आहे. आपल्या अंगी चांगले गुण बाणवण्यासाठी ही कविता नक्कीच उपयोगी ठरेल. याशिवाय छान पहाट, दीपावली, आज्जीबाई, पाऊस, रानमळा यांसारख्या छानशा कविताही तुम्हाला नक्कीच आवडतील.
त्यांच्या दुस-या पुस्तकाचं नाव आहे ‘रेणूची गोष्ट’. या पुस्तकात एकूण सहा गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीतून देशपांडेकाकांनी एक छान विचार मांडला आहे. हा विचार मांडताना त्यांनी आपण रोज अनुभवत असलेल्या प्रसंगांमधून त्यांनी सुंदर विचार मांडले आहेत. ‘एक अशी एक तशी’ या गोष्टींमधल्या वरदा आणि गायत्री, ‘रेणूची गोष्ट’ या गोष्टीतली रेणू किंवा ‘आपले मन – आपला आरसा’ या गोष्टीतला ओंकार म्हणजे तुम्हाला तुमचे मित्र-मैत्रिणीच वाटतील. कारण या गोष्टीतली पात्रं म्हणजे तुमच्या-आमच्या आजूबाजूच्या लोकांसारखीच आहेत. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकांमधले काही शब्द कदाचित तुम्हाला कठीण वाटतील. पण जर तुम्हाला शब्द अडला, तर तुमच्या आई-बाबांना लगेचच अडलेला शब्द विचारा. जेणेकरून तुम्हाला नवनवीन शब्द माहीत होतील आणि त्या शब्दांचा उपयोग तुम्हाला निबंध लिहिताना किंवा इतर गाणी-गोष्टी लिहिताना नक्कीच होईल.
ही दोन्ही पुस्तकं ‘चेतक बुक्स’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये गोष्ट आणि कवितेला साजेशी साधी सोपी चित्रं काढली आहेत. ती चित्रं आणि मुखपृष्ठ पुण्याच्या ‘रचना क्रिएशन्स’ने तयार केली आहेत. चला तर मग, ‘गुणवान’ होण्यासाठी सुंदर विचार देणारी ही दोन पुस्तकं वाचू या!
good thought