भारतात व्यंगचित्रांचा विचार केला तर डोळ्यासमोर येते ते केवळ आर. के. लक्ष्मण यांचेच नाव. व्यंगचित्र इतर बोलके, आपलेसे आणि त्याचवेळी सामाजिक उलथापालथीवर प्रासंगिक भाष्य करणारे असते, याची जाणीव त्यांची व्यंगचित्रे पाहिल्यावर होते. कॉमन मॅनला काय वाटते हे त्यांनी ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातूनच लोकांना सांगितले. त्यांचा कुंचला समाजातील व्यंगावर बोट ठेवणारा असला तरी तो कुणाला दुखावणारा, बोचणारा, आकस असलेला कधीच नव्हता. त्यांनी व्यंगचित्रे काढणे थांबवले असले तरी आजही ९४ व्या वर्षी ते अत्यंत सहजपणे आणि सफाईदारपणे रेखाटणे करतात. २४ ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस गुरुवारी पुण्यात साजरा केला. त्या निमित्ताने नाबाद १००कडे झेपावणा-या व्यंगचित्रांच्या या जादूगाराच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.
प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी पुण्यात त्यांचा ९४वा वाढदिवस साजरा करतानाही हातात कुंचला घेऊन आजच्या भाषेतला ‘आम आदमी’ आणि लक्ष्मण यांचा प्रिय असलेला शब्द ‘कॉमन मॅन’ अगदी सहजपणे रेखाटून दाखवला. ९४व्या वर्षी त्यांचा हात थरथरत नाही आणि त्यांच्या कुंचल्याची कमाल कमी होत नाही. जन्मजात काही जणांना सिद्धी असते. लक्ष्मण यांच्या कुंचल्यामध्ये ही जी जादू आहे. त्या जादूला या देशाने या आधीच सन्मानित केलेले आहे; पण, महाराष्ट्राचे आणि त्याचवेळी देशाचे फार मोठे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा आर. के. लक्ष्मण या व्यक्तिमत्त्वाचा जो आदर सातत्याने केला, त्यातूनच कलावंतांना एकमेकांच्या मनाचे धागे कसे छेडत असतात, याचा प्रत्यय येत असतो. आयुष्याची ५० वर्षे ज्यांनी हा सामान्य माणूस घराघरात पोहोचवला ते आर. के. लक्ष्मण म्हणजे रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण. यांचा जन्म म्हैसूरचा. म्हणजे त्यावेळच्या म्हैसूर राज्यातला. लहानपणापासूनच भिंतीवर, दरवाजावर खडूने आणि पेन्सीलने चित्र काढण्याची सवय असलेले लक्ष्मण यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय चित्रकार व्हायचे असेच ठरवले असावे. क्रिकेटमध्ये रुची असलेल्या लक्ष्मण यांनी हाती कुंचला घेतल्यानंतर मात्र, ड्राईंग आणि पेंटिंगचा ध्यास घेऊन मुंबईच्या जे. जे. स्कूलमध्ये दाखल झाले; पण लक्ष्मण यांचे तिथे काही जमले नाही. मग म्हैसूरमधूनच पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते मुंबईत ‘ब्लीट्ज’ या साप्ताहिकाशी जोडले गेले. मुंबईच्या ‘फ्री प्रेस’ दैनिकातही त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून काम केले. त्या वृत्तपत्रात त्यांचे व्यंगचित्रकार सहकारी म्हणून कोण असतील? ते होते बाळासाहेब ठाकरे.
त्यानंतर सलग ५० वर्षे लक्ष्मण यांच्या टोकदार कुंचल्यातून उतरलेली अक्षरश: हजारो व्यंगचित्रे सगळ्या देशात चच्रेचा विषय बनली. जे दहा अग्रलेखांना सांगता येणार नाही, ते एका छोटय़ा सिंगल कॉलममधील लक्ष्मण यांचे व्यंगचित्रे सांगू लागले. आणीबाणीबद्दलचे लक्ष्मण यांचे व्यंगचित्र आणीबाणीच्या समर्थक इंदिरा गांधी यांनाही भावले.
आर. के. लक्ष्मण यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आलेले आहे. १९७१ साली पद्मभूषण, १९८४ साली मॅगसेसे पारितोषिक, २००५ साली पद्मविभूषण, २००८ साली ‘सीएनएन’चा जीवन गौरव पुरस्कार, बी. डी. गोयंका जीवन गौरव पुरस्कार, दुर्गा रतन सुवर्णपदक अशा विविध सन्मान आणि पुरस्कारांनी लक्ष्मण यांना देशाने सन्मानीत केलेले आहे. आयुष्यात एका सिंगल कॉलम जागेवरून सगळ्या देशाला प्रभावित करणारे असे हे महान व्यक्तिमत्त्व आता शतकाकडे झेपावत आहे.
ज्या काळात देशात आणीबाणी होती, त्या काळात आणीबाणीच्या विरोधातले व्यंगचित्र काढायलाही लक्ष्मण कचरले नाहीत. त्या काळातल्या राजकीय घटनाही लक्ष्मण यांना व्यंगचित्रांकरिता विषय पुरवणा-याच होत्या. त्यांच्या रेखाटनाचे वैशिष्टय़ असे की, त्यांनी रेखाटलेले चेहरे अगदी तरल आणि सूक्ष्मपणे असायचे. एका व्यक्तीचे १०० वेगवगळे चेहरेसुद्धा लक्ष्मण रेखाटू शकत होते. हे त्यांचे अगदी विलक्षण सामर्थ्य होते. त्यांच्या डोक्यातून निघालेला ‘कॉमन मॅन’ हा तर त्यांच्या व्यंगचित्रांचा मुख्य कणाच होता. ५० वर्षानंतरही त्यांचे कोणतेही व्यंगचित्र केवळ हसवत नाही, तर आत्मचिंतन करायला लावते. लता मंगेशकर, सुनील गावस्कर यांच्या कारकिर्दीप्रमाणेच लक्ष्मण यांची कारकीर्द अजरामर आहे.
भारतात राजकीय, सामाजिक उलथापालथ सतत होत असतात. अशा परिस्थितीत व्यक्त होणे हा कलाकाराचा स्वभाव असतो. त्यामुळे लक्ष्मणही प्रत्येक विषयांवर प्रासंगिक आणि प्रसंगी बोचरे भाष्य ते त्यांच्या व्यंगचित्रांमधून करत गेले. मात्र, बोचरे भाष्य करताना कोणाचा अपमान होणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली. कोणावरही आकस किंवा पूर्वग्रह न ठेवता त्यांच्या व्यंगचित्रांची मांडणी असते. त्यामुळे ज्या सामाजिक, राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या विचारांवर, विधानांवर आणि निर्णयांवर त्यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून भाष्य केले त्यांनीही ते भाष्य खेळकरपणे पचवले. लक्ष्मण यांनी कोणत्याही विचारधारेच्या आधीन न होता स्वत:ला सर्वसामान्यांच्या स्थानी ठेवूनच आपली व्यंगचित्रे रेखाटली आणि म्हणूनच ‘कॉमन मॅन’चा हा वत्सल पिता ‘कॉमन मॅन’पर्यंत पोहोचू शकला, त्यांच्या मनातील भावनांना, आतल्या आवाजाला आपल्या व्यंगचित्रांमधून व्यक्त करू शकला.
आर ,के ,लक्ष्मनजि ,आप जिओ हजारो साल !!