गटारी अमावस्या येत्या शनिवारी आहे. तळीरामांना तिचे आतापासून वेध लागले आहेत. एका तळीरामाने गटारीचा महिमा वर्णन करणा-या आपल्या भावना या निबंधातून व्यक्त केल्यात.
गटारी अमावस्या हा माझा आवडता सण आहे. कारण आपल्या संस्कृतीत इतका ‘बेहोश’ करणारा सण दुसरा नाही, असे मला वाटते. या दिवशी बहुतेक मराठी माणसे यथेच्छ अपेयपान आणि अभक्ष्यभक्षण करतात. या दोन्ही गोष्टींना सामाजिकरीत्या परवानगी देणारा असा त्योहार आपल्या देशात काय, जगात कुठे असेल, असे वाटत नाही.
खरे तर तिथीनुसार या दिवसाचे अधिकृत नाव ‘आषाढी अमावस्या’ असे असले तरी गटारी अमावस्या हे नाव एवढे समर्पक आणि आकर्षक आहे की, जुने नाव लोकांच्या पार विस्मरणातच गेले आहे. कॅलेंडरवरही ‘गटारी अमावस्या’ असे छापले जाते, त्यावरून याची कल्पना यावी. हे नाव कुणी ठेवले आणि हा सण नावाला साजेशा युनिक पद्धतीने साजरा करायची कल्पना कुणाला सुचली, हे ठाऊक नाही. शास्त्रात त्याबद्दल काही कथा-बिथा सांगितलेली नाही. तरी ढोबळपणे असे म्हटले जाते की, आषाढी अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो. तो व्रतवैकल्यांचा महिना म्हणून पाळला जात असल्याने या महिन्यात मासळी, मांस आणि मद्य वज्र्य असते. अनेक जण अनंत चतुदर्शीपर्यंत आणि काही जण तर थेट दसऱ्यापर्यंत सामिष आहार आणि मद्याला हात लावत नाहीत. त्यामुळे आषाढातल्या शेवटच्या दिवशी त्यांच्यावर यथेच्छ ताव मारून घ्यावा, या संकल्पनेतून गटारीला हे स्वरूप देण्यात आले असावे. आपले पूर्वज तसे हुशारच होते. कुठल्याही सणाला गोडधोड खाल्ल्यावर जिभेचा गोडवा जावा म्हणून कर म्हणजे मांसाहारी जेवणाची सोय त्यांनी शास्त्रात करून ठेवली आहे. उदाहरणार्थ, संक्रांत झाल्यावर किंक्रांत किंवा होळी झाल्यावर धुळवड. तसाच विचार करून त्यांनी आषाढानंतर महिनाभर सात्त्विक खायला लागणार म्हणून त्याच्या शेवटच्या दिवशी मनसोक्त मांसाहार आणि मद्यपानाची सोय व्हावी या उद्देशाने गटारीला असे विशिष्ट स्वरूप दिले असावे.
या दिवसाला दिव्यांची अवस किंवा दिवली अमावस्या म्हणतात, अशीही वदंता आहे. या दिवशी घरातील दिवे, समया, निरांजने, लामणदिवे यांची घासूनपुसून स्वच्छ करून कशी पूजा केली जाते आणि त्यामुळे अंधकार जाऊन आयुष्य कसे प्रकाशमान होते, हे एव्हाना इंटरनेटमुळे सर्वाना ठाऊक झालेय. या दिवसाची एक राजा आणि त्याच्या सुनेची ‘साता उत्तरी सुफळ संपूर्ण’ कहाणीही वाचायला मिळते. तसेच या दिवशी कणकेचे गूळ घालून उकडलेले दिवे कसे तयार केले जातात, याचीही माहिती इंटरनेटवरील सु‘संस्कृत’ ब्लॉगवरून मिळते. (या सगळ्या ब्लॉगांवरील मजकूर सारखाच कसा, याचे मला नेहमी आश्चर्य वाटते.) परंतु असला आचरटपणा हल्लीच्या काळात कुणी करत नाही. तसेच दिवे आयुष्य प्रकाशमान करत असले तरी काही जणांना अंधारातच राहायला आवडते. त्यामुळे दिव्याची अमावस्यापेक्षा गटारी अमावस्या हेच स्वरूप हल्ली सर्वमान्य झाले आहे.
थोडक्यात, गटारीला मांस-मच्छी-मद्यावर आठवा हात मारायची संधी मिळत असल्याने अलीकडे हा सण अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. साधारणपणे आषाढस्य प्रथम दिवसाची जेवढी आतुरतेने वाट पाहिली जात नसेल, तेवढी आषाढाच्या या शेवटच्या दिवसाची पाहिली जाते. किंबहुना आज मराठी मंडळी सगळ्यात जास्त बेहोश होऊन कुठला सण साजरा करत असतील तर तो हाच, असे विधानही पूर्णपणे शुद्धीवर राहून करता येईल.
