कोल्हापूर जिल्ह्यातील‘कुरूंदवाड’ हे छोटसं खेडेगाव. या गावाला नवी ओळख मिळाली ती ‘कोल्हापूर कन्या’ नेमबाज राही सरनोबतमुळे. याच कोल्हापूरच्या पेचात मानाचा तुरा खोवला आहे आकाश कोरगावकर याने. स्वित्झरलँड येथे पार पडलेल्या, जागतिक स्तरावर खेळल्या जाणा-या ‘वर्ल्ड टफेस्ट रेस’ या एका प्रतिष्ठित स्पर्धेत कोल्हापूरच्या या युवकाने बाजी मारली. या स्पर्धेतील विविध स्तरांवर, वेगवेगळ्या खेळात सहभागी होत ‘आर्यन मॅन’ म्हणून किताब पटकावत आपली भन्नाट कामगिरी त्याने सिद्ध केली.
आपल्याकडे म्हण आहे ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’. याचा अर्थ असा होतो की, काहीजण एकाच वेळी अनेक गोष्टी शिकत असतात, करत असतात, पण यश कशातच धड मिळत नाही. पण, या म्हणीला छेद देणारे काही महाभागही आपल्यामध्ये असतात. एकाच वेळेस अनेक गोष्टींमध्ये ज्यांना रस असतो आणि त्यात ते यशस्वीही होतात. कोल्हापूरचा आकाश कोरगावकर हासुद्धा असाच एक वेड घेऊन जगणारा मुलगा. लहानपणापासूनच भन्नाट गोष्टींची त्याला आवड. नुकताच स्वित्झरलँड इथल्या ‘वर्ल्ड टफेस्ट रेस’या जागतिक स्पर्धेत त्यानं ‘आर्यन मॅन’ हा किताब पटकावला.
या काहीशा आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं नाव ऐकलं तर काहींना आश्चर्य वाटेल. या स्पर्धेला ‘वर्ल्ड टफेस्ट रेस’ असं नाव पडलं. कारण प्रतिकूल परिस्थितीत विविध क्रीडाप्रकार यात खेळवले जातात. तब्बल ७४ देशातील २,७३४ युवकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत ४ किलोमीटर पोहणे, १८८ किलोमीटर सायकिलग आणि ४२ किलोमीटर धावणे हे सर्व क्रीडाप्रकार अखंडपणे अत्यंत प्रतिकूल वातावरणात स्पर्धकांना करावे लागतात. त्या परिस्थितीत फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्टय़ाही कस लागत असतो. त्यासाठी स्पर्धकांना प्रचंड तयारी करावी लागते. इतकंच नाही तर हे क्रीडाप्रकार पूर्ण करण्यासाठी वेळेचीही मर्यादा त्यांना पाळावी लागते. सलग १६ तासांत ही स्पर्धा पूर्ण करायची असते. ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणारे पहिले ५०० स्पर्धक हे विजेते मानण्यात येतात. त्यातही पहिल्या पाच स्पर्धकांना ‘वर्ल्ड आयर्न मॅन’ म्हणून गौरवण्यात येतं. आता हा तपशील वाचूनच कोणालाही घाम फुटेल.
मात्र, ही भन्नाट कामगिरी आकाशने १५ तास २७ मिनिटांतच पूर्ण केली. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन, भारतीय लोकांची शारीरिक ठेवण, इथली भौगोलिक परिस्थिती आणि मुख्यत्वानं या स्पध्रेविषयी भारतासह महाराष्ट्रात असलेली कमी माहिती यांचा विचार करता आकाशने मिळवलेलं यश निश्चितच कौतुकास्पद आहे. आकाशने चार कि.मी. पोहणे एक तास ४७ मिनिटांत, १८२ कि.मी. सायकलिंग सात तास १० मिनिटांत आणि ४२ कि.मी. धावणे पाच तास ५५ मिनिटांमध्ये पूर्ण केले.
