वैशाख-वणवा सुरू झाला आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला तडाखा दिला असला तरी या पावसाने पिकांचे नुकसान झाले, फळबागांचे नुकसान झाले. नदी-नाले, ओढे आणि धरणे यांचे पाणी वाढायला या पावसाने मदत झालेली नाही. त्यामुळे गेल्या आठवडयात सुरू झालेल्या वैशाख-वणव्याने महाराष्ट्र भाजून काढला जाणार आहे आणि पाण्यावरून युद्ध सुरू होतील इतकी पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडयाच्या या पट्टयात फिरून घेतलेला हा आढावा..
ऊन तापायला सुरुवात झाली आहे आणि महाराष्ट्रभर रखरखाटाला सुरुवात होणार आहे. शिल्लक पाण्याच्या साठयाचे बाष्पीभवन वेगाने सुरू होईल आणि एप्रिल संपत आला की, मराठवाडयातले सगळे जिल्हे आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, खान्देशमधील धुळे अशा या जिल्ह्यांमध्ये पाण्याची जी वणवण होणार आहे, ती यापूर्वी कधीही झाली नव्हती इतकी भयानक असणार आहे.
जानेवारी महिन्यात नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जाऊन आलो. स्थानिक लोकांशी चर्चा करताना माहिती घेतली. उस्मानाबादहून येताना सोलापूरला गेलो. जी भीषण परिस्थिती मराठवाडयात आहे, त्याच्याहीपेक्षा दाहक परिस्थिती सोलापूरमध्ये दिसली. एकूणच महाराष्ट्राचे पंधरा ते सोळा जिल्हे भीषण अशा संकटात सापडणार आहेत.
टँकरने पाणी पुरवण्याची वेळ आतापासून आलेली आहे. पण टँकरने पाणीपुरवठा करायला मुळात पाणी असायला हवे. ते आणणार कुठून? उजनी धरण भरलेले आहे. कारण पुणे क्षेत्रात पाऊस चांगला पडला. पुणे क्षेत्रात पाऊस चांगला झाला की उजनीला त्याचा फायदा होतो. पण उजनीमधून टँकरने पाणी आणायचे म्हटले तर ती टँकर वाहतूक कितीला पडेल? आणि प्रत्यक्षात जेवढे टँकर लागतील, त्यातले लोकांपर्यंत किती पोहोचतील? सगळाच प्रश्न अतिशय बिकट होणार आहे.
नांदेडला गेलो होतो. शंकरराव चव्हाणांमुळे नांदेडला आजपर्यंत पाण्याची चिंता नव्हती. जायकवाडी जसे शंकररावांनी केले, तसे विष्णूपुरी धरणही शंकररावांनी केले. या नांदेड शहराला विष्णूपुरीचा पाणीपुरवठा होतो. त्या धरणाचे नावही आता ‘शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प’ असे ठेवले आहे. आतापर्यंत या धरणाने नांदेडकरांची तहान भागवली आणि मराठवाडयात जेव्हा यापूर्वी पाण्याची टंचाई झाली तेव्हा विष्णूपुरीने नांदेडला भरपूर पाणी दिले.
आज विष्णूपुरीची अवस्था अशी आहे की, पुढचा महिनाभर जेमतेम पाणी पुरेल. ते सुद्धा पुरेल म्हणजे कसे? तर आज नांदेडमध्ये चार दिवसांनी पिण्याचे पाणी येत आहे. पुढच्या महिन्यात ते आठ दिवसांनी होईल आणि मेमध्ये जेमतेम पंधरा दिवसांनंतर देता येईल इतकेच पाणी विष्णूपुरीत राहील. जी गोष्ट नांदेडची तीच परभणीची. परभणीला गेल्या महिन्यात चार दिवसांनी पाणी येत होते. एप्रिल उजाडल्यावर आठ दिवसांनी पाणी येऊ लागले. पुढच्या महिन्यात दिवस वाढत जाणार आणि परभणीची अवस्था बिकट होणार.
