मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम मराठ्यांनी चिपळूणमध्ये रस्त्यावर उतरून रविवारी एल्गार केला.
चिपळूण- मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातील तमाम मराठ्यांनी रस्त्यावर उतरून रविवारी एल्गार केला. यावेळी समाजातील दहा युवतींकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या निर्घृण अत्याचारी आरोपींना फाशी, या हत्येचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण या केलेल्या ज्वलंत मागण्यांबाबत तमाम समाजबांधवांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांना चिपळुणातील प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले.
चिपळुण येथे मुंबई-गोवा महामार्गालगत लाखो लोकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मिनल शिंदे, डॉ. क्षितिजा देसाई, अॅड. जानकी कदम, पायल घोसाळकर, प्रियांका काटवळकर, धनश्री मोरे, रोशनी साळवी, मुक्ता निकम, ऋतुजा कदम, मृदुला चव्हाण, तेजल घाग, सुचिता सावंत या युवतींनी मराठा समाज रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने हे निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, कोपर्डी येथे गरीब कुटुंबातील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचार महिलांमध्ये तीव्र संताप आणि आक्रोश निर्माण करणारे आहेत. या असंतोषाला वाट देण्याची सुरुवात औरंगाबादमधून मराठा समाजाने कोणत्याही नेतृत्वाशिवाय उत्स्फूर्तपणे एकत्र येत मूक मोर्चाने केली.
या महामूक मोर्चानंतर राज्यभरात मराठा मोर्चे निघाले आणि त्यातून समाजात असलेला राग, संताप उफाळून आला. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, अमरावती, जळगाव, अकोला, नवी दिल्ली, जालना, रायगड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी मोर्चे निघाले व तेथेही निवेदन देण्यात आले.
कोणत्याही नेत्याशिवाय संतापाने उद्विग्न झालेल्या मराठा समाजातील लोकांनी एकत्र येऊन काढलेल्या मूक मोर्चाची व व्यक्त केलेल्या संतप्त भावनांची आणि लाखोंच्या संख्येने होणा-या मोर्चाची दखल शासनाला घ्यावीच लागेल, असा एल्गार या मोर्चात देण्यात आला.
अन्यथा मराठे पेटून उठतील : निलेश राणे
मराठा समाजाच्या मागण्या सरकारला मान्य कराव्याच लागतील अन्यथा मराठे पेटून उठतील, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिली. आज चिपळुणात पार पडलेल्या भव्य मूक मोर्चानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
याबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, मराठा समाजाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी काढलेले मोर्चे हे लाखोंच्या संख्येने आहेत. मोर्चात सहभागी होणा-या मराठय़ांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मराठा समाजाने मूक मोर्चाद्वारे सरकारच्या कार्यप्रणालीवर एक प्रकारे चीड व्यक्त केली आहे. सरकारने आता मराठा समाजाच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा मूक मोर्चाचा निशब्द हुंकार बरीच उलथापालथ घडवू शकतो असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचा अद्यादेशही सरकार काढू शकते. मात्र आरक्षण द्यायचेच नाही, अशी सरकारची भूमिका आहे. न्यायालयात आरक्षण टिकावे म्हणून सरकारने आरक्षणाची बाजू ठामपणे मांडणारे चांगले विधिज्ञ द्यावेत. मग नक्की आरक्षण मिळेल. मात्र या सरकारची आरक्षण देण्याची मानसिकताच नसल्याचे निलेश राणे यावेळी म्हणाले.
या वेळी समाजातील दहा युवतींनी प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या…
- कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. याची सरकारने दखल घ्यावी.
- अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये राज्य सरकारने दुरुस्ती केलीच पाहिजे, अशी मराठा क्रांती मोर्चाची आग्रही मागणी आहे.
- अण्णासाहेब पाटील महामंडळ फक्त मराठा समाजासाठीच असावे. या महामंडळामार्फत मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवाव्यात.
- मराठा समाजाच्या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी शासनाने एक स्वायत्त संस्था निर्माण करून त्यामध्ये मराठा समूहातील घटकांना कौशल्य विकास, उच्चशिक्षण, शिष्यवृत्ती, सुशिक्षित बेरोजगारांना खासगी क्षेत्रात नोकरी, मार्गदर्शन शिबिरे, मेळावे आणि कौशल्य विकासावर आधारित उपक्रम राबवावेत.
- आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती आणि शेतीमालाला हमीभाव.
- मराठा समाजासाठी नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईमध्ये भव्य स्मारक उभारावे आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
15 वर्षात ते का करू शकले नाही, ज्या तरुणींचा तुम्ही उल्लेख केलाय त्यांनीही विचारव आघाडी सरकारच्या नेत्यांना हा चाललाय तो जातीयवाद आहे आणि काही नाही, ब्राम्हण द्वेष्ट पणा आहे स्वताच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री यांच्यावर फोडायचे, लोकांना भडकवायचे जातीजाती मध्ये तेढ वाढवायचे आज बघा निळा मोर्चा निघाला आहे, असे सदैव मोर्चे निघत रहाणार.. लोकांनी कामे केव्हा करायची, लाज आणि यांचा संबंध काहीही नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. जरा लाज बाळगा, देवाला घाबरा.. जो असा फटका देईल सगळ विध्वंस होईल…