या स्पर्धेचा प्रत्येक टप्पा पार करण्याचं खूप मोठं लक्ष्य आकाशसमोर होतं. कारण मागच्या वर्षी फक्त इंटरनेटवर माहिती घेऊन, सहभागी स्पर्धकाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे, एक प्रयत्न करून पाहू म्हणत आकाश या भन्नाट स्पर्धेत उतरला होता. तेव्हा या ‘तिहेरी’ पध्दतीच्या शर्यतीत पहिल्याच प्रयत्नात त्याला अपयश आलं होतं. त्यावेळी त्याचं नियोजन चुकलं. तीन मध्यंतरांमध्ये भरपूर आणि निवांतपणे खातापिता येईल, या बाळबोध मानसिकतेचा फटका तेव्हा त्याला बसला. या सा-या अपयशातून धडा घेत त्याने यावेळी या स्पर्धेची कसून तयारी केली. कारण जागतिक स्तरावर भरवल्या जाणा-या या स्पर्धेसाठी शरीराप्रमाणे प्रचंड मानसिक ताकदही गरजेची आहे, हे आकाशनं ओळखलं. आता त्यासाठी लागणार होतं योग्य नियोजन. त्यासाठी गेलं वर्षभर दर दिवसाच्या वेळेचं मिनिटामिनिटाचं गणित लावून आकाशनं तयारी सुरू केली. जणू त्याने हे वेळापत्रक फक्त भिंतीवरच नाही तर शरीरासह मनामध्येही बसवून घेतलं होतं. आंतरराष्ट्रीय स्पध्रेच्या मानाकनांप्रमाणे सायकलिंग, रिनग, स्विमिंग यापैकी किमान दोन प्रकार आठवडय़ातून पूर्ण करणं गरजेचं असतं. इतर दिवशी यापैकी किमान एकतरी स्पर्धा पूर्ण करणं आवश्यक असतं. या स्पर्धा भल्या पहाटे, भर दुपारी, सायंकाळी किंवा रात्री उशिरा, अशा वेगवेगळ्या वेळांमध्ये घेतल्या जातात. हे लक्षात घेऊन त्याने त्याची पूर्ण तयारी केली. त्यामुळे स्पध्रेच्या ठिकाणातील प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेण्याची मानसिकता त्यानं आधीच तयार करून ठेवली. त्याच्यासह भारतातून सहभागी झालेल्या निखील कपूरनेही ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
आकाशसाठी ही स्पर्धा जणू मिशनच होती. त्याच्या यशामध्ये त्याचे आईवडिल, पत्नी आणि सर्व कुटुंबियांच्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर विदेशवारी करणा-या मित्रांनी आणि स्थानिक संघटनेच्या परिवारानेही त्याला दिलेली साथ हीसुद्धा मोलाची ठरली. आकाशच्या संपूर्ण परिवारालाच खेळ, सामाजिक काम यात रस असल्यामुळे विविध सामाजिक उपक्रमात त्याच्या कुटुंबियांचा कायमच सहभाग असतो. त्याच्या कुटुंबाच्या गेल्या तीन पिढयांची कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात दानशूर, समाजभिमुख अशीच ओळख आहे. त्याच परंपरेतील तिस-या पिढीतील वारसदार असलेल्या आकाशने क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवरील ‘आर्यन मॅन’ किताब पटकावून आपली वेगळी ओळख कोल्हापूरकरांसमोर निर्माण केली आहे.
लहानपणापासूनच खेळाची आवड असणारा आकाश सांगतो, ‘‘कोल्हापुरात मी दरवर्षी अॅडव्हेंचर सायकलिंग रेस आयोजित करतो. त्या रेसमध्ये एक आयर्न मॅन सहभागी झाला होता. तेव्हा मला या आगळ्यावेगळ्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली. त्यातच लहानपणापासून मला बॉडीबिल्डींगसारख्या फिटनेसवर भर देणा-या प्रकारांची आवड होती. त्यामुळे तंदुरुस्तीचा प्रश्न मला कधीच भेडसावला नव्हता. तेव्हाच मी आयर्न मॅन स्पर्धेत सहभागी होण्याचं ठरवलं. गेल्या वर्षी अनुभवाच्या अभावामुळे अपयश पदरी पडलं. मात्र, यंदा व्यवस्थित नियोजन करत बाजी मारली. या स्पर्धेसाठी महत्त्वाचं असतं ते देखील मी सांभाळलं. या खेळासाठी कोणतीही आंतरराष्ट्रीय संघटना नाही. स्पर्धेत सहभागापासूनचा सर्व खर्च वैयक्तिक पातळीवर करावा लागतो. यामुळेच भारतातून आम्ही दोनच स्पर्धक यंदा सहभागी झालो होतो. याउलट परदेशात युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या देशातून बरेच स्पर्धक आयर्न मॅन होण्यासाठी येतात. अर्थातच त्यांना स्पॉन्सर्स असतात. आता मी आयर्न मॅन झाल्यानंतर, कोल्हापुरातूनच सहा ते सात जण आयर्न मॅन होण्याची तयारी करत आहेत. एक कोल्हापूरकर म्हणून या गोष्टीचा मला अभिमान वाटतो.’’
आकाशने, ऐतिहासिक पन्हाळगडावर कोल्हापुरातून काही किलोमीटरच्या ‘रग्ड् सह्याद्री’या सायकलिंग रेसचं यशस्वी आयोजनही केलं आहे. कोल्हापूर स्पोर्टस अॅडव्हेंचर अर्थात कासा या क्रीडासंघटनेच्या माध्यमातून ‘रग्ड् सह्याद्री’ या स्पर्धेला एक नवी ओळख निर्माण करून देण्यात आकाश यशस्वी झाला आहे. आपल्या जागतिक कामगिरीच्या यशानंतरही या यशाची हवा आकाशनं किंचितही डोक्यात जाऊ न देता, पुढील वर्षी होणा-या या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केलीय. पुढल्या वर्षीची आपली कामगिरी यावर्षीपेक्षा अधिक चांगली करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आता तो फक्त स्वत:च आर्यन मॅन व्हावं असा विचार करत नाही तर भारतातून आणखी पाच आर्यन मॅन तयार व्हावेत, यासाठी धडपडत आहे.
आगे बढो ! आकाश भाय ! करवीर वासिनी श्री ,महालक्ष्मि चा आशीर्वाद तुम्हाला लाभो ! हि सदिच्छा !!