मराठी शाळांवर संक्रांत ओढवली असताना आता मुंबईतील मराठी ग्रंथसंग्रहालयापासूनही वाचक दुरावल्याची भयाण परिस्थिती आहे.
मुंबई- मराठी शाळांवर संक्रांत ओढवली असताना आता मुंबईतील मराठी ग्रंथसंग्रहालयापासूनही वाचक दुरावल्याची भयाण परिस्थिती आहे. मुंबईत ग्रंथालयांची स्थिती समाधानकारक असली तरी कुर्ला उपनगरातील ग्रंथसंग्रहालये चातकाप्रमाणे वाचकांच्या प्रतीक्षेत आहे. पश्चिमेकडील भागांत शोधूनही न सापडणारी केवळ तीन संग्रहालये वाचकांची वाट पाहत आहेत.
कुर्ला पश्चिमेला स्थानक परिसरात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा आहे. २६ जुलैच्या पुरात पुस्तके वाहून गेली, तसे वाचकही या ग्रंथसंग्रहालयापासून दुरावले. पुस्तकांची कमतरता, कर्मचा-यांचा वेळेवर न होणारा पगार इत्यादी समस्याही या ग्रंथसंग्रहालयाला भेडसावत आहेत.
दिवाळी अंकांचा कोराकरकरीत गठ्ठा वाचकांअभावी तसाच पडून आहे. २६ जुलैच्या पुरात या ग्रंथसंग्रहालयातील पुस्तके भिजली होती. याची साक्ष ही पुस्तके आजही देतात. या जागी नवी पुस्तके आणूनदेखील वाचकांना आकर्षित करण्यासाठी या ग्रंथसंग्रहालयाची केविलवाणी धडपड दिसत आहे. हे संग्रहालय दर्शनीय भागात असते तर थोडा फरक पडला असता, असे या ग्रंथसंग्रहालयाच्या जुन्या सभासदांचे म्हणणे आहे.
स्थानक परिसर सोडला की, थेट अंधेरी-कुर्ला मार्गावरील जरीमरी-काजूपाडा येथील वस्तीत दोन ग्रंथसंग्रहालये मुश्किलीने सापडतात. लघुउद्योग असलेल्या या परिसरात अजूनही अशिक्षितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ग्रंथसंग्रहालयांची पायरी चढणारी माणसे शोधावी लागतील. त्यात जवळच असलेल्या मराठी शाळेऐवजी इंग्रजी माध्यमातील शाळांत मुले जाऊ लागल्याने ग्रंथसंग्रहालयांच्या अस्तित्वाचा प्रश्नच उभा राहिला आहे.
यातील ‘गार्डियन सार्वजनिक वाचनालयाला’ वाचकांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने या ग्रंथसंग्रहालयाला कायमचे टाळे लागल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष मंगेश जाधव यांनी दिली. वाचनालयात तब्बल ५००च्या आसपास पुस्तके असतानाही जागेच्या कमतरतेमुळे तसेच वाचकांच्या दिवसेंदिवस घटणा-या प्रतिसादामुळे हे वाचनालय बंद करावे लागल्याचे ते म्हणाले.
परंतु नजीकच्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथसंग्रहालया’ने मात्र वाचनालय कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा विडा उचलला आहे. सभासदांची संख्या कमी झाली तरीही वाचनसंस्कृती अबाधित राहायला हवी, असे ग्रंथसंग्रहालयाचे मालक अॅड. सूर्यकांत पुजारी सांगतात. ग्रंथसंग्रहालय प्रतिनिधींनी स्वत: सभासदांशी संपर्क कायम ठेवून वाचनसंस्कृतीसाठी आजूबाजूच्या लोकांना उद्युक्त करावे, असे ते म्हणाले. संपूर्ण कुर्ला परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथसंग्रहालयात मोफत अभ्यासिका सुरू आहे, परंतु या अभ्यासिकेलाही अल्प प्रतिसाद मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी पालकांनी आपल्या मुलांची पावले ग्रंथसंग्रहालयाकडे वळवावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.
