डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहणा-या त्यांच्या सहचारिणी रमाई यांचा अनेकांना विसर पडतो. ‘कुर्बान झाली धन्याच्यासाठी, सुखाला ती पारखी इद्या शिकाया बळं भीमाला दिलं हो रमाईनं!’ या दोनच ओळींत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी प्रज्ञासूर्य बाबासाहेबांच्या जीवनातील रमाईमातेचं महत्त्व सांगितलं आहे. अनंत हालअपेष्टा व दारिद्रय़ाचे चटके सोसूनही कधी तोंडातून अवाक्षर न काढणा-या रमाईंमुळे भीमरावांचा संसार सोन्यासारखा फुलून त्यांना विशाल असे समाज व देशकार्य करता आले, हीच शीलवान, गुणवान रमाईंची महती आहे.
प्रत्येक महान व कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, हे जरी खरे असले तरी स्त्री ही समाजाच्या, इतिहासाच्या आणि साहित्याच्या दृष्टीने उपेक्षित राहते, हे वास्तव नजरेआड करता येत नाही. युगप्रवर्तकाची सावली आणि दीनदलितांची माऊली म्हणून जिचे गुणगान भाषणे व गीतगायनातून केले जाते, त्या घटनाकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचारिणी रमाबाई अशाच उपेक्षित स्त्रियांच्या यादीतील एक.
माता सावित्रीबाई, माता जिजाऊँ, माता भीमाई आणि रमाईंच्या स्मृतींना अभिवादन केल्याशिवाय आंबेडकरी समाजाचे पान हलत नसल्याने मायाममतेवर शंका नको. मात्र रमाईंविषयी फारसे विपुल लिखाण न झाल्याने प्रबोधनपर गीते, चित्रपट-नाटकांतूनच भीमबाबांच्या पाठीशी मुकपणे उभी राहणा-या रमाई समाजाला ज्ञात आहे.
‘कुर्बान झाली धन्याच्यासाठी, सुखाला ती पारखी इद्या शिकाया बळं भीमाला दिलं हो रमाईनं!’ या दोनच ओळींत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी प्रज्ञासूर्य बाबासाहेबांच्या जीवनातील रमाईमातेचं महत्त्व सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आंबडेकरी जनतेला १९५२ ते ५७च्या सुमारास कथालेखक म्हणून परिचित असलेल्या बंधुमाधव यांनी कल्पनाविस्ताराच्या आधारावर रमाईंचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात रमाईंचा दैववाद व त्यांचे कल्पोकल्पित गावकुस असे कथालेखन झाल्याने १४ एप्रिल १९८८ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘धम्मलिपी’च्या अंकातून त्यांच्या कल्पितांचा समाचार घेण्यात आला होता. वास्तविक रमाईंचे माहेर म्हणून कोकणातील दापोली तालुक्यातील वणंद गावचा उल्लेख आंबेडकरांवरील अनेक चरित्रग्रंथात आढळतो. १८९६-१९३५ असा रमाईंचा जीवनप्रवास मानला जातो. वणंद गावातील भिकू धोत्रे यांची कन्या रमा हिचा विवाह १९०६ रोजी सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे चिरंजीव भीमराव यांच्यासोबत वयाच्या सतराव्या वर्षी झाला. कोकणात मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावातील सकपाळ कुळाशी धोत्रे यांची सोयरिक जुळल्यानंतर रमाचा खडतर, पण स्वाभिमानाचा संसार सुरू झाला. भीमरावांनी लग्नानंतर काही वर्षात विलायतेला शिक्षणासाठी प्रयाण केल्याने संसाराची जबाबदारी शिरावर असलेली रमा शेण-गो-या थापून व प्रसंगी उपासतापास करून गरिबी आणि द्रारिद्रय़ाशी लढा देत होती.