मागे काही वर्षापूर्वी एका गुजराती वर्तमानपत्रात गटारीच्या दिवशी ‘आज गटारी अमावस्या, मराठी माणसे गटारात लोळणार’ असा मथळा आला होता. तो वाचून काही मराठी माणसांचे पित्त खवळले होते, पण हे त्या बातमीत किती तथ्य होते, हे अनेकांनी त्याच दिवशी सिद्ध करून दाखवले. अर्थात, आज मराठीच माणसे नव्हे तर इतर अनेक समाज आणि प्रांतांचे लोकही हा सण उत्साहाने साजरे करतात. एवढया एका बाबतीत मराठी संस्कृती त्यांना जवळची वाटते, ही आनंदाची गोष्ट आहे.
पूर्वी हा सण साधारणपणे कौटुंबिक पातळीवर साजरा केला जायचा. हल्ली तो गटागटाने, जाहीरपणे, अजिबात संकोच न बाळगता ओपनली साजरा केला जातो. गटारी घरच्या घरी साजरा करण्याऐवजी तो पर्यटनस्थळी सहल काढून साजरा करण्याची प्रथाही अलीकडे पडली आहे. यासाठी गटारीप्रेमी पर्यटनस्थळी ‘स्टफ’ घेऊन जातात आणि हवा तसा धांगडधिंगा घालतात. ते बाटल्या डोक्यावर घेऊन नाचतात काय, अभद्र बोलतात काय, गटारात लोळतात काय, यावरून गटारी हे नाव या सणाला किती सार्थ आहे, याची खात्री पटते. इतका मोकळेपणा दुस-या कुठल्याही सणात नसावा.
हल्ली हल्ली गटारीत थोडाफार कमर्शियलपणा घुसला आहे. कारण गटारी अमावस्या ही केवळ एकाच दिवशी येत असली तरी हल्ली साधारणपणे दहा-बारा दिवसांपासून तिची वातावरण निर्मिती केली जाते. शेवटचा बुधवार, शेवटचा शुक्रवार, शेवटचा रविवार आणि गटारीचा दिवस असा गटारी वीकच नव्हे तर जवळजवळ पंधरवडा साजरा केला जातो. ही वातावरण निर्मिती व्हावी यासाठी मोबाइलवरून एसएमएस आणि व्हॉट्सअॅपवरून पोस्ट पाठवल्या जातात. त्या बारवाले पाठवत असावेत, असा संशय आहे. या सचित्र पोस्ट तितक्याच तत्परतेने फॉरवर्ड केल्या जातात. त्यामध्ये साधारणपणे हारीने मांडलेल्या वेगवेगळ्या ब्रँडच्या मद्याच्या बाटल्यांची आणि चिकन तंदुरी, तळलेले मासे आदी मांसाहारी डिशेसची छायाचित्रे असतात. तसेच मद्य व मद्यपींवरील काव्यमय संदेश असतात. गटारीच्या दिवशीही बहुतेक वर्तमानपत्रे आपल्या वाचकांना आज गटारी असल्याची आठवण करून देतात. तसेच दुस-या दिवशी गटारीच्या निमित्ताने किती कोंबडया आणि दारूच्या बाटल्या फस्त झाल्या, याची आकडेवारीही सादर करतात.
गटारी साजरे करणारे पुढे श्रावण महिन्याचे पालन करतीलच याची काही खात्री नसते. किंबहुना तो न पाळणारेच अधिक जोमाने गटारी साजरा करत असतात. थोडक्यात श्रावण पाळणारे आणि न पाळणारे असे दोन्ही गटारी साजरी करतात. याचे कारण या सणात असलेला उत्साह आणि उन्माद सगळ्यांनीच अनुभवण्यासारखा असतो. म्हणूनच मला गटारी हा सण मनापासून आवडतो.
आपण भारतीय मुळातच मोठे सण-उत्सवप्रिय आहोत. त्यातच आपली संस्कृती महान आहे. त्यामुळे असल्याकडे सण-उत्सवांची भरमार आहे. दिवाळी, होळी, रक्षा बंधनसारखे राष्ट्रीय सण असोत की, राज्य पातळीवरील गणेशोत्सव, दहीहंडीसारखे सण असोत, आपण ते तेवढयाच उत्साही थराला जाऊन साजरे करतो. अगदीच लोकल असलेले आषाढी एकादशी, नारळीपौर्णिमासारखे सणही आम्ही सोडत नाही. आमच्या या थोर उत्सव परंपरेतलाच गटारी अमावस्या हा एक सण आहे. सण-उत्सव हिच आपल्या संस्कृतीची खरी ओळख असते. त्यामुळे त्यांची जपणूक झाली तरच आपली संस्कृती टिकते. म्हणूनच गटारी अमावस्येसारख्या सणांची जोपासना करणे, हे मी माझे कर्तव्य समजतो.
उत्तम