मी एका सार्वजनिक ग्रंथालयात गेली १४ वर्षे सेवक आहे. जिल्हा दर्जाच्या या ग्रंथालयात १४ वर्ष सेवा देताना कौटुंबिक परिस्थिती फारशी सुधारली असा काही भाग नाही. दक्षिण कोकणातल्या एका छोट्याशा शहरात असल्यामुळे घर खर्च भागविण्या इतपत मोबदला मिळतो. स्वताच्या आणि कुटुंबाच्या भवितव्या बाबत अजूनही शाशंका आहे. कामाची खूप गरज म्हणून १४ वर्षा पूर्वी १२ वी तून शाळा सोडून नोकरी पत्करली. दर्शनी महत्वाच्या भासणाऱ्या या ग्रंथालय सेवेत भवितव्य दिसू लागले. वयाची ३२ शी केव्हा संपली कळले नाही. इतर ठिकाणी,सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी आर्थिक मर्यादा आल्या तर काही ठिकाणी मी कमी पडलो. तरी हि या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातच काहीतरी होईल आणि आपले जीवन मार्गी लागेल अशी भाबडी आशा होती. पण आता मात्र द्विधा मनस्थिती झाली आहे. जीवनाच्या एका महत्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे. हि नोकरी तर सोडून दुसरी करा आमच्याकडे दुसरे लोक या पगारात काम करण्यास तयार आहेत. असे संचालक मंडळींचे टोमणेही ऐकून घ्यावे लागतात. कदाचित अशी परिस्थिती माझ्या सारख्या महाराष्ट्रातील अनेक ग्रंथालय सेवकांची निश्चितच झालेली आहे. माझ्या सारख्या ग्रामीण भागातील सेवकाची हि परिस्थिती असताना मुंबईसारख्या माया नगरीत शासनाने ठरवून दिलेल्या १३८९ रु. या ड वर्गीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनास सुज्ञ सोडाच मूर्ख मनुष्य प्राणीही तयार होणार नाही. हि परिस्थिती ओढवण्यास मी जे ग्रंथालयाचा वापर करत नाहीत अशा महाराष्ट्रातील नागरिकांना दोषी समजतो कारण शासन तुम्हाला हि सेवा मोफत देत असूनही तुम्ही याकडे ढुंकूनही पाहत नाही. तुम्हाला याची गरज वाटत नाही. या मुळे शासनाचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन गेली १५ वर्ष पूर्णता नकारात्मक होत चालला आहे. या लोकानी हि सेवा गरज म्हणून नित्य नियमित वापरणे सुरु ठेवल्यास शासनाला याकडे गांभीर्याने बघणे भाग पडेल. नाहीतर शासनाने सार्वजनिक ग्रंथालय सेवा कर प्रत्येक नागरिकाकडून वसूल करावा व हि वाचन सेवा अगत्याची करावी. १९६७ चा महाराष्ट्र ग्रंथालय कायदा होऊन नही इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवानियम नसावेत. मग मुंबई सारख्या शहरात कोण कर्मचारी तयार होणार आणि कशी ग्रंथालये टिकणार. कर्मचाऱ्याशिवाय ग्रंथालये चालविणारे महाभाग या चळवळीत आहेत. असे महाभाग २१ मे ते २५ मे २०१२ रोजी झालेल्या महसूलच्या तपासणीत आढळून आले. त्या ग्रंथालयांची काय परिस्थिती आहे हे हि आपल्याला माहित आहे. वर उल्लेख केलेल्या मुबई मराठी ग्रंथ संग्रहालय कुर्ला शाखा या ग्रंथालयाचे मुख्य कार्यालय असलेले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर हे जिल्हा अ दर्जाचे ग्रंथालय आहे. येथील कर्मचाऱ्यांची मानसिक परिस्थिती माझ्यापेक्षा वेगळी निश्चितच नसेल. मग कुर्ला शाखेबाबत तर विचारच करू नये. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर या जिल्हा दर्जाच्या ग्रंथाल्ययाचे कार्याध्यक्ष पद राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदरावजी पवारसाहेब यांनी भूषवील्याचे ऐकिवात आहे मग त्यांच्या सारख्या हुशार व अभ्यासू नेत्याला सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत का प्रश्न पडू नये ? कदाचित गरज आमची आहे राजकारण्यांची नाही. ४० हजार मते सत्ता बदलू शकत नाहीत कदाचित. माझ्या सारख्या अनेक ग्रंथालय सेवकांना असा मानसिक आणि आर्थिक ताप गेली अनेक वर्ष करावा लागतोय. संस्था चालली तर आपण चालू म्हणून आहेत्या परिस्थितीत इमानेइतबारे सेवा बजावली जातेय. परिस्थिती बदलेले हि भोळी आशा आहे.नाहीतर राज्यात शेतकरी आत्महत्या सत्र चालूच आहे. या पुढे हे आमच्या बाबत घडणार नाही कशावरून……………..