उस्मानाबादला गेलो होतो तेव्हा तिथे माहिती घेतली. उस्मानाबाद शहरात आता चार दिवसांनी पाणी आहे. भोगावती नदी आटलेली आहे. पुढच्या महिन्यात आठ ते दहा दिवसांनी पाणी दिले जाईल. येताना औरंगाबादला आलो. औरंगाबादमध्ये एवढया मोठया शहरात आज चार दिवसांनी पाणी आहे. मे महिन्यापर्यंत औरंगाबादची अवस्थाही अतिशय बिकट होणार आहे.
तिकडे लातूरमध्ये मांजरा धरणातून येणारे पाणी पूर्ण आटले, कारण पाऊसच झाला नाही. मांज-यात पाणी नाही, लातूरला पाणी कसे येणार? लातूरही आता पाण्यावाचून तडफडते आहे. सगळ्यात कहर म्हणजे जालन्यामध्ये तीस दिवसांनी पाणी येत आहे. संपूर्ण मराठवाडा असा होरपळल्यासारखा झालेला आहे. मराठवाडयाची लोकसंख्या साडेतीन कोटी आहे. जायकवाडी, मांजरा, विष्णूपुरी, यलदरी, सिद्धेश्वर, इसापूर ही सगळी धरणे जेमतेम महिनाभर पाणी पुरवू शकतील.
पाण्याचे अग्रहक्क ठरवताना ही धरणे शेतीसाठी बांधली. जायकवाडी धरण बांधण्यामागचा उद्देश होता की, सरासरी वार्षिक ७५५ मिलीमीटर पाऊस पडेल. पण या अंदाजानुसार प्रत्येक वर्षी जायकवाडीच्या धरणक्षेत्रात पाऊस कमी कमी होत आला आणि यावर्षी जेमतेम ६० मिलीमीटर पाऊस पडला. धरण भरणार कसे? धरणाची लांबी ९ हजार ९९७ मीटर आहे.
उंची ४१ मीटर म्हणजे १२३ फूट. आणि आता धरणात पाणी आहे सहा फूट. ओलिताखालचे क्षेत्र धरले होते ३५ हजार हेक्टर. त्यामध्ये औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यांचे सिंचन धरले होते. आता सिंचनाचे सोडा प्यायला पाणी देणे शक्य नाही.
गोदावरी नदीच्या पात्रातले हे धरण आज भकास झालेले आहे. पैठणचा डावा कालवा २०० किलोमीटर, उजवा कालवा १३४ किलोमीटर, माजलगावचा
उजवा कालवा १६५ किलोमीटर. हे सगळे कालवे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अंबड, गंगाखेड, परभणी, परतूर, बीड, माजलगाव, अहमदनगर आणि शेगाव या सगळ्या तालुक्यांना शेतीला पाणी नाही. प्राधान्य ठरवताना आता शेतीचे सोडूनच द्या, पहिले पाणी पिण्याला, मग गुरांना आणि मग राहिले तर शेतीला. इथे स्थिती अशी आहे की, प्यायलाच पाणी नाही, शेतीला आणणार कुठून?
मराठवाडयातल्या या भीषण अवस्थेमुळे भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याचा एक पर्याय पुढे आला आणि नगर जिल्ह्यातल्या या धरणातून आठ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडावे लागले. नाहीतर मराठवाडा जगलाच नसता. हे पाणी मराठवाडयात सोडायला नगरमध्ये जोरदार विरोध झाला, निदर्शने झाली.
राजकीय वातावरण तापवले गेले. कालव्याच्या पाण्यावरून रस्ता रोको झाला. अहमदनगर-मनमाड मार्ग सर्व पक्षांच्या नेत्यांनी येऊन रोखून धरला. प्रादेशिक वादाला जिल्हा वादाचे फाटे फुटले. पाण्यावरून युद्ध होईल, असे इशारे देण्यात आले. ही भीषण परिस्थिती आज मराठवाडा आणि नगरच्या सीमेवर आहे. जर भंडारदरा धरणाचे पाणी जायकवाडीत आणखी सोडावे लागले तर राजकीय ताणतणाव आणखीन वाढतील. परंतु रखरखीत मराठवाडयाला पुढचे तीन महिने प्यायला पाणी कसे देणार, या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे नाही.
