तीन वर्षात काँग्रेसने म्हणावी तशी पक्ष बांधणी केली नाही आणि अंतर्गत कुरघोड्यांकडे लक्ष दिले नाही. नवा कोणताही आश्वासक कार्यक्रम या तीन वर्षात पक्ष पातळीवर राबविला गेला नाही. याचा थेट फटका नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीत बसला आहे.
देशभरात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसची वाताहात झाल्यानंतर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल आणि आमच्याकडून झालेल्या चुका टाळून आम्ही पाच वर्षात जोमाने पक्ष बांधणी करू. राजकारणात जय-पराजय होतच असतात, असे आश्वासनपूर्वक वक्तव्य केले होते, मात्र तीन वर्षात काँग्रेसने म्हणावी तशी पक्ष बांधणी केली नाही आणि अंतर्गत कुरघोड्यांकडे लक्ष दिले नाही. नवा कोणताही आश्वासक कार्यक्रम या तीन वर्षात पक्ष पातळीवर राबविला गेला नाही. याचा थेट फटका नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीत बसला आहे. देशपातळीवरही काँग्रेससाठी पूर्ण निराशाजनक वातावरण आहे. मागील आठवड्यात एका कार्यक्रमात पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलाची गरज व्यक्त केली. शिंदे यांनी जे सांगितले तेच दिग्विजय सिंग यांनी दिल्लीत स्पष्ट केले. सिंग यांनीही लवकरच आम्ही आमच्या पराभवाचे चिंतन करू असे म्हटले आहे, तर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोलकाता येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तुलनेत काँग्रेसचे पक्षसंघटन कमकुवत असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही निवडणुकीत ऐन मतदानाच्या वेळी मत स्वत:कडे खेचून आणण्याची क्षमता संघटनेत असावी लागते. त्यासाठी संघटनेची बांधणीही मजबूत असावी लागते. मात्र या दोन्ही बाबतीत काँग्रेस भाजपाच्या तुलनेत खूपच पिछाडीवर असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. यावरून असे वाटते की, गोवा आणि मणिपूरमधील मतदारांनी स्पष्ट नव्हे, पण सरकार स्थापन करण्यास काँग्रेसला दिलेला कौल या पक्षाला महत्त्वाचा वाटला नाही. कारण हा पक्ष अजूनही २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर सावरलेला दिसत नाही. कॉमनवेल्थ-टूजी-कोळसा घोटाळा, अण्णा-केजरीवाल यांचे लोकपालविषयीचे आंदोलन व निर्भया बलात्कार प्रकरण या घटना काँग्रेसचा देशातला पाया उखडण्यास कारणीभूत ठरल्या. या घटना काँग्रेसला राजकीयदृष्टय़ा हाताळता आल्या नाहीत.
२०१० पासून आजपर्यंत काँग्रेसची ढासळती संघटनशक्ती, त्यांचा जनतेशी वेगाने तुटत चाललेला संपर्क व कमजोर नेतृत्व पाहता देशातील काँग्रेस संघटनेत आमूलाग्र बदल घडविणे, येणा-या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बांधणी करणे, तरुण नेतृत्वाला संधी देणे गरजेचे आहे. संसदीय लोकशाहीत प्रबळ विरोध करणारे धोरण आवश्यक असते. भाजपाचा देशातील वाढता प्रभाव व अन्य प्रादेशिक पक्षांना या पक्षाकडून गिळंकृत केले जात असताना एक प्रमुख सेक्युलर, उदारमतवाद, आधुनिक विचारसरणी मानणा-या काँग्रेसची देशाला गरज आहे. मुळातच काँग्रेसमध्ये इतकी दिशाहीनता का आली, याचा साकल्याने कधीच विचार झाला नाही. त्यामुळे पक्षाचा विचार मानणारी काँग्रेसची काही नेतेमंडळी आपापल्या मतदारसंघात आपले गड शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात आपल्यापुरतेच मर्यादित काम करीत राहिलेली दिसली. अपवाद वगळता अनेक नेत्यांनी चांगले काम केले असले तरी आता २०१९चे टार्गेट ठेवून काँग्रेसने फक्त राष्ट्रीयच पातळीवर नाही, तर राज्य पातळीवरही नव्या दमाच्या तरुणांकडे नेतृत्व सोपविण्याची वेळ आली आहे. एकीकडे भाजपाने २०१९चे टार्गेट ठेवत कृती कार्यक्रम जाहीर केला आहे, मात्र काँग्रेस अद्यापही पराभवातून सावरलेली दिसत नाही. देशभरात आणि राज्यात पक्षाची दुरवस्था होत असताना राज्यात फक्त एकाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे, आमदार नितेश राणे, निलेश राणे यांचे व्यक्तिगत प्रयत्न आणि संघटन कौशल्यामुळे पक्षाला एक हाती सत्ता राखता आली. