परमेश्वरापाशी काय मागावे? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का? ते मागितलेत तर तो देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का? नाही. ‘मला समाधान दे’ हेच त्याच्यापाशी मागावे. त्याची करुणा भाकून, ‘मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला दे,’ असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे. भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. सात्त्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. भगवंताला प्रेमाशिवाय दुस-या कशाचीही गरज नाही. नि:स्वार्थबुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते. प्रेमाने जग जिंकता येते. सर्वाशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे.आपल्या बोलण्यामध्ये, नव्हे पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणेघेणे हा होय. नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते. देवाला देता येईल असे एक नामच आहे, ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो.नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज
संगीता गोडबोले/sangita Godbole: नुकतीच बातमी आली भैय्यु जी महाराज या अध्यात्मिक गुरुजी च्या आत्महत्या आणि निधनाची.
ज्यांच्याकडे जनता मानसिक आधारासाठी वळते ते ही मानसिक दृष्ट्या सक्षम नसतात. मानसिक सक्षमता ही आपल्या संगोपन, स्वभाव आणि नैसर्गिक गुणसूत्र ठेवण यानुसार घडते . ती खुला दृष्टिकोन, विचार करण्यास, शोध घेण्यास प्रवृत्त करणारे वातावरण आणि भावनांची योग्य हाताळणी करण्याचे कौशल्य यामुळे विकसित होते.
मानसिक व्याधी अथवा अस्वाथ्य यावर उपचार असतात. गुरू, महाराज, बाई, बुवा ह्यांच्या नादी लागून फक्त अस्वास्थ्यावर पळवाट शोधली जाते. आणि या पळवाटांचेच व्यसन लागते.
भैय्यु महाराजांच्या आत्महत्येतून पुन्हा एकदा प्रकर्षाने मानसिक व्याधिंबद्दलची माहिती, त्यांच्या उपचाराबद्दलचा मोकळेपणा ह्याची गरज समोर आली आहे. आशा आहे की निदान काही जण तरी या प्रसंगातून शिकतील आणि आपला problem कोणाशीतरी का होईना अर्थातच विश्वासू माणसाशी share किंवा discuss करायला हवा.
त्याने मन हलके तरी होते, भावनांचा निचरा होतो. जगात कोणीतरी आपल्याला समजून घेणारे आहे आणि आपण कोणालातरी हवे आहोत ही भावना मानसिक ताकद देते आणि आत्महत्येपासून मन परावृत्त होण्यास मदत होते. दिवसातला अगदी थोडा वेळ तरी का होईना आवडत्या व्यक्तीशी बोलायला हवं. आपलं profession सोडून दुस-या क्षेत्रात काम करणारे एखादे तरी माणूस जवळच्या व्यक्तींमधे असावे. वेगळा विषय तुमचे मन ताजेतवाने करतो. ही मैत्री कोणत्याही देण्याघेण्याच्या पलीकडे असावी. मग यासारख्या निर्णयापर्यंत पोचण्याची वेळ येणार नाही.
त्यातूनही वेळ पडल्यास psychologist आणि psychiatrist यांची मदत घ्यावी. त्यात काहीच कमीपणा नाही, उलट एक जीव वाचल्याने अख्खे कुटुंब वाचेल.
आता कदाचित त्यांचे जीवनकार्य संपले होते म्हणून त्यांनी असे केले असे म्हणणारेही पुढे सरसावतील .
किंवा ज्ञानदेवांनी नाही का समाधी घेतली? शेवटी जीवन संपवण्याचाच तोही मार्ग होता असेही प्रवाद येतील .
तरीही ही आत्महत्या कोणत्याही प्रकारे योग्य निर्णय नाही .कारण असे लोक अनेकांचा आदर्श असतात .शिवाय अजून तरी आत्महत्या हा गुन्हा मानला जातो .आजारी end stage disease झालेल्या लोकांनाही कायदेशीर रीतीने जीवन संपवणे euthanesia किंवा इच्छामरण शक्य नाही तिथे धडधाकट अर्थात शारीरिक दृष्ट्या माणसाला हा हक्क पोचत नाही .
हे थोडक्यात मानसिक रुग्ण समजायला हवेत .आणि आपण त्या stage पर्यंत नं पोचण्याची खबरदारी घ्यायला हवी आणि गरज असेल तर दुसऱ्यालाही मानसिक आधार द्यायला हवा .असे माझे स्पष्ट मत आहे .
एक माणूस म्हणून आणि डॉक्टर म्हणूनही .
डॉ संगीता गोडबोले