वर जो उल्लेख केला, तो महानगरपालिका असलेले शहर औरंगाबाद, नांदेड आणि लातूरचा आहे. जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी इथे नगर परिषदा आहेत. पण ही सगळी शहरे आहेत. शहरातील परिस्थिती एवढी बिकट आहे. पुढच्या महिन्यांत एक हंडा पाण्याची किंमत पंचवीस रुपये होईल. पण हे शहरांचे झाले. खेडयातली परिस्थिती तर कल्पना करण्याच्या पलीकडची आहे.
सगळे डवरे आटलेले आहेत. नाले सुके पडलेले आहेत. छोटया-मोठया उपनद्यांना कुठेच पाणी नाही. शंभर-शंभर किलोमीटरमध्ये झाड नाही. रखरखीतपणा आता जाणवू लागला आहे. पुढच्या चार महिन्यांत परिस्थिती इतकी भीषण होईल की, त्यातून मार्ग काढणे एवढे सोपे नाही. निराधार आकाशातून पडणारा पाऊस हा जगाचा आधार आहे. पण मराठवाडयात सलग दहा वष्रे पाऊस कमी कमी होत चालला आहे.
२००९ साली त्यावेळच्या केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एका उच्चस्तरीय समितीने संशोधन करून एक अहवाल दिला होता. आणि असा इशारा दिला होता की, मध्य भारतातला पश्चिम पट्टा ज्यात प्रामुख्याने पूर्णपणे मराठवाडा आहे आणि विदर्भाचे तीन-चार जिल्हे आहेत. मध्य प्रदेशातला बैतूल आहे. एवढया पट्टयात पाण्याची पातळी खाली जाणार आहे.
२००९ साली शंभर-दोनशे फुटांवर बोअरचे पाणी लागत होते. आता हजार फूट खाली गेल्यावरही पाणी नाही. या अहवालाची गंभीर दखल कोणीच घेतली नाही. एकीकडे शेतीला पाणी नाही म्हणून शेती उद्ध्वस्त होत आहे. दुसरीकडे आता पिण्यालाही पाणी राहणार नाही. गेल्या महिन्यात ज्या ज्या जिल्ह्यात गेलो, त्यात उस्मानाबादमधल्या एका मित्राकडे गेलो असताना त्याच दिवशी त्याच्या नळाचे पाणी आले होते. त्याने जोरात ओरडून सांगितले, ‘अर्धा तास शांतपणे बस.
पाणी अर्धा तास राहणार आहे. सगळी भांडी भरून घेतो.’ मी त्याच्याकडे पाहत होतो. त्याने घरातल्या जेवणाच्या ताटामधल्या वाटय़ांमध्येसुद्धा पाणी भरले. वाटीभर पाणीही आता महत्त्वाचे वाटू लागले. ही भीषण परिस्थिती आता जानेवारी महिन्यात होती. आता ऊन तापू लागल्यावर बाष्पीभवन आणखी वेगाने होईल आणि मग आणखीन चटके बसू लागतील.
मराठवाडयाप्रमाणेच विदर्भातला अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमध्येही पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय भयानक आहे. मुंबईमध्ये आपण वीस-पंचवीस रुपयांची बिसलरी सहज घेतो. आणि एक दिवस मुंबईत पाणी येणार नसेल तर ‘आज मुंबईत पाणी नाही,’ अशा बातम्या झळकतात. अख्ख्या महाराष्ट्रात पाणी नाही, त्याचे कुणाला पडले आहे? मुंबईच्या लखलखाटात ग्रामीण भागातला रखरखाट जीवघेणा आहे.
आणि सोलापुरात..
३० मार्चला सोलापूरला गेलो होतो. शासकीय विश्रामगृहात गेलो. तिथे बाथरूममध्ये लाल रंगात लिहिले होते.. ‘थंड पाणी..’ बाजूच्या नळाच्या वर लिहिले होते, ‘गरम पाणी..’ दोन्ही नळ सोडून बघितले. ना थंड पाणी येत होते, ना गरम पाणी. तिथल्या व्यवस्थापकांना विचारले. त्यांनी सांगितले की फक्त व्हीआयपी सूटना पाणी आहे. ते सुद्धा टँकरचे. मग माहिती घेतली. सोलापूर शहर अकरा लाखांचे.
