सहकारी पक्षाशी आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आघाडी होईल. स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास काँग्रेस सक्षम आहे. असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
औरंगाबाद- सहकारी पक्षाशी आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आघाडी होईल. स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास काँग्रेस सक्षम आहे. असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते बुधवारी औरंगाबादेत आले होते.
काँग्रेसने सर्वच्यासर्व मतदारसंघांची चाचपणी केल्यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, आमची राज्यात सहकारी पक्षांशी चर्चा सुरु आहे. वेळ कमी आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघाची चर्चा केली ही गोष्ट खरी आहे. मला वाटते राष्ट्रवादीनेही अशी चर्चा केली आहे. काहीच जर होऊ शकले नाही तर तयारी असावी, ही त्यामागची पार्श्वभूमी आहे. मात्र, आमचा प्रामाणिक प्रयत्न चालला आहे की, जातीयवादी पक्षांना सत्तेत येण्यापासून थांबवण्यासाठी सगळयांनी एकत्रपणे आणि प्रामाणिकपणे लढले पाहिजे. एकत्र येऊन पुन्हा बंडखोरी, पुन्हा प्रोत्साहन देणे, हे होता कामा नये. जेष्ठ नेत्यांशी आम्ही जी चर्चा करतोय त्यामध्ये प्रामाणिकपणे आघाडी राबवण्याची इच्छा आम्हाला दिसते आहे.
मुलाखती नव्हे चर्चा
११४ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतलेल्या नाहीत. किंवा उमेदवारांना बोलवलेही नव्हते. त्या मतदारसंघातील सर्वांना एकत्र बोलावले. मतदारसंघाची माहिती घेतली. त्यावर चर्चा केली. त्यामुळे उमेदवाराची मुलाखत घेणे व मतदारसंघ लढावा लागला तर काय, याची चर्चा करणे यात थोडा फरक आहे. आता कुणी त्याचा काहीही अर्थ काढू शकतो. मात्र, अचानक काही वेगळा निर्णय झाला तर आम्ही तयारी करतो आहोत. माझ्यामते राष्ट्रवादीही तशी तयारी करते आहे. येत्या दोन तीन दिवसांत सगळया बाबी स्पष्ट होतील. स्वतंत्र निवडणूक लढण्यास काँग्रेस सक्षम असल्याचे सांगताना त्यांनी, काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. कोणता पक्ष सक्षम असेल तर तो काँग्रेसच असू शकतो. छोटे पक्ष कसे सक्षम असतील, असा सवालही केला.
तीन टप्प्यात चर्चा
निवडणुकीची चर्चा ही तीन टप्प्यात होत असते. पहिला टप्पा कोण किती जागा लढवणार, त्यातल्या त्यात कमी जास्त जागा झाल्या तर कुणी कुठल्या जागा लढवाव्यात, हे ठरते. मतदार संघ सोडताना विभागीय संतुलन राखले गेले पाहिजे. एखादा जिल्हा संपूर्णपणे मोकळा झाला नाही पाहिजे. लोकसभा मतदारसंघ शून्य झाला नाही पाहिजे. असे काही सूत्र समोर ठेवून आम्ही मतदारसंघ कुठले सोडायचे हे ठरवतो. तिस-या टप्प्यात काही ठिकाणी अदालाबदली करायची तर ते करतो. अशी नेहमीची प्रक्रिया असते. ती यावेळी ही होईल.
युतीच्या नुसत्याच वल्गना
युती किंवा आघाडी करतांना सत्ताकेंद्रीत ठेवून आघाडी करू नये. युतीमध्ये सध्या कोण सीएम होणार याचीच चर्चा सुरू आहे. काहींनी खाते वाटप सुरु केले आहे. मला वाटते राज्यांच्या जनतेचा विचार केला पाहिजे. प्रत्येक विभागाचे आपआपले प्रश्न आहे. मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र, आज हे दिसत नाही. सीएम कोण होणार, कुणाला कोणते खाते मिळणार आहे. याच्याच वल्गना त्यांच्यात सुरु आहे. मला वाटते, त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे बोलावे. आज महाराष्ट्र प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखी जाते. १९९९ मध्ये ज्या परिस्थितीत आम्ही सरकार हातात घेतले त्या परिस्थितीशी तुलना केली तर त्यावेळी आम्हाला आर्थिक श्वेतपत्रिका काढावी लागली होती. इतकी अडचण झाली होती. त्यावेळेस फक्त काँग्रेसला मते दिली, असे नाही तर त्यांनी युती शासनाला हद्दपार केले होते.
गेल्या पंधरा वर्षापासून हद्दपार केले आहे. त्यामुळे यावेळेस संधी मिळाली तर काही वेगळे करू, असे चित्र ते रंगवत आहेत. देशातील पोटनिवडणुकींचा कल बघितल्यास आपल्याला दिसेल की, लोकसभेच्या वेळी झाले ते होऊन गेले असे म्हणत, यावेळेस मतदारांनी सावधगिरीने मते टाकली. त्यातून निष्कर्ष एकच निघतो. लोकसभेच्या वेळी केंद्राचा आणि विधासभेच्या वेळी राज्याचा विचार मतदार करतात. केंद्र सरकारच्या शंभर दिवसांच्या कामावर जनता समाधानी नाही. काँग्रेसवरच या वेळेसही जनता विश्वास ठेवेल.
I went to tons of links before this, what was I thiinnkg?