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या राणेंना परकेपणाचा फटका वेळोवेळी काँग्रेसमध्ये बसला असला तरी आजच्या घडीला त्यांनीच काँग्रेसशी एकनिष्ट राहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाची अब्रू राखली आहे. तशी अवस्था काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांमध्ये दिसून येत नाही, ही खेदाची बाब आहे. आता याची दखल काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर कशी घेतली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसरीकडे भाजपाने आपल्या हिंदुत्वाच्या राजकारणात फारसे बदल केले नाहीत. त्यांचा हिंदुत्ववाद आता हिंदू धर्मातील सर्व जातींना सामावून घेणारा म्हणून वेगाने मूळ धरू लागला आहे. त्या उलट काँग्रेस मांडत असलेला सेक्युलरवाद हा हिंदुत्वाला छेद देणारा आहे, असा समज देशभर पसरत चालला आहे. राहुल गांधी पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस आणतील याबाबत त्यांच्या भाट मंडळींशिवाय काँग्रेसमध्ये कोणालाच खात्री वाटत नाही. पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे दुकान कायमचे बंद होऊन मोदींचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकारणार असल्याची भाकिते भाजपाची मंडळी करत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत अमेठी-रायबरेलीमध्येच खिंडार पडले नाही तरच नवल ठरेल, अशी काँग्रेसविरोधकांची अटकळ आहे. राहुल गांधींच्या दावणीला पक्ष बांधला गेला आहे. ते सुधारतील तर पक्ष सुधारेल. पण ते खरोखरच सुधारतील काय याबाबत त्यांचेच समर्थकच शंका उपस्थित करत आहेत. राहुल यांच्यावरील टीकेच्या भडिमाराला बोथट करण्यासाठी पी. चिदंबरम यांना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची टूम पक्षातील काही निष्ठावंतांनी आता काढली आहे. पण ती यशस्वी होईल असे वाटत नाही. स्वत: चिदंबरम यांनी भाजपाच्या उत्तर प्रदेशातील विजयानंतर मोदींच्या नेतृत्वाची केलेली भलावण ब-याच जणांना रुचलेली नाही. त्यांचा मुलगा कार्ती याच्यामागे लागलेले चौकशीचे शुक्लकाष्ट आणखी त्रासदायक ठरू नये यासाठी संबंधित यंत्रणेने डोळेझाक करावी यासाठीच चिदंबरम यांनी हे मोदींचे लांगूलचालन चालवले असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसला पुनर्वैभव मिळवून द्यायचे असेल तर तरुण नेतृत्वाला संधी देणे, रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेत मिसळणा-यांना प्रोत्साहन देणे, गावपातळीवर घराघरात प्रामाणिकपणे सदस्य नोंदणी करून काँग्रेसचा विचार पोहोचविणे गरजेचे आहे.
सध्या राज्यात काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांची नवी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यातही अमित देशमुख, विश्वजीत कदम, सत्यजीत तांबे, प्रणिती शिंदे, निलेश राणे, नितेश राणे, राजीव सातव या आणि अशा अन्य युवा नेत्यांचे योगदान आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसचे नेतृत्व नव्या पिढीकडे दिले, तर यांच्याकडे जोडलेला तरुण वर्ग पक्षाशी जोडला जाईल. निलेश राणे, नितेश राणे, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, अमित देशमुख यांनी आपापल्या मतदारसंघात उत्तम संघटन केले आहे. युवा राणे बंधूंनी तर संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. भाजपाला टक्कर देणे सोपे राहिले नसले तरी अवघड निश्चितच नाही. आम्ही लहानपणापासून काँग्रेस हा पक्ष नाही, तो एक राष्ट्रीय विचार आहे आणि विचार कधीच संपत नाही, असे ऐकत आलो आहोत. आणीबाणीच्या काळानंतर इंदिरा गांधींना काही काळ सत्तेपासून दूर राहावे लागले होते, मात्र त्यानंतर त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी देत पुन्हा सत्ता मिळवली होतीच. जागतिकीकरणाच्या या तीव्र स्पर्धेत केवळ पक्ष म्हणून मार्गक्रमण न करता व्यक्ती म्हणून आपापला किती प्रभाव असतो हे महत्त्वाचे आहे आणि हा बदल काँग्रेसची नवी पिढी जाणते आहे. म्हणूनच येत्या दोन वर्षाच्या टार्गेटेड कालावधीत काँग्रेसमधील मुख्य फळीत आणि युवा काँग्रेसमध्येही आमूलाग्र बदल करणे तातडीची गरज बनली आहे, हे काँग्रेस श्रेष्ठींनी लक्षात घेतले पाहिजे.
‘काँग्रेस मांडत असलेला सेक्युलरवाद हा हिंदुत्वाला छेद देणारा आहे’ हे खरे आहे.
बहुतांश काँग्रेस नेत्यांची नवी पिढी राजकारणात आहे व नवीन लोकांना संधी नाही.
काँग्रेसला विचार बदलण्याची गरज आहे.