परिस्थितीशी झुंजताना भाऊ शंकर व बहीण गौराबाईंची तिला साथ होती. दिवसभर मोलमजुरीसाठी राबल्यानंतर हातावर चार-आठ आणे पडायचे. कधीमधी मजुरीचे काम न मिळाल्यास उपवास पाचवीला पूजलेलाच, परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या भीमरावांची परिस्थितीही याहून वेगळी नसायची. रमाईंना केलेल्या पत्रव्यहारात ‘मीदेखील त्याच परिस्थितीतून जात आहे, माझ्याकडे जेवणासाठी पैसे नसल्याने मला उपवास घडत आहे. तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझे दागिने वीक. मी आल्यावर तुला नवीन करून देईन, अशाप्रकारे ते रमाईंची समजूत काढत असत. मात्र, अनंत हालअपेष्टा व दारिद्रय़ाचे चटके सोसूनही कधी तोंडातून अवाक्षर न काढणा-या रमाईंमुळे भीमरावांचा संसार सोन्यावानी फुलून त्यांना विशाल असे समाज व देशकार्य उभे करता आले. हीच शीलवान, गुणवान रमाईंची महती आहे.
आपला संसार सुखाचा करण्यासाठी अखंड खपणा-या रमाईंना बाबासाहेबांनी समाजरूपात कोटींनी जमवलेला गोतावळा बघण्यासाठी फारसे आयुष्य लाभले नाही. गरिबीमुळे होणारी उपासमार व पतीराजाला उदंड आयुष्य लाभण्यासाठी उपासतापास करणा-या रमाईंना क्षयरोगाची लागण झाल्याने २७ मे १९३५ रोजी त्यांचे निधन झाले.
‘आई रमाई माझी लाखात एक होती. गुणवान होती आणि शिलाने नेक होती!
परदेशी असता बाबा किती भार हा प्रपंच, बाबांना गवसलोती ज्ञानाची मेख होती!!
बॅरिस्टर बाबासाहेबांनाच खरा दागिना मानणा-या रमाई भायखळ्याच्या डबक चाळीतही दिसल्या. परदेशातून पती बॅरिस्टर होऊन आल्यानंतरही गळय़ात सोन्याचा फुटका मणी नसल्याने रमाईंना शेजारपाजारच्या महिला कायम टोमणे मारत असत. त्यातूनच एके दिवशी रमाई बाबासाहेबांकडे दागिन्यांचा हट्ट धरतात.
बाबासाहेबही त्यांचा हा हट्ट पुरवत त्यांना डबाभर दागिने आणून देतात. अंगभर दागिने घालून आपण कसे दिसतोय, हे पाहण्यासाठी आरशात डोकावण्याची त्यांची घाई होते. मात्र दागिने अंगावर चढवल्यानंतर नेमका कुंकवाचा करंडा सापडत नसल्याने त्या बैचन होतात. सर्व घर पालथे घातल्यानंतरही करंडा सापडत नसल्याने त्या बाबासाहेबांकडे पाहतात. लाखभर दागिने अंगावर चढवल्यानंतरही सौभाग्याचं लेणं असलेल्या कुंकवाविना स्त्रीला शोभा नाही, याची जाणीव त्यांना होते. मग अंगावरचे दागिने उतरवून पतिराजाकडे कुंकवाचा मान मागणा-या रमाईंनी बाबासाहेबांकडे नंतर कधीच दागिन्यांचा हट्ट धरला नाही, असे जुनेजाणते लोक सांगतात. अनेक नाटक-चित्रपटांतून हा इतिहास आणि बाबासाहेबांच्या जीवनातील रमाईंचं महत्त्व कायम अधोरेखित झालं आहे. विद्याव्यासंगी पती व समाजाच्या सुखासाठी दु:ख, दारिद्रय़ कोळून पिणा-या या रमाई आई, पत्नी, बहिणीच्या भूमिकेत प्रत्येक घराघरांत निपजो, हीच ‘त्यागमाते’ला खरी आदरांजली.
विद्याव्यासंगी पती व समाजाच्या सुखासाठी दु:ख, दारिद्रय़ कोळून पिणा-या या रमाई आई, पत्नी, बहिणीच्या भूमिकेत प्रत्येक घराघरांत निपजो, हीच ‘त्यागमाते’ला खरी आदरांजली.