महानगरपालिका झालेले. सुशीलकुमार मुख्यमंत्री असताना त्यांनी मोठया जिद्दीने उजनी धरणातून दोनशे किलोमीटर पाईपलाईन टाकून सोलापुरात पाणी आणले. पण ते अध्र्या सोलापूरलाच देता आले. पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी सुशीलकुमारांनी तरतूद केली. तिथपर्यंत त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. विलासराव पुन्हा मुख्यमंत्री झाले.
‘लातूरला जाताना सोलापूरला जकात दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही,’ असं नेहमी सांगणा-या विलासरावांनी जेवढा लागेल तेवढा निधी देऊन सोलापूरला टाक्या बांधून घेतल्या. पण ही व्यवस्था अध्र्या सोलापूरकरिता झाली. ज्याला गावठण सोलापूर म्हणतात, ते चार लाखांचे आहे. आणि तेच खरे गरीब सोलापूर आहे. त्या गावठण सोलापूरला हिप्परगा तलावातून पाणी घेतले जाते. पण आता हा तलाव सुकत आला. एवढा सुकला की, सोलापूरच्या लोकांनी थेट तलावात प्लास्टिकची पिंप टाकून पाणी भरून न्यायला सुरुवात केली आहे.
१ ते ५ एप्रिलपर्यंत सुशीलकुमारजी सोलापुरात मुद्दाम राहिले. जेवढे पाणी आहे, त्याचे नियोजन केले जाते. सध्या ते खासदार नाहीत; पण त्यांचा जीव सोलापुरात गुंतला आहे. जे नवीन खासदार आहेत, त्यांना आपण पाहिलंत काय, असं विचारायची वेळ आहे. सध्या सोलापूरला जेमतेम चार दिवसांनी पाणी येते. पुढच्या महिन्यात परिस्थिती आणखी अवघड होईल. ही अवस्था महानगरपालिका असलेल्या सोलापूरची आहे. हीच अवस्था मराठवाडयात, औरंगाबाद, नांदेड आणि लातूर महानगरपालिकेची आहे.
२२४६ गावे, ८७५ टँकर
» अवकाळी पावसानंतरही मराठवाडयातील पाणीपातळीत कुठेही फरक झालेला नाही. मराठवाडयातल्या सगळया जिल्ह्यातल्या २२४६ गावांत पाण्याची तीव्र टंचाई आहे. आणि मराठवाडयात ८७५ टँकरद्वारे पाणी पुरवण्याचे काम चालू आहे.
» विदर्भात अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे आणि जवळपास एक हजार गावांमध्ये पाणीटंचाई आहे. पूर्व विदर्भामध्ये १९४२ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे आणि ६३ तालुक्यांत एक हजार फूट जमिनीत खोल गेल्यानंतरही पाणी उपलब्ध नाही.
» सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणामध्ये फक्त ७४ टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि त्यातल्या १० टीएमसी पाण्याचाच उपसा करता येईल. त्यामुळे अर्ध्या सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणा-या उजनी धरणाचे पाणी जेमतेम पंधरा दिवस पुरेल. सध्या सात दिवसांनी पाणीपुरवठा आहे, आता पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.
» नाशिक जिल्ह्यातील १४५ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे.
» जळगाव जिल्ह्यात १६३ गावांमध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे तिथेही टँकरनेच पाणीपुरवठा होत आहे.
निसर्गाच्या विरोधात जाणार त्यांना निसर्ग संपवतो हे आपल्या पूर्वजांना माहित होते. पुस्तकी शिक्षण घेवून स्वताला आधुनिक म्हणवणारे निसर्ग नियमाच्या विरोधात जात आहेत.झाड नाहीत पावूस नाही.पाणी नाही झाड नाहीत.पाणी नाही झाड नाहीत प्राणी नाहीत.मानव प्राण्याने झाडावर शस्त्र चालवण्या अगोदर निसर्गाचे नियम समजून घेतले नाहीत.हेच खरे आहे.