मुंबई आणि उपनगरातील रेल्वेस्थानकांजवळ कोटयवधी रुपये खर्च करून स्कायवॉक उभारण्यात आले. मात्र, या स्कायवॉकचा वापर पादचा-यांकडून केला जात नसल्याचे चित्र आहे.
मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुविधेसाठी मुंबई आणि उपनगरातील रेल्वेस्थानकांजवळ कोटयवधी रुपये खर्च करून स्कायवॉक उभारण्यात आले. मात्र, या स्कायवॉकचा वापर पादचा-यांकडून केला जात नसल्याचे चित्र आहे.
अनेक स्कायवॉकवर सायंकाळी वेळेत दारुडे व गर्दुल्ल्यांचा वावर असल्यामुळे महिला स्कायवॉकवरून जाण्यासाठी धजावत नाहीत. अनेक ठिकाणी स्कॉयवॉकवर जुगाराचे पट लावल्याचेही दिसून येते, मुंबईतील अनेक स्कायवॉकवर ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत. लाद्या उखडलेल्या आहेत. वीजदिवे बंद आहेत. त्यामुळे अंधाराचा ‘फायदा’ काही प्रेमीयुगुलांकडून घेतला जातो, महाविद्यालयांपासून जवळ असलेल्या स्कायवॉकवर तरुण-तरुणींची दंगामस्ती सुरू असते. त्यामुळे मोठा खर्च करून उभारलेले हे स्कायवॉक नक्की कुणाच्या सोयीसाठी आहेत, असा प्रश्न निर्माण होतो.
कल्याण, ठाणे, घाटकोपर, वांद्रे, वडाळा, सांताक्रूझ येथील स्कायवॉकची स्थितीही फारशी वेगळी नाही. वेळच्या वेळी स्कायवॉकची स्वच्छता केली जात नाही. फेरीवाल्यांसाठी हे स्कायवॉक व्यवसाय करण्यासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. मोबाइल, पर्स, कपडे, कंबरेचे पट्टे, घडयाळे, खेळणी, रुमाल, छोटय़ामोठय़ा वस्तूंची विक्री या स्कायवॉकवर केली जात आहे.
फेरीवाल्यांची लांबच लांब रांग या स्कायवॉकवर दिसून येते. स्कायवॉकच्या दुतर्फा फेरीवाल्यांची गर्दी होत असल्याने पादचा-यांना चालण्यासाठी रस्ता राहत नाही. त्यामुळे पादचारी स्कायवॉकचा वापर करणे टाळत आहेत. महापालिकेचे कर्मचारी स्कायवॉकवर कारवाईसाठी आल्यावर हे फेरीवाले रेल्वेच्या पुलांवर आपले सामान हलवतात आणि त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करतात. तर रेल्वे पोलिस कारवाईसाठी आल्यास फेरीवाले स्कायवॉकवर जाऊन बसतात. याबाबत दोन्ही यंत्रणांमध्ये फेरीवाल्यांच्या सोयीनुसार ‘समन्वय’ साधला जात असल्याचे चित्र आहे.
मुंबई आणि उपनगरातील बहुतांश स्कायवॉकचा ताबा भिकारी, गदुल्ल्यांनी घेतला आहे. पोलिसांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. फेरीवाल्यांना पादचा-यांनी हटकल्यास ते उलट दमदाटी करतात. विक्रोळी रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या या स्कायवॉकवर मोक्याच्या जागांवर फेरीवाल्यांनी पथारी पसरली आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी स्कायवॉकवर फिरकत नाहीत. एखाद्या वेळेस कारवाई झाल्यास तेवढयापुरते फेरीवाले स्कायवॉक सोडून जातात, दुस-या दिवशी पुन्हा हजर होतात.
रेल्वेच्या हद्दीत बसणा-या फेरीवाल्यांवर रेल्वे पोलिस कारवाई करतात. मात्र, महापालिका क्षेत्रात बसणा-यांवर रेल्वे पोलिस कारवाई करू शकत नाहीत. त्यामुळे दोघांच्या वादात पादचा-यांना स्कायवॉकची कसरत करावी लागत आहे.
– मधु कोटियन,
अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघटना
फेरीवाल्यांच्या होणा-या गर्दीमुळे स्कायवॉकचा वापर करणे कठीण होते. भिकारी, गर्द पिणारे आडवेतिडवे झोपलेले असतात. त्यामुळे शक्यतो स्कायवॉकचा वापर टाळतो.
– गणेश मोरे, कल्याण
फेरीवाले रस्त्यातच बसतात, त्यामुळे गर्दीच्या वेळेत ये-जा करण्यास जागाच उरत नाही.
– विनोद दिघे, विक्रोळी
फेरीवाले अरेरावी करतात, अनेक प्रवासी फेरीवाल्यांकडून वस्तू विकत घेतात. त्यांचीही गर्दी असते. त्यामुळे पुलावरून चालताना कसरत करावी लागते, प्रवाशांनीही फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे.
– विलास खेडेकर, घाटकोपर
मी अंधेरीला राहतो. रेल्वे स्थानकावर रोज स्कायवॉकवरून ये-जा होते. मात्र पुलावर तरुण-तरुणींची दंगामस्ती सुरू असते. पोलिसांनी या टोळक्यांना आवरले पाहिजे.
– आशीष भगत, अंधेरी
मी बांद्रा ला काम करतो सकाळी आणि संध्याकाळी स्कायवाक चा वापर करतो पण तिते एवढे गर्दुले आसतात आणि लहान मुले सायकल चालवणे, कपल, दंगामस्ती चालू असते कलानगर चा इथे जिना आहे त्याचा लाद्या निघाल्यात तिथे सेक्युरिटी आहे पण कोणी काही लश्य देत नाहीत