संभाजीराजांसारख्या शूर योद्धय़ाला कलंकित करण्यात आणि शत्रूच्या तावडीत देण्यात आप्तस्वकीयच पुढे होते. महाराष्ट्रात घडलेल्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वांचे नुकसान करायला कोणत्याही परकीय शत्रूची गरज नव्हती, ते काम आप्तस्वकीयांनीच साधले.
कणकवली – संभाजीराजांसारख्या शूर योद्धय़ाला कलंकित करण्यात आणि शत्रूच्या तावडीत देण्यात आप्तस्वकीयच पुढे होते. महाराष्ट्रात घडलेल्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वांचे नुकसान करायला कोणत्याही परकीय शत्रूची गरज नव्हती, ते काम आप्तस्वकीयांनीच साधले. असे प्रतिपादन इतिहास संशोधक आणि प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी केले.
मी आणि माझ्या साहित्यकृती या विषयावर स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना इतिहासाचे अनेक धागेदोरे सर्वासमोर आणले.
संभाजी महाराज २३ व्या वर्षी राजगादीवर बसले आणि ३२व्या वर्षी त्यांचा शिरच्छेद झाला. या काळात कल्याणकारी राजा कसा असावा? दूरदृष्टी कशी असावी? याची अनेक उदाहरणे संभाजी राजे यांच्या कार्यातून स्पष्ट झाली.
विशालगडानजीक पहिले धरण संभाजीराजांनी बांधले आणि शेतकरी सुखी कसा होईल याचे स्वप्न पाहिले. पोर्तुगीजांना वखारीच्या नावाखाली किल्ले बांधू नका. वखारीच्या इमारती कशा असाव्यात याचे नियम घालून दिले. सिद्दी जोहर, पोर्तुगीज आणि औरंगजेब अशा तीन शत्रूंशी एकाच वेळी मुकाबला करताना इंग्रज अधिकारी केजविन याच्याशी मुंबई स्वराज्यात घेण्याचा करार केला.
३१ सरदारांसह औरंगजेबाची स्वारी महाराष्ट्रावर चालून आली. त्यात ५ लाख सैनिक आणि ४ लाख जनावरांचा समावेश होता. अशा स्थितीत सहय़ाद्रीचा कोट करून आपल्या अल्पशा सैन्याने संभाजी राजांनी शत्रूशी झुंज दिली. सर्व शत्रूंना रोखत किल्ले शाबूत ठेवले.
मात्र या जनतेसाठी धडपडणा-या योद्धयाला जेरीस आणण्यासाठी महाडिक, निंबाळकर, शिर्के या शिवाजी महाराजांच्या तिन्ही जावयांनी औरंगजेबाला साथ दिली. अशी उदाहरणे देतानाच महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तिमत्त्वांना आप्तस्वकीयांनीच दगा दिला असे त्यांनी स्पष्ट केले.
पानिपतकार विश्वास पाटील यांनी आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच स्वामी विवेकानंद सभागृहाचे कौतुक केले. १७६१ साली साडेनऊ ते साडेपाच या वेळेत पानिपत युद्ध झाले. मध्ययुगातले असे एकमेव युद्ध होते ज्या युद्धात दीड लाख मराठे कामी आले. एका दिवसात दीड लाख माणसे मारणारे हे पानिपतचे युद्ध होते.
तसा इतिहास फक्त मराठीच माणूस करू शकतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना पानिपत येथील भाऊसाहेब पेशव्यांचे समाधीचे दर्शन घेतले तेव्हा यशवंतराव त्या ठिकाणची पांढरी माती हातात घेऊन रडले.
ही माती नसून हे भस्म आहे. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील, घरातील एक तरी पुरुष या युद्धात लढला आणि मारला गेला त्यामुळे पानिपतच्या भेटीदरम्यान त्यांच्या अंतर्मनात झालेल्या तीव्र वेदना त्यांनी इतिहासकाराच्या भाषेत सांगताना सभागृह स्तब्ध झाले होते.
सुभाषचंद्र बोस मला सातत्याने खुणावणारे व्यक्तिमत्त्व होते. मराठी भाषा ही वळवावी तशी वळते, कळवावी तशी कळते, लोळवावी तशी लोळते आणि जुळवावी तशी जुळते असे सांगताना या भाषेत उत्तमोत्तम कलाकृती पाहायला मिळतात आणि या भाषेने डोंगरासारखी उभी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथसंग्रह सर्वात मोठा, एखाद्या विद्यापीठाच्या ग्रंथासारखा आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
संभाजी राजांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आले
मराठीतील सर्वात जास्त नाटके संभाजीराजांवर निघाली. मात्र १६ वर्षाच्या एका मुलीने संभाजीराजांचे सकारात्मक आणि धर्मनिष्ठा असा राजा म्हणून नाटक लिहिले. उर्वरित सर्वानी संभाजीराजांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले. संभाजी महाराजांना माडीवर किंवा कोठय़ावर जायला वेळ नव्हता. २३व्या वर्षी गादीवर राजा म्हणून आलेल्या संभाजीराजांनी राज्य सुरक्षित करण्यासाठी केलेली युवा रचना अशा लेखकांना दिसली नाही.
माझे अजिंठा आणि वेरूळ..
विश्वास पाटील म्हणाले, नारायण राणे हे महसूलमंत्री असताना मी मुंबईत कलेक्टर होतो. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातील या दोन बलाढय़ नेत्यांच्या मध्ये मी काम करत होतो. अनेकांना माझ्या काम करण्याबद्दल कुतूहल होते. या दोन्ही नेत्यांमध्ये काम करताना त्यांच्या प्रगल्भतेतून मला शिकता आले. या दोन्ही नेत्यांनाही गरीब माणसाचा कमालीचा कळवळा पाहायला मिळाला. या मनाच्या विशालतेमुळेच विलासराव देशमुख आणि नारायणराव राणे यांच्यामध्ये राहून मला काम करता आले. मराठा समाजाची ही दोन व्यक्तिमत्त्वे अजिंठा आणि वेरूळ ही आहेत अशा शब्दात विश्वास पाटील यांनी त्यांची व्याख्या स्पष्ट केली.
फारच माहितीपूर्ण लेख.संभाजी राजानंविषयी नियमित माहिती मिळाल्यास फारच चांगले होईल, खरा इतिहास जगासमोर आणून माझ्या राजांचा महापराक्रम जगाला कळू द्या .
संभाजी राजांना मानाचा मुजरा.